म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यसभेत बाल गुन्हेगारी न्याय (सुधारणा) विधेयक मंजूर झाल्याने गुन्हेगारीस आळा बसणार असून युवती व महिलांवरील अत्याचाराचा घटना कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचवेळी १६ ते १८ या वयोगटातील युवकांचे समुपदेश करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
महिला व युवतीवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हेगाराचे वय १८ वरून १६ वर्षापर्यंत करण्यात आले आहे. हे विधेयक राज्यसभेत आवाजी मताने मंजूर झाले. नव्या कायद्यानुसार बलात्कार, खून, अॅसिड हल्ला अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या १६ वर्षांवरील गुन्हेगार प्रौढ ठरणार आहेत. १८ वर्षाखालील मुले व मुली यापूर्वी विधीसंघर्ष गुन्हेगार म्हणून ओळखली जात होती.
सध्या मोबाइल चोरी व पैशाची बॅग पळवण्याच्या गुन्ह्यात लहान मुलांचा वापर केला जात आहे. लहान मोठे गुन्हे करून गंभीर गुन्हे करण्यास मुले प्रवृत्त होतात. या पार्श्वभूमीवर नवीन कायद्याचे स्वागत पोलिस दलातून होत आहे.
पळवाटांना वाव मिळायला नको
अॅड. शिवाजी राणे म्हणाले, 'यापूर्वी घटनादुरूस्ती करून गुन्हेगाराचे वय १६ वरून १८ वर्षे केले होते. आता १६ वर्षांवरील गुन्हेगार प्रौढ ठरणार आहे. पण या कायद्यातही पळवाट काढण्यात आली. १६ वर्ष पूर्ण झालेल्या गुन्हेगारांना २१ वर्षांपर्यंत कठोर शिक्षा देऊन नका, अशी पळवाट काढली आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याऐवजी १६ ते १८ वयोगटातील मुले व मुलींना समुपदेशनाची गरज आहे. कडक कायदे करून प्रश्न सुटत नाहीत. १६ वर्षे पूर्ण झालेला गुन्हेगार प्रौढ ठरत असेल तर १६ वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार द्या अशी मागणीही होऊ शकेल.
मूळ प्रश्नाला हात घालायला हवा
कायदे कडक केल्याने व वय कमी केल्याने गंभीर गुन्हे थांबणार नाहीत. प्रगत राष्ट्रात प्रौढ गुन्हेगाराचे वय १६ वरून १८ केले जात असताना भारतात मात्र उलटा प्रकार घडत आहे. गुन्हे घडण्यासाठी येथील भौतिक वातावरण कारणीभूत आहे. १६ ते १८ वयोगटातील मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. ते पोर्नोग्राफी व ब्ल्यू फिल्मच्या नादाला लागले आहेत. वय कमी करून प्रश्न सुटणार नाही तर या प्रश्नांच्या मूळ गाभ्याला हात घातला पाहिजे. मुलांना चांगले व योग्य शिक्षण दिल्यास गंभीर गुन्हे कमी होऊ शकतील.
अनुराधा भोसले, जिल्हा निमंत्रक, स्वाभिमानी बाल हक्क अभियान
गुन्ह्यांना चाप
मुलींची छेडछाड करणे, फूस लावून मुलींना पळवणे यासारख्या गुन्ह्यात १८ वर्षाखालील मुले कायद्याच्या पळवाटेतून सुटत असत. मुलींची छेडछाड, चेष्ठा मस्करी करणारे तरूणही १६ ते १७ वयोगटातील असतात. या नवीन कायद्यामुळे अशा गुन्ह्यांवर चाप बसू शकेल.
अमृत देशमुख, निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट