बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने शिरोळमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडी शर्यत शौकीनांनी चौकाचौकात हलगीच्या कडकडात साखर वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
यात्रा, जत्रा, उरूस यामधील बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्याने शिरोळ तालुक्यातील शर्यत शौकीनातून नाराजी व्यक्त होत होती. सरकारने बंदी उठवावी या मागणीसाठी अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव संघर्ष कृती समितीच्यावतीने शिरोळचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली येथे बैलगाडी, चालक, मालक यांच्यासह मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे बेंगलोर महामार्गावर बैलगाडीसह रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. शिरोळ येथील ग्रामसभेत ठराव करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले होते.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी शुक्रवारी केंद्र सरकारने उठविल्यानंतर बैलगाडी शर्यत शौकीनांनी जल्लोष केला. शिरोळच्या शिवाजी चौकात प्रसाद धर्माधिकारी, सुभाष ताराप, राहुल कदम, हेमंत माने, महेश जाधव, पप्पू संकपाळ, रवी जगदाळे, रोहन जगदाळे, दिनेश जगदाळे, मारूती सांगले, सीताराम रांगोळे, पिंटू दबडे, आनंद संकपाळ, अमर महात्मे, सचिन संकपाळ, ईलाही शेख, तौफिक सय्यद, धोंडिराम गावडे, धमाजी कनवाडे, गजानन गावडे, संजय दाबाडे, धीरज शिंदे, गोटू भाट, विनायक गावडे, प्रवीण पाटील, संभाजीराव जगदाळे यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
वर्षोनुवर्षे उरूस, यात्रामध्ये बैलगाडी शर्यती सुरू होत्या. या शर्यतीवर बंदी घातल्याने ग्रामीण संस्कृती नष्ट होते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. सरकारने बंदी उठवून बैलगाडी शर्यत शौकिनांना न्याय दिला आहे.
-सचिन मोरे, बैलगाडी चालक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट