म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी या परिसरात तुरळक वस्ती होती. या भागात मैला आणून टाकला जात असल्याने माशांचा मोठा प्रादुर्भाव होता. रस्त्याची सोय नव्हती. विद्युत दिव्यांचा तर पत्ताच नव्हता. यामुळे मैलखड्डा पलीकडे तुरळक लोकवस्ती होती. सध्याच्या हनुमाननगर परिसरात त्या काळी जवळपास पन्नास कुटुंबे वास्तव्यास होती. कालांतराने या भागात शेतजमीनीचे रहिवासी विभागात समावेश होत गेला. आपसूकच लोकवस्ती वाढत गेली. पहिल्यांदा स्टेट बँक कॉलनी, त्यानंतर सर्व्हेअर कॉलनी स्थापन झाल्या. प्रशस्त प्लॉट, टुमदार बंगले आणि विविध प्रकारच्या वृक्षामुळे हा परिसराला पहिल्यापासूनच हिरवाईचा लूक लाभला.
आता नोकरदार, बँक व्यावसायिक आणि मध्यमवर्गीयांची लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमाननगरचा विस्तार वाढला आहे. टुमदार बंगला आणि पॉश एरियात आज अपार्टमेंटस उभी राहिलीत. कमर्शियल कॉम्प्लेक्स साकारत आहेत. रिंगरोडमुळे परिसरातील वाहतुकीला गती लाभली आहे. परिसराचे स्वरूप बदलत असताना येथील रहिवासांनी पर्यावरण संवर्धनाची जोडलेली नाळ आणखी घट्ट केली आहे. बंगलो आणि फ्लॅट संस्कृती वाढत असली तरी येथील नागरिकांनी एकमेकासोबत आपुलकीचे आणि स्नेहबंधाची वीण मजबूत केली आहे.
आयटीआयपासून पुढे पाचगावकडे जाणाऱ्या रोडला लागून हनुमानगर वसलेले आहे. हनुमाननगर म्हटले की प्रशस्त बंगले, प्रत्येक घरासमोर नाना विध प्रकारची झाडी, शोभिवंत वनस्पती डोळ्याला सुखावत असते. लहान लहान कॉलन्या, डांबरी रस्त्यांनी चकाचक हा परिसर आहे. हनुमानाचे मोठे मंदिर आहे. हनुमान मंदिरावरून या परिसराला हनुमाननगर म्हणून ओळखला जातो. हनुमानगरनगरमध्ये स्टेट बँक कॉलनी, सर्व्हेअर कॉलनी, शिंदे अंगण, पारिजात कॉलनी, सन्मित्र कॉलनी, युनियन बँक कॉलनी, समृद्धी कॉलनी, हिंदू कॉलनी, सासने कॉलनी, सन्मित्र कॉलनी, निलायम कॉलनीचा समावेश आहे. त्यानगरोत्थान योजनेंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते कळंबा मध्यवर्ती कारागृहपर्यंतचा रस्ता तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात हॉकी स्टेडियम ते हनुमानगरपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. रिंगरोडमुळे या परिसरातील बांधकाम व्यवसायाला गती लाभली आहे. हनुमाननगर परिसरात नवनवीन अपार्टमेंटची भर पडत आहे. आयटीआयच्या पिछाडीस रोडवर आज दुकानगाळे आकाराला येत आहेत. इंटरनेट कॅफे, दवाखाने, सराफी दुकाने, मेडीकल, ऑईल ट्रेडर्स, बेकरीची दुकाने थाटले जात आहेत. रिंगरोडला लागून मोठी अपार्टमेंट, कमर्शियल कॉम्प्लेक्स साकारत आहेत. शांत परिसर, वाहतुकीची सोय, पायाभूत सुविधांची पूर्तता यामुळे या भागात घरकुल थाटण्याला पसंती दिली जात आहे. कॉलनी अंतर्गत रस्त्यांची सुविधा, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि शहरालगतचा परिसर यामुळे हनुमानगरला प्राधान्यक्रम आहे.
रास्ता रोको, नगराचे नामकरण आणि बससेवा
हनुमानगर आज विस्तारले असले तरी या परिसरात पूर्वीपासून रेडेकर, साळोखे, जाधव अशी मोजकी कुटुंबे वास्तव्यास होती. १९६८ च्या आसपास या भागात येथील जमीनीचा दर प्रति चौरस फूट एक रुपया असा होता. पाच गुंठे, तीन गुंठे क्षेत्राचे प्लॉट त्याकाळी पाडण्यात आले होते. सर्व्हेअर कॉलनी, स्टेट बँक कॉलनीमधील मिळकतधारकांचे प्लॉट हे तीन आणि पाच गुंठ्याचे आहेत. १९८२ च्या आसपास या भागातील नागरिकांनी एकत्र येत हनुमानगर तरूण मंडळची स्थापना केली. शिवाजीराव हिलगे, प्रकाश हळबे, काशीनाथ शेटे, मधुकर तुरंबेकर, मोहन आळतेकर, सयाजी शिंदे, प्रकाश जाधव, रत्नकांत कोळेकर यांचा यामध्ये समावेश होता. भागात पायाभूत सुविधांची वानवा होती. रस्ते नव्हते, विद्युत दिव्याची सुविधा नव्हती. पायाभूत सुविधाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भागातील नागरिक व महिलांनी एकत्र येऊन तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव पाटील कौलवकर यांची मोटार अडवली होती. कौलवकर यांनी प्रशासनाला सूचना करून पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालिन महापौर विलास सासने यांच्या कारकीर्दीत या भागाचे हनुमानगर असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर या भागातील रहिवासांच्या सोयीसाठी हनुमानगर ते भवानी मंडप अशी केएमटीची बस सेवा सुरू झाली. भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. रस्ते कच्चे होते. पायाभूत सुविधा नव्हत्या. तत्कालिन नगरसेवक बाबासाहेब सासने यांनी पुढाकार घेऊन या भागात सुविधा निर्माण केल्या. पिण्याची पाइपलाइन टाकली. त्यानंतरच्या कालावधीत नगरसेवक अशोक रेडेकर, गेल्या पाच वर्षात सतीश लोळगे यांनी या भागात सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी चांगलेच प्रयत्न केले.
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची वेगळी ओळख परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत श्री हनुमाननगर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची स्थापना केली आहे. संघाचे २५० सभासद आहेत. ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे परिसरात विविध उपक्रम राबवले जातात. संघातर्फे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय रोज सकाळी सहा ते सात या वेळेत योगासनाचा कार्यक्रम घेतला जातो. भागातील नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक संघाला खुर्च्या, पडदे, साऊंड सिस्टीम, पुस्तके ठेवण्यासाठी कपाट अशा भेटवस्तू दिल्या आहेत. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या खासदार फंडातून संघासाठी हॉल बांधण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार निधीतून दोन लाख रुपये मंजूर केले होते. त्या माध्यमातून कपाऊंडची बांधणी केली आहे. आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून वॉकिंग ट्रक तयार केला आहे.
इको फ्रेंडली वसाहतीत एक नगर एक गणपती येथील रहिवासांनी पर्यावरणांशी नाते जोडले आहे. बंगल्याचे बांधकाम असो की नवीन अपार्टमेंट, त्याची सुरूवात वृक्षारोपनाने केली जाते. 'एक घर, दोन झाड' अशी संकल्पना असून भूमीपूजन करतानाच घराच्या दोन्ही बाजूला दोन रोपांची लागवड केली जाते. नारळ, रामफळ, सीताफळ, फणससह शोभिवंत झाडांनी परिसर नटला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या कृतीशील उपक्रमात खंड पडला नाही. हनुमाननगरचा आज विस्तार वाढला आहे. पण या भागातील रहिवासांनी पहिल्यापासून 'एक नगर...एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे. भागातील नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय उपचार, आरोग्य शिबिर होतात. तीस पस्तीस वर्षापूर्वी या भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. तेव्हा नागरिकांनी एकत्र येऊन पथक स्थापन केले होते. रोज ही मंडळी या भागात गस्त घालत. पूर्वी येथे विद्युत दिव्यांची सोय नसताना लाकडी खांब उभारून लाइटची सोय केली होती. - शिवाजीराव हिलगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष
हनुमानगरमधील नागरिकांनी जात, धर्माच्या पलीकडे जाऊन नातेबंध जपले आहेत. या भागातील रिक्षा व्यावसायिक मोहन पवार यांचा डिसेंबर २०१४ मध्ये अपघात झाला. त्यामध्ये ते जखमी झाले. पतीच्या अपघाताच्या धक्क्याने पत्नींनेही अंथरूण धरले. त्यांचा मुलगा कॉलेजला शिकणारा. यावेळी हनुमानगरमधील सर्वच नागरिकांनी एकत्र येत तीन महिने त्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले होते. - प्रकाश हळबे, स्टेट बँक कॉलनीतील नागरिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट