September 3, 2015, 12:00 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने जिल्ह्याची संजीवनी असलेली धरणे अजूनही भरलेली नाहीत. राधानगरी धरण वगळता अन्य कुठलेली मुख्य धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यासमोर पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. राधानगरी धरण पूर्ण भरून मागील आठवड्यात दरवाजे उघडले होते. तर कागलसह राधानगरी, कागल व कर्नाटकाला पाणीपुरवठा होणारे काळम्मावाडी धरण केवळ ७६ टक्के भरले आहे. तसेच कापशी खोऱ्याचा प्राण असलेले चिकोत्रा धरण केवळ ४७ टक्के भरले आहे. सप्टेंबर महिन्यात धरणांची अशी स्थिती असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 3, 2015, 12:01 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अनेक ठिकाणी डोळ्यांना दिसत असलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार केला जातो. पण या विभागातील कामांचे स्वरूप पाहता तिथे न झालेल्या कामाचाही वाटा हडपला जातो. या न होणाऱ्या कामात केवळ कंत्राटदार नव्हे तर संबंधित अधिकारीही सहभागी असतात. या कामातून वाचलेल्या निधीचा अधिकाऱ्यांना ६० तर कंत्राटदारांना ४० टक्के वाटा ठरलेला असतो. त्यामुळे जिल्हाभर होत असलेल्या वेगवेगळ्या कामातून अशा पद्धतीने किती मोठ्या स्वरुपात माया कमवली जाते याचा अंदाज येत आहे. यातून प्रशासनाच्या पातळीवरच भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड असल्याची चर्चा आहे.
कागदोपत्री होत असलेल्या कामातून त्या विभागाचा वरिष्ठ अधिकारी सोडल्यास तिघांना प्रत्येकी दोन टक्के वाटा असतो. याशिवाय टेंडर काढणाऱ्यापासून बिलाची रक्कम काढणाऱ्यापर्यंतच्या टेबलवरील चिरीमिरी ही वेगळीच असते. त्याशिवाय तेथील कामाला गतीच मिळत नाही. कंत्राटदारांच्या मते हे सारे 'ऑफिशीयल' असते. यापेक्षा 'अनऑफिशीयल' वाटा वेगळाच असतो. अनेक कामांचे कंत्राटदार ठरलेले असतात. त्यांच्या राजकीय वजनामुळे ते काम दुसऱ्या कोणाला मिळणार नसते हे अधिकाऱ्यांना माहिती असते. त्यामुळे त्या कंत्राटदाराशीच सेटलमेंटचा फंडा अनेक अधिकारी अवलंबतात. तिथे कोणत्या कामाची गरज आहे व इस्टिमेट किती कामाचे आहे यातून काय गरजेचे आहे हे ते अधिकारीच ठरवतात.
उदाहरणादाखल एखाद्या रस्त्यासाठी चार थरांचे काम करायचे असते. पण तीन थरांचे काम चालून जाते. अनेक इमारतींचा वापर कशासाठी होणार आहे यावर त्याला किती दर्जाचे बांधकाम साहित्य वापरायचे हे ठरवले जाते. अनेकवेळा टेंडरमध्ये बांधकामांमध्ये वापरली जाणारी सळीची कंपनी नमूद असते. पण प्रत्यक्षात वापर कमी किंमतीच्या सळीचा केला जातो. हे सारे प्रकार कामाचा खर्च कमी करतात. त्याचा फायदा कंत्राटदाराला होत असल्याने आणि त्याची चर्चा केली जाऊ नये यासाठी दोघांनी मिळून वाटा ठरवतात. अधिकाऱ्यांना ६० टक्के तर कंत्राटदाराला ४० टक्के असे समीकरण विभागात रुढ आहे.
सेटलमेंट नाही तर काम नाही
सेटलमेंट करण्यास कंत्राटदाराने नकार दिल्यास यापूर्वी कामाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी या कामात मात्र प्रत्यक्ष कामावर हजर असतात. ते उपस्थित असल्याशिवाय काम करु देत नाहीत. जे काही नियम असतील ते सर्व कामासाठी वापरले जातात. यासाठी स्वतःचा डबा घेऊन टोपी घालून जातीने हजर असतात. अशा प्रकारे निरीक्षण झाल्यावर मात्र कंत्राटदाराला नको ते काम असेच म्हणण्याची वेळ आणली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियम राबवायचे ठरवल्यास किती चांगल्या पद्धतीने काम करुन घेतात हेच दाखवून देतात. हा झटका पुन्हा बसू नये म्हणून पुढील वेळी अधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे काम करण्यास नाइलाजाने कंत्राटदार तयार होतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:02 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
सर्वसामान्य कुटुंबांना बँकांशी जोडणे आणि त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. १५ ऑगस्ट २०१५ पासून सुरू झालेल्या या योजनेत केवळ वर्षभरात साडेतीन लाखांहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत, तर यातील तीन लाखांहून अधिक खातेधारकांना बँकांनी रुपी कार्ड पुरवली आहेत. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला जनधन योजनेचा लाभ घेता येत असल्याने या खात्यांची संख्या आणखी वाढणार आहे.
केंद्र सरकारने सुरुवातीला प्रत्येक कुटुंबातील केवळ महिलांच्याच नावे जनधन खाते उघडण्याची तरतूद केली होती, मात्र, बँकांशी निगडित असलेल्या इतर योजनांचाही लाभ घेता यावा यासाठी १८ वर्षांवरील सर्वांसाठी जनधन योजनेची व्यापकता वाढवली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे अवघ्या वर्षभरात तीन लाख ५८ हजार ७४१ बँक खाती उघडण्यात आली आहेत, तर तीन लाख ३१८ जणांना बँकांनी रुपी कार्ड दिली आहेत. रुपी कार्डच्या सहाय्याने खातेधारकांना बँकिंग व्यवहार करणे अधिक सोयीचे होणार आहे.
जिल्हा बँकेसह ३३ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जनधन योजनेचे काम सुरू आहे. बँकांनी स्वतःहून विशेष प्रतिनिधींची नेमणूक करून जनधन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, तर महिला बचत गटांनीही बँक खाती वाढवण्यास मदत केली आहे, त्यामळेच कोल्हापूर जिल्ह्यात जनधन खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकांमध्ये जनधन योजनेबाबत जागृती होत असल्याचे हे द्योतक आहे.
सध्या जनधन योजनेच्या बँक खात्यांवरून गॅस सिलिंडरचे अनुदान दिले जात आहे. यापुढे विविध सरकारी योजनांचे अनुदान थेट या खात्यांवर जमा होण्यास मदत होणार आहे, तर खातेधारकाला एक लाखाचा अपघाती विमादेखील मिळणार आहे. खात्यावर समाधानकारक व्यवहार केल्यास पाच हजारांचे कर्जही मिळू शकेल, त्यामुळे जनधन योजनेचा लाभ घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:03 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
येथील तपस्यासिद्धी कला अकादमीच्यावतीने जानेवारी महिन्यात विश्वविक्रमी 'लावणी मानवंदना' हा उपक्रम होणार असल्याची माहिती नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकाचवेळी २१०० मुली लावणीचा ठेका धरणार असून, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संयोगिता म्हणाली, 'भरतनाट्यम् ही दाक्षिणात्य नृत्यशैली सर्वांना माहिती व्हावी, त्यातून तरुण पिढीमध्ये संस्कार रूजावेत, या उद्देशाने गेल्या जानेवारीत विश्वविक्रमी नृत्यसंस्कार हा उपक्रम घेतला. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये सर्वांत मोठा भरतनाट्यम् डान्स अशी झाली आहे. तत्पूर्वी आम्ही सलग तेरा तास भरतनाट्यम्, सलग ६६ तास भरतनाट्यम् अशा उपक्रमांसह 'करवीर गीतम्', 'दुर्गा झाली गौरी', 'नृत्यलहरी' असे नृत्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रमही रंगमंचावर आणले.' प्रा. डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, 'लावणी म्हणजे केवळ शृंगाररसाची रचना हा समज चुकीचा असून भक्तिरस, वीररस, वात्सल्यरसाच्या लावण्याही शाहिरांनी रचल्या आहेत. तमाशातील लावणीची भुरळ मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीलाही पडली; पण अद्यापही लावणी सादर करताना वेशभूषा कशी असावी इथपासून ते त्यातील भावार्थाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी 'लावणी मानवंदना' हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल.'
दरम्यान, या उपक्रमात किमान २१०० मुली सहभागी होतील. त्यांना इंटरनेटद्वारे लावणीचे प्रशिक्षण दिले जाईल. उपक्रमासाठी आवश्यक वेशभूषा त्यांनीच करायची असून, उपक्रमाचा खर्च म्हणून नाममात्र प्रवेश शुल्क असेल.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी तपस्यासिद्धी कला अकादमी, बी-९, रणनवरे कॉम्प्लेक्स, राजारामपुरी दुसरी गल्ली येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या सचिव शोभा पाटील, हेमसुवर्णा मिरजकर यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:04 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'गेल्या अडीच वर्षांत दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाली. विचारांची ही तिसरी हत्या झाली आहे. साहित्य आणि विचारांचे रक्षण स्वतः करणे आवश्यक असून, त्यासाठी शस्त्रसज्ज राहा,' असे आवाहन प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले.
बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शहीद गोविंद पानसरे विचार मंचच्यावतीने आयोजित डॉ. एम. एम. कलबुर्गी अभिवादन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. अनिल चव्हाण होते.
डॉ. मेणसे म्हणाले, 'महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जी क्रांती केली त्याचा प्रसार डॉ. कलबुर्गी यांनी कन्नड भाषेतून केला. जोपर्यंत हा समाज एकत्र येत नाही तोपर्यंत प्रगती होणार नसून, हे मोडण्यासाठी सर्व जातीच्या महिलांना एकत्र आणणारी सभा त्या काळात बसवेश्वर यांनी भरविली होती. वैचारिक स्वातंत्र्य नसेल तर त्या समाजाची प्रगती होणार नाही. डॉ. कलबुर्गी चांगले साहित्यिक होते. त्यांचे संशोधन दर्जा व गुणवत्तेवर आधारित असे. त्यांचा अंधश्रद्धा आणि मूर्तीपूजेला तीव्र विरोध होता. जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून, त्यांची झालेली हत्या ही विचारांची हत्या आहे.'
कॉ. अनिल चव्हाण म्हणाले, 'महात्मा बसवेश्वर यांनी वचन साहित्य आणि समतेचे विचार मांडले आहेत. सध्या विचारांची लढाई सुरू आहे.'
कार्यक्रमास एस. बी. पाटील, बाळासाहेब बनगे, सुभाष वाणी, शिवाजी परुळेकर, व्यंकप्पा भोसले, चंद्रकात यादव, उदय नाडकर, रघुनाथ कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कॉ. सुभाषचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष वाणी यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 3, 2015, 12:06 pm
Udhav.Godase @timesgroup.com
कोल्हापूर- कधी एके काळी कसबा बावडा म्हणजे शहरातील दगदगीपासून दूर असलेले आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते; पण अलीकडे वाढलेली वाहनांची वर्दळ आणि अपघातांमुळे एसपी ऑफिस ते राजाराम साखर कारखान्यापर्यंतचा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. मुळातच अरुंद रस्ता, फुटपाथचा अभाव, दुकानमालकांनी केलेली अतिक्रमणे आणि अस्ताव्यस्त पार्किंग या सर्वांमुळे या रस्त्यावर वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनाही जीव मुठीत घेऊन चालावे लागते आहे. विशेष म्हणजे वारंवार अपघात घडूनही वाहतूक विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. नुकत्याच झालेल्या अपघाताने या रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एसपी ऑफिस ते राजाराम कारखाना या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या आजूबाजूला पाच शाळा आणि दोन महाविद्यालये आहेत. भगवा चौकात नेहमीच महाविद्यालयीन मुलांची वर्दळ असते. याच परिसरात खासगी क्लासेसही सुरू असतात, त्यामुळे सतत विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. या रस्त्यावर केएमटी बसचे सहा थांबे आहेत. रस्त्यात बस थांबली की, इतर वाहनांना पुढे जायला जागाच उरत नाही, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. यातच भगवा चौक ते पिंजार गल्लीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले फुटपाथ गायब झालेत. अनेक ठिकाणी दुकानमालकांनी अतिक्रमण करुन बोर्ड थाटले आहेत, तर काही फुटपाथवर दुचाकी उभ्या असतात. सायंकाळी तर रस्त्याच्या दुतर्फा पन्नासहून अधिक चायनिज, चिकन आणि फळांच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते.
हा रस्ता पुढे थेट महामार्गासह शिये आणि शिरोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्यांना सोयीचा आहे. शिये, टोप आणि कासारवाडीच्या दगडखाणी सुरू असल्याने शहरात येणारे दगड वाहतुकीचे सर्वच डंपर या मार्गावरून ये-जा करतात, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टरमुळे वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असते. कारखान्याच्या वाहनतळापेक्षा जास्त वाहने रस्त्यावरच उभी असतात. गेल्या दोन वर्षात या रस्त्यावर पाच मोठे अपघात झाले आहेत, तर दोघांना जीव गमवावा लागला. दीड वर्षापूर्वी रेणुका मंदिराजवळ भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले तेव्हा एका बालकाचा जीव गमावला होता, तर नुकत्याच प्रिन्स शिवाजी विद्यालयासमोर झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनांनी बावडा रोडच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे याच परिसरात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील राहतात, तर आमदार महादेवराव महाडिक यांची दररोज या रस्त्यावरून ये-जा असते, आमदार राजेश क्षीरसागर यांना या भागात भरभरून मते मिळतात, पण वाढत्या अपघातांवर उपाययोजना करण्याबाबत कधीच नेत्यांचे गांभीर्य दिसलेले नाही. रस्ते विकास प्रकल्पातून जेव्हा बावड्यातील रस्त्याचे काम सुरु झाले, तेव्हा स्थानिक नेत्यांनी दबावतंत्र वापरून प्रत्येक गल्लीच्या दळणवळणासाठी सोयीचे दुभाजक बनवून घेतले. मात्र आज हेच दुभाजक अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.
स्थानिक नेत्यांचे वाहतूकप्रश्नी दुर्लक्ष
स्थानिक नेत्यांनी वाहतुकीच्या प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यांचेच अनेक कार्यकर्ते रस्त्यात गाड्या आडव्या लावून गप्पांचे फड रंगवतात, तर अपघात घडल्यानंतर वाहनधारकाला मारहाण करायलाही तेच पुढे असतात. स्थानिक नागरिकांनी मनावर घेतले तर नक्कीच वाहतुकीला शिस्त लागू शकते.
वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी
-दुकाने आणि हातगाड्यांचे अतिक्रमणे हटवावीत
-रस्यांवरील रिक्षा थांबे गल्ल्यांमध्ये असावेत.
-अवजड वाहतूक तावडे हॉटेलमार्गे महामार्गावर वळवावी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:07 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
आपल्या आजवरच्या सामाजिक कामाचा लेखाजोखा मांडत राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती आघाडीच्या इच्छुकांनी गुरुवारी नेत्यांसमोर मुलाखती दिल्या. अनेकांनी कार्यकर्त्यांसह वाद्यांच्या गरजात एंट्री करून घोषणांच्या जयजयकारात ताराबाई पार्कातील पक्ष कार्यालयात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पक्षाच्यावतीने शुक्रवारीही उर्वरित प्रभागांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मुलाखतींवेळी आतापर्यंत सामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलने केली, पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला, माझे मतदार नव्या प्रभागात इतके आहेत, पती आणि सासऱ्यांनी यापूर्वी भागात केलेल्या कामाच्या जोरावर मी प्रयत्न करणार आहे असे सांगत महिला उमेदवारांनी बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्थांमधून किती वर्षे काम केली याचा अद्ययावत फाइल्स, पत्रकांच्या माध्यमातून आढावा घेतला.
गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी व जनसुराज्यने इच्छुकांकडून एकत्रित अर्ज मागवले होते. त्या अर्जांची छाननी करून गुरुवार व शुक्रवारी ताराबाई पार्क येथील जिल्हा कार्यालयात मुलाखतींचे आयोजन केले होते. आमदार हसन मुश्रीफ, पक्ष निरीक्षक इलियास नायकवडी, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते प्रा. जयंत पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शहर अध्यक्ष राजेश लाटकर, नगरसेवक आदिल फरास, महिला जिल्हाध्यक्षा संगिता खाडे, अनिल साळोखे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.
पक्षाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात प्रत्येक प्रभागनिहाय इच्छुकांना बोलवण्यात येत होते. त्या प्रभागातील इच्छुकांनी सर्वांसमोर येऊन आपली शक्तीस्थळे सांगितली जात होती. त्यातून मलाच का संधी मिळावी हे आग्रहाने सांगत होते. तसेच जे पक्षात मुरलेले कार्यकर्ते होते, त्यांनी मला संधी मिळाली नाही तर मी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करेन असेही सांगत होते.
पत्रके तसेच काम केलेल्या यादीची फाईल हातात, गळ्यात राष्ट्रवादीचा स्कार्फ, खिशाला राष्ट्रवादीचा बिल्ला अशा रुबाबात सारे इच्छूक वाद्यांच्या गजरात कार्यालयात येत होते. सोबत कार्यकर्त्यांचा गराडा, त्यांच्याकडून दिल्या जात असलेल्या उमेदवाराच्या व मुश्रीफांच्या, राष्ट्रवादीच्या घोषणा असे शक्तीप्रदर्शन करत होते. त्यामुळे सकाळी दहा पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाचा आवार गर्दीने फुलून गेला होता.
मुलाखती प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्वांसमोर होत असल्याने तिथे उमेदवारांमधील स्पर्धा दिसत होती. एकाच प्रभागातील वेगवेगळ्या उमेदवारांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा दबाव टाकण्यासाठी जोरदार घोषणा देत होत्या.
दरम्यान, 'मी इतके काम केले आहे किंवा ही कामे करायची आहेत. त्यासाठी उमेदवारीची संधी दिली तर त्याचे सोने करुन पक्षवाढीला चालना देईन,' हे वाक्य समारोप करताना म्हणतच होते. एकुणच महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गजबजलेले दिसले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:09 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ८१ जागा कमळ चिन्हावर लढवणार असे सांगताच त्यांच्यासोबत असणारी ताराराणी आघाडी एकाच चिन्हासाठी उच्च न्यायालयात गेली. त्यांच्या या कृतीमुळे निवडणुकीपूर्वीच त्यांच्या या आघाडीचा धागा घट्ट नसून निसटता दिसतो आहे. त्यामुळे ही आघाडी भविष्यात किती काम करेल याची शंकाच आहे', असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्याचवेळी त्यांनी '२० उमेदवारांची पहिली यादी गणेशोत्सवापूर्वी जाहीर केली जाईल. त्याची तारीख शुक्रवारी जाहीर करण्यात येईल', असे सांगितले.
राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती आघाडीच्या मुलाखतींना गुरुवारी प्रारंभ झाला. दिवसभराच्या मुलाखतीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप, ताराराणी आघाडीचा तसेच काँग्रेस, शिवसेना यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत ताराराणी आघाडीने विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू आघाडीबरोबर आघाडी केली. पण ताराराणी आघाडीने यापूर्वी १८ वर्षे शहरात केलेल्या खेळामुळे शहरवासियांनी केवळ एक जागा दिली. आता त्यांनी भाजपशी आघाडी केली. चंद्रकांत पाटील यांनी ८१ जागा कमळ चिन्हावर लढणार असे जाहीर करताच ताराराणी आघाडीने एकाच चिन्हासाठी कोर्टात मागणी केली. यातून ताराराणी आघाडीला एक तर 'कमळाबाई' आपले उमेदवार निवडून येणार नाहीत ही शंका असावी. किंवा ताराराणी आघाडी आहे म्हणून भाजप आहे हे दाखवण्याचा तरी प्रयत्न दिसतो. त्यांच्या आघाडीचा धागा निसटल्याचे दिसते.'
काँग्रेसच्या वाटचालीत सतेज पाटील एकटे पडल्याचे दिसत असल्याचे सांगताना मुश्रीफांनी त्यांना अभिमन्युची उपमा दिली. मुश्रीफ म्हणाले, 'सतेज पाटील यांची अभिमन्यूसारखी अवस्था झाली आहे. त्यांनी गोकुळ, राजाराम कारखान्यात चक्रव्युह फोडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी ते भेदता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसबरोबर जरी आमची लढाई असली तरी त्यांचा डोलारा कितपत टिकेल हे सांगता येत नाही. शिवसेना व भाजप वेगळे झाल्याने त्यांच्यात जो कलगीतुरा रंगला. त्याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच सध्या सक्षम म्हणून समोर आला आहे.'
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २६ विद्यमान नगरसेवक आहेत. त्यातील अनेकांचा प्रभाग फुटला आहे. त्यानुसार दोन विद्यमान एका प्रभागात इच्छूक आहेत. अशा पद्धतीचे सहा प्रभागात तिढा निर्माण झाला आहे' असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले अजित राऊत यांनी दोन दिवसांत चमत्कार घडेल असे स्पष्ट केले. त्यातून पद्माराजे उद्यान प्रभागात एक तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी होण्यासाठी सर्वजण मिळून एक उमेदवार निश्चित करतील असे राऊत यांनी सांगितले. जर राष्ट्रवादीला एकमुखी उमेदवार देण्याबाबत निर्णय झाला नाही तर मी कोराणे यांच्या पाठिंब्यावर रिंगणात असेन, असेही त्यांनी पत्रकारांजवळ स्पष्ट केले.
राष्ट्रवादी, जनसुराज्य एकाच चिन्हावर का?
जनसुराज्य शक्तीचे प्रा. जयंत पाटील म्हणाले, '२००६ पासून ताराराणी आघाडीला सत्तेपासून रोखले आहे. मुश्रीफ व विनय कोरे हे एकत्रच काम करत आहेत. पक्ष वेगळे असले तरी विचारधारा एकच आहे. त्यामुळे या निवडणुकीत वेगवेगळे न जाता एकत्र जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दोन वेगवेगळे लढले तर सक्षम उमेदवार उभे रहात नाहीत. त्यामुळे शत्रूला नामोहरम करण्यासाठी ही रणनीती आखली आहे. त्यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार जनसुराज्यशक्ती पक्षासाठी १६ जागा देण्यात येणार आहेत. एका चिन्हाबाबत मात्र मुश्रीफ व कोरे एकत्रपणे भूमिका स्पष्ट करतील.
गद्दारांचा बंदोबस्त करा
मुलाखतींवेळी अनेक इच्छुकांनी भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये बाळासाहेब मेढे यांनी तीव्र भावना व्यक्त केली. ते म्हणाले, 'भागात आपल्याच पक्षातील माणसे पाय ओढण्याचे काम करतात. त्यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची गरज आहे. अशा गद्दार माणसांचा बंदोबस्त करावा.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:10 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्यावतीने सोमवारी (ता. ७ सप्टेंबर) आणि मंगळवारी (ता. ८ सप्टेंबर) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. भाजपा, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मुलाखती होतील. खानविलकर पेट्रोल पंपाजवळील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनात सकाळी १० ते २ आणि दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत मुलाखती होतील.
दहा दिवसांपूर्वीच जयलक्ष्मी सभागृहात इच्छुकांनी महायुतीच्या कारभाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र महायुतीकडून इच्छुक उमेदवारांना कोणताही शब्द दिलेला नव्हता. ८ सप्टेंबरच्या दरम्यान भाजपचे राज्य पदाधिकारी कोल्हापुरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखतीचे नियोजन महायुतीच्या वतीने केले जात आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना संधी देण्याचे नियोजन पक्षांच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुकांची ताकद, त्यांची निवडून येण्याची क्षमता या मुलाखतींच्या निमित्ताने तपासल्या जाणार आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडीचे संयोजक सुहास लटोरे, सुनील मोदी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे ही कोअर कमिटी इच्छुक उमेदवारांंच्या मुलाखती घेतील. महायुतीकडे अर्ज केलेल्यांची आणि अर्ज न केलेल्या उमेदवारांनाही संधी दिली जाणार आहे. दरम्यान, महायुतीने जाहीरनामा तयार करण्याच्या निमित्ताने थेट मतदारांपर्यंत पोहोचून जनमत आजमावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 3, 2015, 12:12 pm
Gurubal.Mali @timesgroup.com
महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सध्या जोरदार फिल्डिंग लावली आहे. पक्षाला अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असताना, आपण राहतो त्या प्रभागात आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी प्रत्येक नेत्याने आपला उमेदवार निश्चित केला असून त्याचा उघड प्रचारही सुरू केला आहे.
महापालिका निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष महेश जाधव, सुहास लटोरे हे भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता आणण्यासाठी व्युहरचना आखत आहेत. गेल्या निवडणुकीत मंत्री पाटील यांनी आपली ताकद वापरून आपल्या राहत्या तपोवन प्रभागातून सुभाष रामुगडे यांना निवडून आणले. आता पाटील मंत्री झाले आहेत. त्यामुळे तपोवन प्रभागासोबतच संभाजीनगर बसस्थानक आणि राजलक्ष्मीनगर या प्रभागांत भाजपचे कमळ फुलण्यासाठी त्यांना ताकद वापरावी लागणार आहे. मंत्री असल्याने या प्रभागांकडे जनतेचेही अधिक लक्ष आहे. पक्षाचे महानगर अध्यक्ष महेश जाधव राहत असलेल्या तटाकडील तालीम प्रभागात जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या जाधवांना या प्रभागात कमळ निवडून आणण्याचे आव्हान आहे. सुहास लटोरे आणि जनसुराज्यचे कारभारी प्रा. जयंत पाटील एकाच प्रभागात राहतात. लटोरे ताराराणी आघाडीचे तर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे राजेंद्रनगर प्रभागाकडे अनेकांचे लक्ष राहिल. या दोघांत वैरत्वामुळे कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोघांचेही प्रयत्न असतील.
काँग्रेसचे नेतृत्व माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा महापालिका राजकारणाशी फारसा संबंध नाही. आमदार महादेवराव हे महाडिक सक्रीय व्हायला तयार नाहीत. त्यामुळे पाटील यांच्यासमोर आव्हान आहे ते शहरात काँग्रेसच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याचे. कसबा बावड्यात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या बालेकिल्यातील पाचही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचे त्यांचे टार्गेट असेल. तेथेच सुरूंग लावण्याचा महाडिक आणि चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न राहिल. त्यामुळे पाटील यांच्या हालचाली अधिक सावध आहेत. उमेदवार निश्चित असूनही त्यांच्या नावांची घोषणा न करणे हा त्याचाच एक भाग असल्याचे समजते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण राहत असलेल्या नाथा गोळे तालीम प्रभागात त्यांचा मुलगा सचिन तर शेजारच्या सिद्धाळा गार्डन प्रभागातून स्नूषा जयश्री काँग्रसच्यावतीने निवडणूक लढवतील. या दोघांच्या विजयासाठी प्रल्हाद चव्हाण यांना प्रयत्न करावे लागतील. दोन्ही प्रभागांत मोठी चुरस आहे. त्यामुळे शिवाजी पेठच नव्हे तर संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे असणार आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपने युती तोडली असा दावा केला जात आहे. त्यामुळे क्षीरसागर यांची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना नेते कार्यक्रमात एकत्र आले असले तरी अजूनही मनाने एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे शहरात सेनेचे २५ नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट असलेल्या क्षीरसागर यांची खरी कसोटी लागणार आहे ती कोकणे मठ आणि खोलखंडोबा या दोन प्रभागांतच. जिल्हाध्यक्ष संजय पवार राहत असलेल्या ताराबाई पार्क व नागाळा पार्क प्रभागात पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विजय देवणे मंगळवार पेठेत राहतात. त्यांच्या कैलासगड स्वारी प्रभागात सेनेच्या तिकीटासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. तेथील तिकीटाचा प्रश्न मिटवून भगवा फडकवण्याचे आव्हान देवणे यांच्यासमोर आहे. तिकीटासाठी येथे संभाजी जाधव, प्रताप जाधव व अभिषेक देवणे यांच्यात चुरस आहे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:14 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'कोल्हापूर कार्यालयाअंतर्गत एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) सदस्यांची माहिती ऑनलाइन सिस्टिममध्ये घेण्याची प्रक्रिया ८० टक्के पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर भविष्य निर्वाह निधीशी (पीएफ) संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन केले जातील,' अशी माहिती कोल्हापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त नीरज श्रीवास्तव यांनी दिली.
श्रीवास्तव म्हणाले, 'पीएफ कार्यालयातर्फे देशभरातील पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) देण्याचे काम सुरू आहे. त्यासोबत खातेधारकांकडून त्यांचा बँक खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी मागवून त्याची यूएएन क्रमांकाशी जोडणी करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानंतर खातेधारक नोकरी करत असलेल्या कंपनी वा संस्थांकडून 'डिजिटल स्वाक्षरी' घेऊन साक्षांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यासाठी पन्नासहून अधिक नोकरदार असलेल्या कंपन्यांना डिजिटल स्वाक्षरी बंधनकारक करण्यात आली आहे. साक्षांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पीएफ धारकांचे व्यवहार ऑनलाइन होतील.'
कोल्हापूर पीएफ कार्यालयाअंतर्गत सध्या साडेसहा लाख खातेधारक असून त्यापैकी २.९ लाख हे चालू खातेधारक आहेत. त्याचप्रमाणे या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांची संख्या सव्वालाख इतकी असून ही संख्या देशभरातील कार्यालयांमध्ये सर्वाधिक आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व खातेधारकांना आपल्या खात्याविषयी मासिक अहवाल मिळू शकेल. त्याचप्रमाणे पीएफच्या वेबसाइटवर आपला यूएएन क्रमांक दिल्यास क्लेम, ट्रान्सफर इत्यादींविषयीची माहिती तातडीने मिळू शकेल. देशपातळीवर सर्व पीएफ खातेधारकांना यूएएन क्रमांक देण्यासाठी विविध मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. येत्या पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण होऊन पुढील आर्थिक वर्षापासून देशातील सर्व पीएफ व्यवहार ऑनलाइन होतील, असा विश्वासही श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:15 pm
Satish.Ghatage @timesgroup.com
कोल्हापूर- संघटित गुन्हेगारी टोळ्यांना चाप लावण्यासाठी २०१५ मध्ये नऊ महिन्यात कोल्हापूर परिक्षेत्र विभागात १३ टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्हेगार व गुंडांच्यावर जरब बसवण्यासाठी हद्दपारी व मोक्का लावण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
महानगरपालिकेची निवडणूक व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी गायकवाड टोळीवर मोक्का लावण्याच्या प्रस्तावावर कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी मोक्काच्या प्रस्तावावर सही केली आहे. परिक्षेत्रात १३ टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण परिक्षेत्रात आठ टोळ्यांना गेल्या नऊ महिन्यात मोक्का लावण्यात आला आहे. पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी तीन टोळ्यांना तर रितेशकुमार यांनी पाच टोळ्यांना मोक्का लावला आहे.
मोक्का लावण्यासाठी संबधीत टोळीवर दोन गुन्ह्यांची आवश्यकता असते. १३ टोळ्यांनी संघटीत गुन्हेगारीव्दारे मारामारी, धमकी, खंडणी, खुनाचे प्रयत्न असे गुन्हे केले आहेत. या गुंड टोळ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याने त्यांची गुंडगिरी सुरू राहते. मोक्का लावल्यानंतर संबधीत टोळीला एक वर्षे स्थानबध्द केले जाते. तसेच ९० दिवस गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस कस्टडी मिळते. या गुन्ह्याखाली होणाऱ्या कारवाईत शिक्षा जास्त असल्याने गुंड टोळ्यांच्या कारवाया कमी होतात. एक वर्षानंतर जामिनासाठी प्रयत्न करावे लागतात. जामिनाचे अधिकार जिल्हा न्यायालयाला नसल्याने हायकोर्टात दाद मागावी लागते.
परिक्षेत्रातील मोक्का लावलेल्या टोळ्या
पुणे ग्रामीण
प्रविण मारूती कुंजुल व ११ आरोपी (लोणी)
महेश चंद्रकांत कमलापुरे व ११ आरोपी (जेजुरी)
पप्पू गणपत उत्तरेकर व १४ आरोपी (सासवड)
राम बाळू केदारी व नऊ आरोपी (पौड)
पिंट्या दीपक वाघमारे व तीन आरोपी (लोणावळा ग्रामीण)
पिंट्या दीपक वाघमारे व नऊ आरोपी (लोणावळा शहर)
शाम रामचंद्र दाभाडे व तीन आरोपी (चाकण)
संतोष कांतीलाल गुजर व पाच आरोपी (चाकण)
कोल्हापूर जिल्हा
शशिकांत गायकवाड (शाहूपुरी)
सांगली जिल्हा
धोंडीराम वसंत शिंदे (मिरज शहर)
सुनील बाबासो दुधाळ (एमआयडीसी कुपवाड)
सोलापूर जिल्हा
लखन शामराव काळे (सोलापूर तालुका)
संतोष हणमंत भोसले (सोलापूर तालुका)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:16 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'कोकण रेल्वेने कोल्हापूर जोडण्याची मागणी जुनी असून हा मार्ग गगनबावडामार्गे वैभववाडीला जोडला जावा,' अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. याबाबत पुणे येथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर-वैभववाडी मार्ग गगनबावडामार्गे तयार केल्यास खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होईलच शिवाय दुर्लक्षित राहिलेल्या गगनबावडा तालुक्याचाही विकास होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूर ते वैभववाडी या १०८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गगनबावड्यातून मार्ग कोकणात गेल्यास खर्चातही कपात होईल, शिवाय या मार्गाचा फायदा गगनबावडा तालुक्याच्या विकासासाठी होईल. निसर्गसंपन्न असलेल्या या तालुक्यातील पर्यटनालाही नव्याने चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे गगनबावड्यातूनच हा मार्ग तयार करण्याचा आग्रह खासदार महाडिकांनी धरला आहे. बैठकीला कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल, खासदार अमर साबळे, उपव्यवस्थापक बी. के. दादाभोय, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव झा उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 3, 2015, 12:17 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षा मिळावी आणि त्यांच्या उतारवयात काही निश्चित रक्कम मिळत राहावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेला तीन महिने उलटले तरी अजूनही याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्ह्यात तीन महिन्यात केवळ १२७० जणांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.
आघाडी सरकारच्या 'स्वावलंबन' योजनेत सुधारणा करून 'अटल पेन्शन' नावाने मोदी सरकारने ही योजना सुरु केली आहे. योजना सुरु करताना सरकारने मोठा गाजावाजा केला होता. १८ वर्षांवरील व्यक्तीने वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत दरमहा ४२ ते २१० रुपयांपर्यंत हप्ता भरल्यास त्याला वयाच्या साठाव्या वर्षापासून दरमहा एक ते पाच हजार रुपयांची पेन्शन मिळण्याची तरतूद या योजनेत आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचे सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे एक जूनपासून योजना सुरु झाल्याने ३१ डिसेंबरपर्यंत या पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी सरकार स्वतःच्या तिजोरीतून काही
रक्कम भरणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर लाभार्थ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे, मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांनीच या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन महिन्यात ग्रामीण भागात फक्त ६०८ तर शहरी भागात ६७१ लाभार्थ्यांनी अटल पेन्शन योजनेत सहभाग घेतला आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत दरमहा पैसे भरावे लागणार असल्याने आणि परतावा मिळण्यासाठी साठाव्या वर्षाची वाट पाहावी लागणार असल्याने गरजूंनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्षात गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी आणखी परीश्रम घ्यावे लागतील, असेच सध्याचे चित्र आहे.
अटल पेन्शन योजना ही सर्वसामान्यांसाठी आहे. इतर कोणत्याही विमा योजनेचा लाभ न घेणाऱ्या आणि असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना वृध्दापकाळ सुसह्य होण्यासाठी ही पेन्शन योजना महत्वाची आहे. त्यामुळे गरजूंनी दीर्घकालीन विचार करून तातडीने अटल पेन्शन योजनेत सहभागी व्हावे. - एम. जी. कुलकर्णी, अग्रणी बँक प्रबंधक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:20 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'लाल फितीत अडकलेल्या कोल्हापूर चित्रनगरीचे काम मार्गी लावत येत्या तीन वर्षात सुसज्ज चित्रनगरी उभारण्यासाठी तातडीने निर्णय घेतला जाईल,' अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक रंगभूमी साहित्य चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी दिली. १९८४ साली चित्रनगरीचा मुहूर्त झाल्यानंतर चित्रनगरीच्या कामात नेमके कोणते अडथळे आले आहेत याची माहिती घेऊन ती उभी रहावी यासाठी प्रयत्न सुरू केले जातील असेही पाटील यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून कै. अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके आदी उपस्थित होते. अष्टेकर यांच्या पुढाकाराने वृद्ध कलावंताना देण्यात येणाऱ्या मानधन योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, 'चित्रनगरीच्या विकासाला सरकारची कधीच हरकत नव्हती. मात्र काही तांत्रिक अडथळे आणि निधी तरतुदीमध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी यामुळे कोल्हापूर चित्रनगरीचा प्रश्न रखडला आहे.'
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी म्हणाले, 'सिनेमानिर्मितीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. बाबूराव पेंटर यांनी पहिला भारतीय बनावटीचा कॅमेरा या भूमीत तयार केला. त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरीची स्वतंत्र ओळख राहण्यासाठी ती गोरेगाव चित्रनगरीशी जोडली जाऊ नये. त्याऐवजी कोल्हापूर चित्रनगरीला प्रादेशिक चित्रनगरीचा दर्जा द्यावा.'
विजय पाटकर म्हणाले, 'कोल्हापूर चित्रनगरी संकल्पनेचे जनक अनंत माने होते. त्यांनी चित्रनगरी संघटना सुरू करून लोकचळवळ उभी केली. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात चित्रनगरीच्या पूर्ततेवर मोहर उमटणे हा स्तुत्य योग आहे. चित्रनगरीसाठी महामंडळाशी निगडीत प्रत्येक व्यक्ती अगदी कुदळ फावडे घेऊन कामाला लागेल. चित्रनगरी उभी राहण्यातच माने यांची स्वप्नपूर्ती आहे.'
अनंत माने प्रतिष्ठानतर्फे एक लाखाचा पुरस्कार
अत्यंत अवघड काळात मराठी सिनेमाला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या कै. अनंत माने यांच्या नावाने पुढील वर्षापासून सिनेक्षेत्रात लोककलेच्या प्रवाहात योगदान देणाऱ्या कलाकाराला एक लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती विलास पाटील यांनी यावेळी दिली. माने यांच्या कुटुंबियांनी स्थापन केलेल्या अनंत माने प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मानधनासाठीही मदत
महामंडळातर्फे वृद्ध कलाकारांना दरमहा ५०० रूपये मानधन योजना सुरू झाली. मात्र हे मानधन कमी असल्यामुळे त्यामध्ये पुढील एक वर्षासाठी २५ वृद्ध कलावंतांना प्रत्येकी एक हजार रूपये मानधन स्वत:कडून देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे कलावंताना मानधनापोटी दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहेत.
चित्रनगरीबाबत १५ दिवसात बैठक
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'चित्रनगरीचे काम मार्गी लागणे ही पालकमंत्री म्हणून जबाबदारी मानून काम करेन. त्यासाठी येत्या १५ दिवसात राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली जाईल. तीन वर्षांनी कोल्हापुरातील चित्रपट निर्मितीला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या औचित्यानेच चित्रनगरीचे दालन खुले होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 12:26 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
घरफाळा कराच्या थकबाकीच्या रकमेवरील २ कोटी ९१ लाखाच्या दंडाच्या रकमेला बेकायदेशीरपणे सूट दिल्याप्रकरणी विभागातील सात अधिकाऱ्यांसह ६९ कर्मचाऱ्यांवर तीन ते एक वार्षिक वेतनवाढ काहींची कायमपणे तर काहींची एक वर्षासाठी बंद करण्याची कारवाई गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली.
कारवाईत विद्यमान करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह एलबीटी प्रमुख दिलीप कोळी, रचना व कार्यपद्धतीचे अधिकारी संजय भोसले यांचा समावेश असून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ एक वर्षासाठी बंद केली आहे. तर यामध्ये सर्वांत जास्त एक कोटी ४ लाखाची सूट दिलेल्या वरिष्ठ लिपिक दीपक टिकेकर यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमची बंद केली आहे.
चौकशीमध्ये उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडून अहवाल घेतला होता. थकबाकी कमी करता येत नसली तरी दंडामध्ये बेकायदेशीरपणे सूट देण्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले होते. त्यानुसार २ कोटी ९१ लाख रुपयांच्या दंडाच्या रकमेला बेकायदेशीर सूट दिल्याचे आढळून आले. त्यानुसार सूट दिलेल्या मिळकतींचा विचार करुन जबाबदारी निश्चित केली होती. तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची तपासणी न करता ही रक्कम संगणकावर अधिकृत केल्याचे दिसून आले. या या निष्काळजीपणाबद्दल वेतनवाढी बंदची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणामध्ये दीपक टिकेकर या वरिष्ठ लिपिकाने एक कोटी ४ लाख २८ हजाराचा दंड माफ केल्याचे अहवालात आले. सूत्रांच्या माहितीनुसार टिकेकर यांचा पासवर्ड वापरुन अनेकांनी त्यांच्या नावावर दंड माफ केल्याचा कारभार केला. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीची रक्कम मोठी असली तरी त्यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमपणे बंद केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 3, 2015, 11:27 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारकडून आलेल्या वीस कोटी रुपयांच्या विशेष निधीचे इस्टिमेट करण्यास सर्किट हाऊसमध्ये बसलेल्या महापालिकेच्या शहर अभियंता, अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायीचे माजी सभापती आदिल फरास शिवीगाळ करुन फाइल फेकाफेकी करुन पळवून लावले.
गुरुवारी सायंकाळी हा राडा झाल्याने सर्किट हाउसवर प्रचंड तणाव होता. या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला.
भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी २० कोटींचचा विशेष निधी शहरातील विविध कामांसाठी मंजूर करुन आणला होता. त्याबाबत सर्किट हाउसमध्ये शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह चारही वॉर्ड कार्यालयाचे उपशहर अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर अशी मोठी टिमच उपस्थित होती. वीस कोटींच्या निधीचे प्र्रभागनिहाय इस्टिमेट करण्यासाठी साऱ्या फाइल्स, नकाशे घेऊन ही यंत्रणा आली होती.
हे पाहून साऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जोरदार शिवीगाळ सुुरू केली. 'दररोज काम करताना सायंकाळी साडेपाचनंतर मोबाइल बंद करता. सामान्य नागरिकांना कामासाठी भेटत नाही. भाजपच्या ताटाखालील मांजर झाला आहात,' असे सुनावत साऱ्यांनाच शिवीगाळ केली. फाइल्सही भिरकावण्यात आल्या. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला. आयुक्तांवरही तोंडसुख घेण्यात आले. ते पाहून अधिका ऱ्यांनी काढता पाय घेतला.
विकासात खोडा
दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ, शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायीचे माजी सभापती आदिल फरास यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केलेली धक्काबुक्की व शिवीगाळ शहराच्या विकासात खोडा घालणारी असल्याचा आरोप भाजपच्या बैठकीत करण्यात आला आहे. या प्रकाराचा यावेळी निषेधही करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 3, 2015, 12:31 pm
म. टा प्रतिनिधी, कोल्हापूर
तिच्या प्राची या नावाचा अर्थच सांगायचा झाला तर पूर्व दिशा... वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने कांबळे कुटुंबातील प्राची नावाचे चैतन्य हरवून गेले. या आघाताचे घाव ताजे असतानाच दुःखाचा हुंदका गिळत तिचे वडील पंडित यांनी प्राचीच्या डोळ्यातील तेज नेत्रदानातून अर्पण करत लेकीची आठवण नेत्रहिनांच्या डोळ्यात रूजवण्याचे आश्वासक पाऊल टाकले.
तरूण मुलीचा मृतदेह अजून डोळे भरून पाहिलाही नसताना नेत्रतज्ज्ञांच्या विनंतीला मान देत कांबळे यांनी प्राचीचे डोळे दिले आणि लेकीचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राची म्हणजे पूर्व दिशा या अर्थाने ती जगाला प्रकाश देते. प्राचीही तिच्या दोन नेत्रांच्या रूपाने दोन अंधांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन जगात राहणार आहे.
प्राचीचे कुटुंबीय जवाहरनगरात रेणुका मंदिराजवळ राहते. वडील विक्रीकर विभागात नोकरी करतात. प्राची एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये शिकत होती. नेहमीप्रमाणे गुरूवारी प्राचीला वडीलांनी तिला कॉलेजला सोडले. बेल झाली. वर्गात शिक्षक येण्यासाठी दोनेक मिनिटांचा वेळ उरला असतानाच मैत्रिणींसोबत गप्पा मारत असलेली प्राची कोसळली. तिला सावरत असतानाच शिक्षक आले आणि क्षणाचही विलंब न लावता दवाखान्याची वाट धरली. रिक्षात बसवले. रिक्षाचालकाने तिला खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी प्राचीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून राजारामपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितले. रिक्षाचालकाने परत राजारामपुरीत वेगाने रिक्षा नेली. पण, तेथील डॉक्टरांनी सीपीआरमध्ये न्यायला सांगितले. तिथे आणल्यावर प्राचीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगताच रिक्षाचालकालाही धक्का बसला.
दरम्यान प्राचीचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमध्ये आले. प्राचीच्या मृत्यूची बातमी समजताच या सर्वांनी केलेल्या आक्रोशामुळे परिसरही हेलावला. दुःखी अंतःकरणाने तिचा मृतदेह विच्छेनासाठी नेत असताना नेत्र विभागातील डॉक्टरांनी नेत्रदानाची विनंती केली. क्षणार्धात दुःख सावरत पित्याने नेत्रदानाचा निर्णय घेतला.
जागृती पंधरवड्यात प्राचीचे नेत्रदान
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान नेत्रदान जनजागृती पंधरवडा साजरा केला जात आहे. प्राचीचे वडील पंडीत कांबळे यांचे सीपीआर हॉस्पिटल नेत्र विभागातील नेत्रदान समुपदेशक आनुप्रिया यांनी प्राचीचे नेत्रदान करण्यासाठी मन वळवले. नेत्रचिकित्सा अधिकारी विनायक सुतार यांनी नेत्रजोड काढून घेतले. हे नेत्रजोड दोन व्यक्तींना दृष्टी देतील, अशी माहिती जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती व्यवस्थापक डॉ. सुजाता वैराट यांनी माहिती दिली.
प्राचीच्या नेत्रदानाबद्दल वडील पंडित कांबळे यांना विचारले असता त्यांना हुंदका आवरणे कठीण गेले. मुलीचा मृत्यू झाला असला तरी नेत्रदान केल्याने तिला नेत्ररुपात पाहिल्याचे समाधान मिळेल. नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळेल असे उद्गार त्यांनी काढले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 1:39 pm
शिरोळ तालुक्यात प्रबोधन करणार
अजय जाधव, जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांबरोबरच नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. नगरपालिका, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये तसेच दत्त साखर कारखान्याच्यावतीने निर्माल्य दान व गणेश मूर्तीदान यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शिरोळ तालुक्याचा परिसर नद्यांमुळे सुजलाम सुफलाम झाला असला तरी पंचगंगेच्या प्रदुषणाचा सर्वाधिक फटकाही याच तालुक्याला बसतो. यामुळे नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी आता ग्रामपंचायती, नगरपालिकांबरोबरच शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
जयसिंगपूर शहरात सुमारे ८५ तर उदगांव, जैनापूर, तमदलगे, निमशिरगांव, दानोळी, कोथळी, कोंडिग्रे, कवठेसार, उमळवाड यासह अन्य गावात ९० ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. जयसिंगपुरातील घरगुत्ती व सार्वजनिक गणेश मुर्तीचे विसर्जन रेल्वेस्थानकानजीकच्या सार्वजनिक विहीरीत तसेच उदगांव व नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी पात्रात करण्यात येते. नदी, विहीरींचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेश विसर्जनावेळी निर्माल्य व मूर्ती दान करण्याचे आवाहन करून निर्माल्य संकलित करण्यात येते. यंदाही याबाबत गणेश मंडळांची बैठक घेवून प्रबोधन करण्यात येणार आहे.
कुरूंदवाड येथे प्रतिवर्षी पंचगंगा नदीत अनवडी पुलाजवळ घरगुत्ती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. नगरपालिकेच्यावतीने प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येते. याचबरोबर गणेशमूर्ती विसर्जनासाठी शिवाजी पुतळ्याजवळ काहील ठेवण्यात येते. नगरपालिका व एसपी हायस्कूलच्यावतीने निर्माल्य संकलित करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नदी प्रदूषण टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
प्रदुषण टाळण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेकडून प्रतिवर्षी गणेशमूर्ती व निर्माल्य दानाचे आवाहन करून संकलन करण्यात येते. यंदाही याबाबत बैठक घेवून सार्वजनिक मंडळांबरोबरच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
-एम.एस.चाबुकस्वार, उपमुख्याधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 4, 2015, 1:39 pm
गडहिंग्लज उपनगराध्यक्षांचे वाहन सुविधा काढली
म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज
गडहिंग्लज नगरपालिकेतील 'मानापमान' नाट्याची मालिका अद्याप संपलेली नाही हेच पुन्हा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. खुर्ची, केबिन पाठोपाठ पाहणीसाठी गेलेल्या उपनगराध्यक्षांचा अपमान करण्याच्या हेतूनेच सत्ताधारी गटाने सरकारी गाडी काढून घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. नगराध्यक्ष बोरगावे यांनी उपनगराध्यक्षांना गाडी वापरण्याचा अधिकार नाही, असे सांगत अजून बरेच काही बोलायचे आहे, त्यामुळे सभागृह सोडून पळून नका, असा टोला लगावला.
सभेच्या सुरूवातीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकानी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. दीपा बरगे यांनी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका प्रभावती बागी व आरटीओ हीनाकौसर सौदागर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. कावेरी चौगुले या उपनगराध्यक्षा व आरोग्य विभागाच्या पदसिद्ध सभापती असतानादेखील केवळ त्यांचा अपमान करण्यासाठी सत्ताधारी गटाने केबिनची मोडतोड केली. तसेच मुद्दामहून शैचालयाशेजारची केबिन दिली होती.
तसेच चौगुले या प्रभागाच्या पाहणी दौऱ्यासाठी गेल्या असताना जाणीवपूर्वक अपमान करून त्यांच्याकडून गाडी परत घेण्यात आली. सर्वत्र महिलांना आरक्षण देवून सन्मान केला जात असताना सत्ताधारी गटाचे हे कृत्य निषेधार्ह आहे, असा आरोप करीत विरोधी गटाने सभात्याग केला. गटनेत्या स्वाती कोरी यांनी चौगुले यांनी आरोग्य सभापती म्हणून आजपर्यत किती बैठका घेतल्या असा सवाल केला. तसेच पालिकेतील कोणतीही साधने वैयक्तिक कामासाठी वापरणे योग्य नाही असे सांगितले.
तर नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी चौगुले या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या असून सीमाभागातील काळ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी सरकारी गाडी त्यांनी कोणत्या अधिकाराने वापरली. ते पुढे म्हणाले, विकासकामासंदर्भातील त्रुटीचा कोणताही मुद्दा विरोधकांकडे नाही. पदाधिकारी असताना शहराच्या विकासासंदर्भात कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे त्या पदावर बसायला लायक नाहीत. त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भद्रापूर यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧