म. टा. वृत्तसेवा, चंदगड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस साखर कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ९० रुपया हप्ता देण्याचे लेखी जाहीर करुनही अद्याप हप्ता न दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी सुमारे सहा तास वाहतूक रोखली. यावेळी हेमरसचे युनिट हेड भरत कुंडल यांनी १५ जानेवारापर्यंत गाळप झालेल्या उसाचे १५ जानेवारी व त्यानंतर गाळप झालेल्या उसाचे ३० मार्चला एकरकमी ९० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णावर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
मागील सालाच्या गळीत हंगामातील ऊसाला ३४० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार वेळा आंदोलने केली. यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आंदोलक व कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये तोगडा काढत ९० रुपयांचा हप्ता देण्याबाबत कारखान्याला सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याला वर्ष उलटले तरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने आज आंदोलन करण्यात आले.
दुपारी बारा वाजल्यापासून आंदोलनकांनी राजगोळी येथील हेमरसच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे ऊस घेऊन आलेली वाहने रस्त्यावरच उभी राहिली. वाहतुकीला अडथळा येवू नये, यासाठी पोलिस निरीक्षक अंगद जाधवर यांनी उसाची वाहने आंदोलन स्थळापासून दूरवर उभे केली होती. ९० रुपयांचा हप्ता घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे हेमरस कारखान्याचे युनिट हेट भरत कुंडल हे आंदोलनस्थळी चर्चेसाठी आले. शेतकऱ्यांना ९० रुपयांचा हप्ता देण्याचे मान्य केले होते. मात्र बाजारातील साखरेचे दर कमी झाल्याने वेळेत देणे शक्य झाले नाही. कारखान्याची सद्यस्थिती पाहता हा हप्ता त्वरीत देणे शक्य नाही.
त्यामुळे १५ जानेवारापर्यंत गाळप झालेल्या उसाचे १५ जानेवारी व त्यानंतर गाळप झालेल्या उसाचे ३० मार्चला एकरकमी ९० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी गड्याण्णावर यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची लवकर उचल करुन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. आंदोलनामध्ये प्रा. दीपक पाटील, तानाजी पाटील, बाळाराम फडके, नवनीत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
'जवाहर'चा गळीत हंगाम सुरू
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०१५-१६ या २३ व्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ मंगळवार १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे व सौ. इंदूमती आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामास सुरुवात करण्यात आली. काटा पूजन आण्णासो गोटखिंडे आणि त्यांच्या पत्नी कमलताई गोटखिंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याकडे २०१५-१६ हंगामाकरीता १७ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. चालू हंगामाच्या सुरुवातीपासून खोडवा ऊस गाळपाचे नियोजन केले आहे, अशी माहिती यावेळी चेअरमन प्रकाश आवाडे यांनी दिली. तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी गाळप हंगाम २०१५-१६ करीता आपला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रकाश आवाडे यांनी केले. यावेळी विलासराव खानविलकर, अॅड. सी. बी. कोरे, शिवाजी पुजारी, प्रकाश सातपुते, बाळासो माळकर, उदय शेटे, स्वप्नील आवाडे, राहुल आवाडे, यळगूडचे कुबेर पाटील, जयवंतराव मोहिते, आप्पासाहेब पाटील, इंगळीचे रावसाहेब पाटील, श्रीमंधर चौगुले, भूपाल कणिरे आदी उपस्थित होते.
'दत्त-शिरोळ'च्या हंगामास प्रारंभ
शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू गळित हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यावर्षी सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याची कमतरता असल्याने उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. दत्त साखर कारखान्याचा ४४ वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. काटापूजन संचालक श्रेणिक पाटील व अरूणकुमार देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक युसूफ मेस्त्री, अनिल यादव, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, बाबासाहेब पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, आण्णासो पवार आदी उपस्थित होते. स्वागत रावसाहेब भोसले यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट