दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना कागल शहरात कुठेही पार्किंग झोनच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कुणीही उठावे आणि कागलमध्ये कुठेही गाडी पार्क करावी अशीच इथली परिस्थिती आहे. अडथळ्यांचा विचार करता पालिकेने आठवडी बाजाराची जागा बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला असला तरीही दुकान, हॉटेल आणि रस्त्याच्या बाजूला कुठेही आणि कशीही वाहने लावल्याने वादावादी आणि कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. बेशिस्त पार्किंगवर कारवाई झाल्याचे उदाहरणच नसल्याने पादचारी आणि इतर नागरिकही त्रस्त झाले आहेत.
कागल शहरात कोण, कुठे, कसा चालतो याबाबत कोणत्याही नियमाचा अवलंब केलाच जात नाही. खर्डेकर चौकातून पूर्वेला एकेरी मार्गाची मागणी असूनही विरुद्ध दिशेने वाहने अव्याहतपणे चालविली जातात. कॉलेजला जाण्याची आणि येण्याची वेळ तर वाहनांच्या गर्दीत चालणेही अवघड होऊन बसते. कारण फुटपाथवर दुकानदारांचे आणि हातगाड्यांचे अतिक्रमण आहे. बसस्थानकाशेजारी खासगी वाहने कशीही लावली जातात आणि प्रवाशांची पळवापळवी केली जाते. कधी कधी बसस्थानकातून बाहेर पडतानाच यातायात करावी लागते. कोल्हापूर शहरालगत आणि हायवेला लागून असल्याने दररोज पंधराशे बसच्या फेऱ्या आणि ४० हजार परवाशी ये-जा करतात. शिवाय तालुक्याचे ठिकाण असल्याने ८६ गावांतील हजारो लोक रोज कागलला येतात. याचा विचार करता पार्किंगच्या बेदिलीला पायबंद घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
काही काही वेळा वाहनधारक रस्त्यातच वाहने पार्क करून निघून जातात. पोलिसांनी कारवाई केलीच तर लोकप्रतिनीधी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे पोलिसही हतबल झाले आहेत.
फुटपाथवरही हातगाडीवाल्यांचा कब्जा
आयआरसीच्या नियमानुसार रस्ते किमान साडेनऊ ते दहा मीटर रुंदीचे हवेत. फुटपाथ बनवताना रस्त्यावरचा पट्टा ते फुटपाथचे अंतर केवळ एकच फुटाचे आहे. तेवढ्यात साधी दुचाकीही पार्क होऊ शकत नाही. त्यातच फुटपाथवर दुकानदार आणि हातगाडीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. बाजाराची जागा बदलली; परंतु तिकडे जायला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे जुना बाजारपेठ रस्त्यावर पादचारी आणि दुचाकीधारकांची बाजाराला ये-जा करण्याची वर्दळ कायम आहे. रहिवाशांनीही रस्त्याबरोबर घरे बांधल्याने वाहनेही रस्त्यावरच पार्क करावी लागतात. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
आयआरसी नियमानुसार कागलचे रस्ते रुंद नाहीत. येथील वाहतुकीचे नियोजन मनुष्यबळ आणि सुविधेसह नगरपालिकेने करावयाचे आहे. परंतु पालिकेने नियमानुसार अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. नियोजन केल्यास प्रश्न मार्गी लागेल.
- निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक
आम्ही दोन वर्षांपासून आराखडा, ठराव करून हरकती मागवून पार्किंगबाबतची कार्यवाही पूर्ण केली. मान्यताही घेतली आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांकडे प्रस्ताव पाठवून तीनवेळा बैठकाही झाल्या; परंतु पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही.
- प्रभाकर पत्की, मुख्याधिकारी, कागल नगरपालिका
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट