म. टा. वृत्तसेवा, चंदगड
निट्टूर (ता. चंदगड) येथे तांबाळ नावाच्या शेतातील उसाच्या फडाला गुरुवारी अचानक आग लागल्याने ३५ एकरातील ऊस जळाला. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये ५० शेतकऱ्यांचा सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हेमरस साखर कारखान्याने जळालेल्या उसाची उचल करण्यासाठी तत्काळ ऊस तोडणी सुरु केली आहे.
निट्टूर ग्रामस्थांची निट्टूर-कोवाड रस्त्याच्या नदीकडील बाजूला तांबाळ नावाची शेती आहे. अचानकपणे लागलेल्या आगीत सतबा पाटील, शिवाजी पाटील, धोंडिबा पाटील, पुंडलिक पाटील, कल्लापा पाटील, यल्लापा पाटील, सोमशेखर मिश्रकोटी, उद्य मिश्रकोटी, पुजा पाटील, सुलभा पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी सुभाना पाटील, मनोहर पाटील, सुभाष पाटील, अरुण पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, मनोहर पाटील, सुभाष पाटील, अरुण पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, निल्लव्वा मिश्रकोटी यांच्यासह ५० शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी अचानकपणे उसाच्या फडाला आग लागली. वा ऱ्याचा वेग मोठा असल्याने आग पसरत गेली. शेत एकमेकाला लागून असल्याने उसाचे फड पेटत गेले. परिसरातील दोनशेहून अधिक ऊस तोडणी मजुरांनी आग विझविण्यासाठी शर्तींचे प्रयत्न केले. आग इतकी भयंकर होती की, तब्बल झळांमुळे आग विझवण्यात अडथळे येत होते. तब्बल दिड किलोमीटर अंतरावर ही आग पसरत गेली. आगीने रौद्र रुप धारण केल्याने शेतकरी हताशपणे पहात होता. सायंकाळी चार वाजेपर्यंत ऊस पेटत होता.
हेमरसचे मुख्य शेती अधिकारी उत्तमराव पाटील, गट प्रमुख नामदेव पाटील, संजय पाटील, उमेश हंपन्नावर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या ऊसाची उचल झाली आहे. रविवार पर्यंत संपुर्ण उसाची उचल करण्याचे कारखान्याचे नियोजन केले आहे. तलाठी एस. टी. सरोळकर यांनी पंचनामा केला.
गावात सर्वत्र दिवाळीची उत्साह होता अशातच उसाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व ग्रामस्थ शेतात गेले. हातातोंडाशी आलेले ऊसपीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत. दिवाळी दिवशीच फडाला आग लागल्याने दिवाळीही साजरी करता आली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट