पन्हाळा तालुक्यातील सावर्डे व शिराळा तालुक्यातील मांगलेदरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधऱ्याला गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागूनसुद्धा पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मुळात पाणीपट्टी वसुली करणारा कोडोली पाटबंधारे विभाग बांधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती आमच्याकडे नाही अशी कारणे देत आहे. तर वसुली कोडोली कार्यालयाकडे असल्यामुळे शाहूवाडी येथील पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा करीत आहेत. बांधाऱ्याला गळती लागून तब्बल १० ते १५ वर्षे झाली आहेत. सुरूवातीला गळती कमी होती. दगडी बांधकाम असल्यामुळे दगडाच्या बांधकामातील सिमेंट निघून गेले आहे. तसेच आता दगडही निघून निघाले आहेत. दोन्ही दगडी पीलरच्या मधून पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पाण्याचे फवारे उडत आहे. बरगे घालताना आणि काढताना बांधाऱ्यांच्या पडझडीमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. बारा वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे जुने लाकडी बरगे कुजूनसुद्धा बदलले गेले नव्हते. शिराळ्याच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने नवीन लाकडी बरगे दिले होते. लाखो रुपयाची पाणीपट्टी गोळा करणारा पाटबंधारे विभाग बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे का टाळाटाळ करीत आहे हे अध्याप समजलेले नाही. बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडकलेले लाकडाचे ओंडके गेल्या दोन वर्षांपासून अडकून आहेत. त्यामुळे बंधाऱ्याचे बरगे काढून सुद्धा बंधाऱ्यात पाणी साठून रहात आहे. बंधाऱ्यांच्या पश्चिमबाजूला असणारा भरावही खचून चालला आहे. बंधाऱ्यावरून वाळूने भरलेल्या ट्रकची वहातूक सुरु असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. बंधऱ्याच्या दोन्ही बाजूचा भराव प्रत्येक वर्षी पुराचे पाणी आल्या नंतर खचून जातो आहे.
पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी होणाऱ्या किरकोळ पडझडीची दुरुस्ती पावसाळा संपल्यानंतर बरगे घालताना केली जाते. गेल्या पाच वर्षात दुरुस्तीचे काम निघालेले नाही. धरणात गेल्या अनेक वर्षापासून बर्गे काढले तरी तीन फुटापर्यंत पाणी राहते आहे. त्यामुळे त्याच्या खाली दुरुस्तीचे काम करता येत नाही.
- पी. वाय. पाटील, शाखा अभियंता, शाहूवाडी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट