दंगल काबू नियंत्रण मोहीम सुरू असताना येथील लिंबू चौक परिसरात अश्रुधूर नळकांडीचा स्फोट होऊन त्यामध्ये पाचजण जखमी झाले. त्यातील रेहान फरीद नदाफ (वय १०) व शिवपुत्र शिवलिंगाप्पा निंबाळ (वय ४०, दोघे रा. गुरुकन्नननगर) यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिसांची पुरती तारांबळा उडाली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत कोणतीच झालेली नव्हती.
शहरातील लिंबू चौक परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दंगलकाबू नियंत्रण मोहिमेची प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वच पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दंगल काबू योजनेची प्रात्यक्षिके करताना अश्रुधुराची दोन नळकांडी फेकली; पण त्यापैकी एका नळकांडीचा स्फोट हवेतच स्फोट होऊन त्यामध्ये शिवपुत्र निंबाळ यांच्या उजव्या कानाला मोठी दुखापत झाली, तर रेहान नदाफ हाही जखमी झाला असून त्याला गंभीर इजा पोहोचली आहे. त्याचबरोबर मुश्रा रियाज पठाण (वय ८), शंकर महालिंग ससरटे (५०, रा. जुना चंदूर रोड), पांडुरंग माळसिंग रजपूत (५३, रा. लिंबू चौक) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत.
प्रात्यक्षिकावेळी दुर्घटना घडल्याने ही मोहीम अर्ध्यावरच आटोपती घेत पोलिस अधिकाऱ्यांनी जखमींना आपल्या वाहनातून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. लिंबू चौक हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जात असला तरी या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. असे असतानाही पोलिसांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा न उभारता याठिकाणी अशाप्रकारचे प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय का घेतला, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे. या घटनेचे वृत्त क्षणार्धात शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, नेमका कशाचा स्फोट झाला याची माहिती नसल्याने बॉम्बस्फोट झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, घटनेनंतर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.
गुणवत्ता तपासावी
दंगल नियंत्रण मोहिमेची प्रात्यक्षिके सुरू असताना अश्रुधुराची नळकांडी फोडणारा पोलिस अनुभवी असावा असा नियम आहे. मात्र, नळकांडी फोडणाऱ्या पोलिसाचा अंदाज चुकल्यामुळे ही नळकांडी रिकाम्या जागेऐवजी नागरिकांच्या अंगावर पडली. जमिनीवर पडल्यानंतर त्यातून धूर येतो. मात्र, या घटनेत नळकांडीचा हवेतच स्फोट झाल्याने या अश्रुधुराच्या नळकांडीची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आली आहे.
चौकशी करणार
प्रात्यक्षिकावेळी दोघेजण गंभीर जखमी झाल्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. हा गुन्हा पोलिसांच्या हातून घडल्याने वरिष्ठ अधिकारीही सावधपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. नागरिकांचा रोष ओढला जाऊ नये यासाठी या प्रकरणाची वरिष्ठांनी आदेश दिल्यास चौकशी करणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट