'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांची शिरोळ, हातकणंगल्यात मोटारसायकल रॅली
हंगाम रोखण्याचा इशारा
म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठरलेल्या ८०:२० टक्के फॉर्म्युल्याप्रमाणेच एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र केले. जयसिंगपूर येथे ऊस वाहतुकीच्या चार ट्रॅक्टर रोखल्या. याचबरोबर कार्यकर्त्यांनी शिरोळ, हातकणंगले तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून ऊस तोडी थांबविल्या. आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १७०० रूपयांचा पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. तसेच अन्य काही कारखान्यांनी याचप्रमाणे पहिला हप्ता देण्यासाठी हालचाली सुरू ठेवल्या होत्या. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी जयसिंगपूर व कुरूंदवाड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त व जवाहर साखर कारखान्याच्या विभागीय शेती कार्यालयास टाळे ठोकले होते. यानंतर बुधवारी आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली.
शिरोळ तालुक्यात कोथळी, दानोळी, कवठेसार, उदगाव, नांदणी, चिंचवाड, निमशिरगाव यासह परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातून रॅली काढली. यानंतर कार्यकर्ते जयसिंगपूर येथे स्वाभिमानीच्या कार्यालयाजवळ आले. जवाहर साखर कारखान्याकडे ऊस घेवून जाणाऱ्या चार ट्रॅक्टर जयसिंगपूर येथे कार्यकर्त्यांनी रोखले. या ट्रॅटर पोलिस ठाण्याजवळ आणून उभे करण्यात आले.
यानंतर स्वाभिमानीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल मादनाईक, शैलेश चौगुले, विठ्ठल मोरे, सागर शंभूशेटे, मिलिंद साखरपे, आदिनाथ हेमगिरे, आण्णासो चौगुले, बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीस सुरूवात झाली. रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. जयसिंगपूर, उदगाव, शिरोळ, कुरूंदवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, घोसरवाड, हुपरी, पट्टणकोडोली, इचलकरंजी, हातकणंगले, नरंदे, दानोळी येथून मोटारसायकल रॅली पुन्हा जयसिंगपुरात आली. कार्यकर्त्यांनी साखर कारखाना परिसरात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे परिसर दणाणून गेला. स्वाभिमानीच्या या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यात ऊस तोडी बंद झाल्या आहेत. ऊस वाहतूकही बंद आहे.
आजरा कारखान्याची तोड सुरूच
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजरा साखर कारखान्याने ऊसतोड थांबविलेली नाही, अथवा टोळ्यांनाही तशा सूचना दिल्या नसल्याचे कारखाना अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील विविध भागासह गडहिंग्लज व चंदगड परिसरातही कारखान्याच्या ३०० ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यामध्ये बीडसह स्थानिक टोळ्यांचा समावेश आहे. सध्या कारखान्याचे गाळप प्रतिदिन साडेतीन हजार टनाप्रमाणे सुरू आहे. एफआरपीबाबत जिल्हा बँकेशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
हंगाम रोखण्याचा इशारा
चंदगड तालुक्यातील हेमरस कारखान्याने गळीत केलेल्या उसाची बिले तातडीने न दिल्यास हंगाम बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी हेमरसचे युनिट हेड भरत कुंडल यांना निवेदनातून दिला आहे. हेमरस साखर कारखान्याने तालुक्यातील ऊस त्वरित उचलण्याचे नियोजन केले आहे. जळीत व हत्ती बाधीत उसाला कारखाना व्यवस्थापनाने प्रथम प्राधान्य दिले आहे. तशा सूचनाही ऊसतोड यंत्रणेला दिल्या आहेत. कारखान्याचे सात लाखाचे उदिष्ट असून आतापर्यंत एक लाख सत्तर हजारांचे गाळप झाले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट