माझी गरिबी हीच माझी लेखणासाठी प्रेरणा ठरली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड यांनी केले. मिरज तालुक्यातील कर्णाळ येथे पार पडलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता नववी शिकणारी सिमरन जमादार होती. आदेश माने हा विद्यार्थी स्वागताध्यक्षस्थानी होता. संमेलनात विद्यार्थी साहित्यिकांसह कर्नाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबा भांड म्हणाले, बाल वयापासूनच कष्ट करावे लागले. त्यातून पूढे वाटचाल करीत असताना जीवनाच्या विविध टप्प्यांवर माझ्या कुटुंबासहीत अनेक भली मानसे भेटली. त्यामुळेच माझा हा आजपर्यंतचा जीवन प्रवास यशस्वी होऊ शकला. यावेळी त्यांनी बालपणापासूनचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर रंगतदारपणे मांडला. तेजश्री पाटील, भुषण सुतार व किशोरी पाटील या विद्यार्थ्यांनी बाबा भांड यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत खूपच प्रभावशाली ठरली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आभाळमाया फाउंडेशनचे संचालक प्रमोद चौगुले, ज्येष्ठ साहित्यिका तारा भावाळकर, अविनाश सप्रे, महेश कराडकर, पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे, सदस्य सतिश निळकंठ, गोविंद गोडबोले, रघुराज मेटकरी, महेश कराडकर यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे गोविंद पाटील, प्रा. एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू विशेष उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात पाठ्यपुस्तकातील सहभागी साहित्यिक नाशिक येथील विमल मोरे, अहमदनगर येथील शशिकांत शिंदे, इस्लामपूर येथील प्रा. प्रदीप पाटील यांच्याशी समृद्धी शेलार व श्रेया नरुटे यांनी गप्पा गोष्टी केल्या. पाठ्यपुस्तकातील लेखक कसा असतो आणि तो कसा लिहितो याची विद्यार्थ्यांत उत्सुकता होती. यामुळे या गप्पाही रंगल्या.
तिसऱ्या सत्रात ओंकार सिद्ध यांच्या अध्यक्षतेखाली बाल कवी संमेलन पार पडले. या संमेलनात ४२बालकवींनी आपल्या बहारदार कविता सारद केल्या. बालकवींच्या रचनांना श्रोत्यांची दाद मिळाली. कवी संमेलनाचे सूत्र संचालन शिवानी चौगुले व प्रतीक बिसुरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक संतोष पाटील यांनी रेखाटलेल्या चित्रांचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट