आजरा तालुक्यातून वाहणाऱ्या हिरण्यकेशी व चित्री नदीचे पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे. यावर्षीच्या पावसाचा निच्चांक आणि वर्षभरासाठी पिण्यासह जनावरांना व इतर उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन तालुक्यातील सर्व बंधारे अडविण्यात आले आहे. सध्या या बंधाऱ्यांमध्ये १९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने बंधाऱ्यात पाणी साठल्यास २७५ दशलक्षघनफूट पाणीसाठा उपलब्ध होईल. यामुळे या नद्यांच्या तीरासह परिसरातील ४० गावच्या पाणी योजनांनाही मुबलक पाणी उपलब्ध होउ शकते, अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर. ए. हारदे यांनी व्यक्त केली.
दरवर्षी नोव्हेबर नंतरच बंधाऱ्यातील पाणीसाठे अडवले जातात. मात्र यावर्षीची गरज व पाणीसमस्याही गंभीर होण्याची स्थिती आहे. यामुळे नद्यांमधील पाणी वाहून जाऊ नये व त्याचा वापर काटकसरीने होण्यासह नजिकच्या गडहिंग्लज तालुक्यातील गावांनाही याचा लाभ मिळण्यासाठी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये बरगे व मुरूम तसेच माती भरून पाणी अडविण्याचे काम जलसंपदा व पाटबंधारे विभागाकडून सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने दिवाळी दरम्यान सर्व बंधाऱ्यातील पाणी क्षमतेने अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऐनापूर, भादवण, हाजगोळी, चांदेवाडी, साळगाव व देवर्डे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
याबरोबरच चित्री नदीकडील परिसरातील तारओहोळवरील येमेकोंड, शृंगारवाडी, वाटंगी, शिरसंगी, किणे, पोश्रातवाडी, कोळिंद्रे, हांदेवाडी येथील बंधाऱ्यामध्येही पाणी अडविण्यासाठी बरगे व मातीकाम पूर्ण करण्यात आले आहे. याबरोबरच चित्री जलाशयातील १६०५, धनगरमोळामधील ९३, एरंडोळमधील १४८ व खानापूर येथील १२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जपून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यातील पाणीसाठ्यांची गंभीर स्थिती पाहून प्रशासन निर्णय गेणार असून उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्यासाठी शक्यतो नवी ऊसलावण करू नये व कमी पाण्यावरील पिकपद्धती विकसीत करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. नियोजनानुसार पाणी वापर झाल्यास व उपलब्ध पाणीसाठे सुरक्षित राहिल्यास टंचाईसदृष्य स्थिती नियंत्रणात राहू शकेल असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट