संपत पाटील, चंदगड
शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. वाढती महागाई व शेतीसाठी येणारा खर्च यांचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीला येतो. खर्च व उत्पन्न यांचा मेळ घालताना नाकीनऊ येत असताना शेतात आलेले उभे पिक घरी आणण्याच्या वेळी जंगली प्राण्याकंडून फस्त केले जात आहे. जंगली प्राण्यांनी पिकांची केलेली अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळत आहेत. यावर्षी कमी पावसामुळे शेतकरी अगोदरच संकटात असताना चंदगड तालुक्यामध्ये हत्ती व गव्यांच्याकडून उभे पिके जमीनदोस्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्थ झाला आहे. जगायचे कसे असा प्रश्न दिवसागणिक त्यांच्यासमोर उभा रहात आहे. जंगली प्राण्यांकडून नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे.
चंदगड तालुक्यामध्ये हत्ती, गवे व अस्वलाकडून माणसांना इजा झाल्या आहेत. २००४ मध्ये पहिल्यांदा कर्नाटक राज्यातून होसूर (ता. चंदगड) येथे हत्तींनी प्रवेश केला. त्यावेळेपासून हत्तींचा वावर चंदगड तालुक्यात आहे. तालुक्यामध्ये फाटकवाडी, जांबरे, हेरे, जेलुगडे, तिलारी, जंगमहट्टी, लक्कीकट्टे असे प्रकल्प व लहान-मोठे तलाव आहेत. यामध्ये बारमाही पाणी उपलब्ध असलेने हत्तींना मुबलक पाणी मिळते.
ऊस, भात, नाचना, केळीच्या बागा, नारळ यांचे प्रमाण अधिक असल्याने हत्तींना रोजच्या खाण्यासाठी पुरेसे खाद्य मिळत असल्याने चंदगडला हत्तींचा मुक्काम आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये हत्तींचे चंदगड तालुक्यात आगमन होते. या काळात हत्तींना खाण्यासाठी मुबलक पिके व डुंबण्यासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे त्यांचा मुक्काम असतो. गेल्या अकरा वर्षात हत्तींनी आपला येण्या-जाण्याचा क्रम अनेकदा बदलला आहे.
गेली दहा वर्षे ते मे अखेरपर्यंत पुन्हा माघारी दोडामार्गच्या दिशेने तिलारी जंगलातून जात होते. मात्र मागील वर्षांपासून या भागात हत्तींचा कळप तळ ठोकून आहे. रात्री अपरात्री चंदगडमधील अनेक गावांमध्ये प्रवास करणे देखील धोकादायक ठरले आहे. अनेकदा हत्ती धावून येण्याचे प्रसंग घडत असल्याने रात्री आठनंतर रस्ते रिकामे असतात.
हत्तींना रोखण्याचे प्रयत्न
हत्ती मानवी वस्तीत येऊ नयेत, मनुष्य व पिकांना हाणी पोहोचू नये, यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येते. गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सभा घेऊन हत्तीविषयी जनजागृती वनकर्मचारी करत असल्याचा दावा केला जात आहे. हत्तींना हुसकावण्यासाठी वनकर्मचारी सुरबाण, फटाके, ढोल व स्पीकर लावून हत्तींना रोखण्याचे काम केले जाते. वनविभागाकडून हत्तींना जंगलातच रोखण्यासाठी जंगलाभोवती चर खोदण्यात आली होती. ही खर्चीक बाब आहे. चंदगड तालुक्यामध्ये सुमारे ३५०० मीमी पाऊस पडतो. त्यामुळे दोन ते तीन वर्षात पावसामुळे ही चर बुजते.
वनविभाग हतबल
हत्तीना रोखणे वनविभागाला अशक्य होत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडील यंत्रणा तोगडी पडत आहे. हत्तींचा कळप रोज आपले ठिकाण बदलत असल्यामुळे वनकर्मचाऱ्यांना चकवा देतात. हत्तींनी केलेली नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यातच वनविभाग धन्यता मानत आहे.
उपद्रवाखालील क्षेत्र
तालुक्याच्या पश्चिम भागातील हेरे, कळसगादे, गुडवळे, वाघोत्रे, पार्ले, नागवे, कोकरे, उमगाव, माळी, झांबरे, भोगोली, पिळणी, कानूर, काळगोंडवाडी, बुझवडे ही गावे जंगलाला लागून आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाला लागून शेती आहे. त्यामुळे या भागात हत्ती रमतात. दिवसभर जंगलात फिरायचे व सायंकाळच्या वेळी शेतकरी शेतातून घरी गेल्यानंतर हत्ती चाऱ्याच्या शोधात शेतामध्ये घुसतात. खाद्य मिळविण्यासाठी वाटेत मिळेल ते पायाखाली घालत खाद्य मिळवतात. खाण्यापेक्षा हत्तीकडून पिकांतून जात असताना हत्तींचे पायामुळे सर्वाधिक नुकसान होते. वरील परिसरामध्ये हत्तींपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वारंवार हत्तींकडून याच परिसरात नुकसान होते.
ठोस उपाययोजनांची गरज
हत्तींच्या रोजच्या नुकसानीने शेतकरी वर्ग वैतागला आहे. नुकसान कितीही झाले तरी कागदपत्रांचा ससेमीरा मात्र अधिक असल्यामुळे शेतकरी त्रासून गेला आहे. नुकसान भरपाईपेक्षा कागदपत्राचा खर्चच अधिक असल्यामुळे शेतकरी काहीवेळा भरपाई मिळविण्याच्या फंदात पडत नाही. सात-बारा, आठ-अ च्या उताऱ्यासाठी साठी तलाठी व ग्रामसेवक भेटत नसल्यामुळे अनेकदा नुकसानीची प्रकरणे अर्धावर सोडली जातात. यासह कृषी सहाय्यक व वनरक्षकांच्या पंचनाम्यावर सह्या लागत असल्याने त्यांना शोधण्यात अधिक वेळ जातो. हे सगळे करत असताना यावर्षीपासून ही सर्व प्रकरणे ऑनलाइन केली जात असल्यामुळे त्यासाठी वेगळा खर्च आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट