Raviraj.Gaikwad@timesgroup.com
कोल्हापूरची हवा छान आहे ना...स्वच्छ आहे... कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांचं किंवा महालक्ष्मीच्या भाविकांचं एक ढोबळ मत. प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का? तर उत्तर नाही, असं आहे. सध्या दिल्ली आणि पुण्यातील प्रदूषणाची चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात परिस्थिती तितकी गंभीर नसली, तरी ती कोल्हापूरकरांना विचार करायला लावणारी नक्कीच आहे.
कोल्हापूर : चीनमध्ये राजधानी बीजिंग आणि भारतात राजधानी दिल्ली, ही जगातील सर्वांत वायू प्रदूषित आहेत. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सम आणि विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यावर उलट-सुलट मते व्यक्त होत असली, तरी तेथील प्रदूषणाची स्थिती गंभीर असल्यावर सगळ्यांचेच एकमत आहे. पुण्यातही वायू प्रदूषणाचा विषय गंभीर आहे, हेही कुणी नाकारणार नाही.
दिल्ली आणि पुण्याच्या तुलनेत कोल्हापूर सर्वच अंगांनी छोटे शहर असले, तरी येथील हवाही प्रदूषितच असल्याचे दिसत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मानकांपैक्षा येथील प्रदूषणाची पातळी काही ठिकाणी कमी आहे, तर काही ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती निश्चितच प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने शहरातील तीन ठिकाणी वायू प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात. यात मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील दाभोळकर कॉर्नर, शिवाजी विद्यापीठ आणि वर्दळीच्या महाद्वार रोडचा समावेश आहे. यातील शिवाजी विद्यापीठ परिसरातील प्रदूषणाची पातळी धोक्याची नसली, तरी दाभोळकर कॉर्नर आणि महाद्वार रोड येथे धुलीकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळी पुढे गेले आहे.
या तीन ठिकाणांबरोबरच कावळा नाका, राजारामपुरी, महापालिका चौक, बिंदू चौक, पार्वती टॉकिज, उमा टॉकिज परिसर, आईसाहेब महाराज चौक, गंगावेश, रंकाळा स्टँड, शिवाजी चौक, संभाजीनगर, मिरजकर तिकटी, सोन्या मारुती चौक, कसबा बावडा येथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे ही ठिकाणे देखील वायू प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील बनत आहेत.
पर्यावरणशास्त्र विभागाकडून मानवी शरीर, प्राणी आणि वनस्पतींसाठी हानीकारक असलेल्या नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइडच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचबरोबर हवेत धुलीकणांचे प्रमाण किती आहे, याचीही नोंद घेतली जाते. यात संपूर्ण धुलीकण आणि नाकाद्वारे शरीरात जाणारे धुलीकण असे स्वतंत्र वर्गीकरण केले जाते.
प्रमुख कारणे
शहराची वाढती लोकसंख्या (सुमारे ५ लाख ७५ हजार)
या लोकसंख्येत शहर परिसरातून रोज शहरात येणाऱ्यांची आणि पर्यटकांची भर पडते
लोकसंख्येचा तुलनेत वाहनांची वाढलेली संख्या
सध्या घरटी किमान दोन मोटारसायकली असतात
राजकीय वादात अडकलेला शहराच्या हद्दवाढीचा विषय
वाहतुकीचे अयोग्य व्यवस्थापन
रस्ते विकास प्रकल्प आणि रस्त्यांच्या रुंदीकरणावेळी झालेली शहरातील झाडांची कत्तल
उपाय कोणते?
वाहनांचा कमीत कमी वापर करणे
जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा किंवा पायी जाण्याचा पर्याय
वाहने सुयोग्य स्थितीत ठेवणे आणि जुनी वाहने हद्दपार करणे
शहर वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन
वृक्षतोड थांबवून नवीन झाडे लावणे
हवा प्रदूषणाबाबत लोकजागृती आणि प्रबोधन
कुणाला सर्वाधिक फटका
वाहतूक पोलिस
फेरीवाले
रिक्षावाले, दुचाकीस्वार
मुख्य चौकांतील व्यावसायिक
शाळकरी मुले
प्रदूषकांचा थेट फुफ्फुसावर परिणाम होतो. यामुळे न्यूमोनिया, अस्थमा, अॅलर्जीसारखे विकार होतात. ज्यांना पूर्वीपासून श्वसानाचे विकार आहेत त्यांचा त्रास वाढतो. प्रदूषित ठिकाणी सतत वावर असल्यास हे विकार कॅन्सरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्या पोलिस आणि रिक्षाव्यावसायिकांनी सक्तीने मास्क वापरायला हवेत. तसेच त्यांच्या वारंवार आरोग्य तपासण्या करून श्वसन विकार आढळल्यास त्यांची बदली करायला हवी.
डॉ. संजय देसाई, एमडी मेडिसीन
दाभोळकर कॉर्नर आणि महाद्वार रोडसारखी परिस्थिती शहरातील इतर अनेक चौकांमध्ये दिसू लागली आहे. दाभोळकर परिसरातील वाहनांच्या वर्दळीवर उपाय गरजेचा आहे. शहरात वाहतुकीचे व्यवस्थापन आणि पार्किंग या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रंकाळा, पंचगंगा या प्रश्नांइतकाच हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
जय सामंत, पर्यावरणतज्ज्ञ
शहरी आणि शहरबाह्य प्रदूषण अशी विभागणी केली, तर शहरातील प्रदूषणात वाहने हा प्रदूषकीय घटक वाढविणारा सर्वांत मोठा स्रोत असतो. प्रदूषकीय घटक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मानंकापेक्षा कमी असले, तरी ते घातकच असतात. त्यामुळे त्याचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतातच.
प्रा. डॉ. प्रकाश राऊत,
प्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ
पर्यावरणशास्त्राच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाच्या अभ्यासानुसार दरवर्षी सल्फर आणि नायट्रोजन डॉयऑक्साइड तसेच धुलीकण या प्रदूषकांची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे आणि यापुढे आणखी भोगावे लागणार आहेत.
- डॉ. संदीप मांगेलकर, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट