कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याच्या अटकेमुळे घातपाती कारवायांना तूर्तास ब्रेक लागण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांतून बोलून दाखवली जात आहे. दुसरीकडे आणखी एक समीर तयार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला अधिक लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अतिरेकी व दहशतवादी कारवायांमुळे पोलिस सावधपणे काम करत आहेत. गुन्हेगारी रोखण्याबरोबर गुन्ह्यांचा शोध घेण्याचा ताण पोलिसांवर आहे. पोलिस हे सॉफ्ट कॉर्नर असल्याने प्रत्येक घटनेतील अपयशाचे खापर पोलिस प्रशासनवर फोडले जाते.
दहशतवादी कारवाया रोखण्याबरोबर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्याचे पोलिस दल काम करत आहे. दाभोळकरांच्या हत्येला दीड वर्षे तर पानसरे यांच्या हत्येला सात महिने उलटून गेले तरी त्यांचे हल्लेखोर सापडलेले नसल्याने पोलिसांवर दबाव वाढत चालला आहे. तरीही कोल्हापूर पोलिसांनी टेक्निकल सर्व्हेलन्सव्दारे संशयित समीरला अटक केल्याने चांगले यश मिळाले आहे, असे गृहविभागाचे म्हणणे आहे.
पानसरे हत्येच्या कटात समीर सहभागी असावा, असा संभाषणाचा पुरावा मिळाला असल्याने त्याला अटक करण्यात आली. समीरने दिलेली माहिती व त्याच्याकडून जप्त केलेल्या साहित्याचा आधार घेऊन हल्लेखोरांना अटक करावे लागणार आहे.
किमान पाच ते सहा जणांचे जीव वाचले!
समीरला अटक केल्यानंतर राज्यातील पाच ते सहा वृध्दांचे प्राण वाचले हेच आमचे समीर अटकेचे यश आहे, अशी सूचक प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. या तपासात पोलिसांना मोठे यश मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट