गुरुबाळ माळी, कोल्हापूर
'निवडून येईल तो आमचा' या सूत्रानुसार ताराराणी आघाडीने महापालिकेवर १५ वर्षे राज्य केले. आमदार महादेवराव महाडिक यांनी त्याचे नेतृत्व केले. त्यानंतरच्या काळात दुसरी पिढी राजकारणात आली. त्यांच्या सोबत माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार मालोजीराजे यांनीही या आघाडीचे नेतृत्व केले. पाच वर्षापूर्वी विसर्जित केलेली ही आघाडी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आता आघाडीने भाजपच्या हातात हात घातला आहे. ही आघाडी काँग्रेसच्या एका गटाची असल्याने महापालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचा आरोपही सुरू झाला आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर सुरुवातीला माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड व माजी कृषीराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांची सत्ता होती. निवडून आलेल्या नगरसेवकांना एकत्र करून ते सत्ता स्थापन करत होते. या दोघांत वितुष्ट निर्माण झाल्यानंतर गायकवाड यांनी आमदार महाडिक यांची मदत घेतली. तेव्हापासून महाडिक यांचा महापालिकेत शिरकाव झाला. नंतरची सलग पंधरा वर्षे त्यांनी सत्ता गाजवली. मात्र २००५ च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार विनय कोरे त्यांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावला. त्यांमुळे गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ताराराणी आघाडीने भाजपबरोबर समझोता केला आहे.
आघाडी महाडिकांचीच, पण ...
सध्या आमदार महाडिक यांचा आघाडीशी काही संबंध नसल्याचा देखावा निर्माण करण्यात आला आहे. मात्र, महाडिक यांच्या तालावर नाचणारे कारभारी ताराराणी आघाडीची सूत्रे हलवत आहेत, त्यांचे एक चिरंजीव स्वरूप आघाडीचे अध्यक्ष आहेत. दुसरे सुपूत्र अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही आघाडी आमदार महाडिक यांच्या आशीर्वादानेच पुन्हा सक्रिय झाली हे स्पष्ट आहे. मात्र याबाबत ते नकार देत आहेत. वस्तूतः आमदार महाडिक यांना गोकुळ आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची काळजी अधिक आहे. त्यापुढे त्यांना अन्य सर्व निवडणुका त्यांच्यासाठी गौण आहेत. त्यामुळे ते अन्य निवडणुकांत फारसे सक्रीय होत नाहीत. आता सतेज पाटील महापालिकेत सक्रिय असल्याने त्यांची ताकद कशी कमी करता येईल यावरच त्यांची भिस्त आहे. त्यांचे विधान परिषदेतील भवितव्यही त्यावर अवलंबून आहे. काँग्रेसबरोबरच इतर पक्षांची ताकद आपल्याला मिळावी यासाठीच महडिक यांनी ताराराणी आघाडीला भाजपच्या कळपात सोडले आहे. नव्या आघाडीमुळे भाजप आणि शिवसेनेची युती संपल्यात जमा आहे. फक्त घोषणा व्हायची शिल्लक आहे एवढेच.
कथित विसर्जित आघाडीचे केले पुनरुज्जीवन
'निवडून येईल तो नगरसेवक आमचा' यानुसार नगरसेवकांना एकत्र करत आमदार महादेवराव महाडिक यांनी पी. एन. पाटील व अरुण नरके यांच्या सोबतीने कोल्हापूर महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. पुढे त्यांनी आघाडीला 'ताराराणी आघाडी' असे नाव दिले; मात्र आघाडीची रितसर नोंदणी केली गेली नाही. त्यानंतरच्या महापालिकेच्या लागोपाठ तीन निवडणुकांत ताराराणी आघाडीचा करिश्मा चालला. या आघाडीच्या नावावर अनेकजण महापौर झाले. अगदी तीन किंवा सहा महिन्यांचा महापौर किंवा अन्य पदांची वाटणी अशी सोयीस्कर पद्धतही महाडिक यांनीच रुढ केली. या आघाडीला एक-दोन वेळा राजर्षी शाहू आघाडीने धक्का देत विरोध केला. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लागला. २००५ साली महापालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर व्हावी असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी राज्य स्तरावर ठरवले. याकाळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशामुळे आमदार महाडिक यांनी ताराराणी आघाडी विसर्जित केली; मात्र पुढे लोकसभा निवडणुकीत महाडिक यांनी अपक्ष उमेदवार, तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना ताकद दिली. विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले. यानंतरच्या काळात महाडिक यांनी पुन्हा ताराराणी आघाडीची स्थापना केली. त्याची रितसर नोंदणी केली. त्याचे अध्यक्षपद धनंजय महाडिक यांच्याकडे दिले गेले; पण राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर धनंजय महाडिकांनी आघाडीचा कागदोपत्री राजीनामा दिला. त्यानंतर आता आमदार महाडिक यांचे पूत्र स्वरूप हे नवे अध्यक्ष म्हणून समोर आले आहेत.
चौघे कट्टर समर्थक कारभारी
ताराराणी आघाडीचा कारभार आता आमदार महाडिक यांचे कट्टर समर्थक हाताळत आहेत. माजी नगरसेवक सुहास लटोरे, सुनील मोदी, माजी महापौर सुनील कदम आणि संजय स्वामी यांनी आघाडीची सूत्रे हातील घेतली आहेत. वस्तूतः प्रत्येक निवडणुकीत हे चौघे महाडिक यांच्या आदेशानुसार सूत्रे हलवितात. चौघांकडे नेटवर्क आहे, वेळही भरपूर आहे. महाडिक आदेश देतील, त्यानुसार कारभार चालतो. आर्थिक बळ महाडिकांचे आणि कारभार चौघांनी करायचा हे नेहमीच चालते. अपवाद फक्त जिल्हा बँकेच्या यंदाच्या निवडणुकीचा. जिल्हा बँकेच्या राजकारणात या कारभाऱ्यांनी महाडिक यांचा आदेश जुमानला नाही. प्रा. जयंत पाटील यांना विजयी करण्याचा आदेश असताना कारभाऱ्यांनी प्रा. जयंत पाटील यांचा पराभव केला. मात्र नंतर प्रा. पाटील यांनी स्वीकृत संचालक म्हणून बँकेत येत याचे उट्टे काढले हा भाग अलहिदा.
ताराराणी आघाडी ५० जागा लढणार
भाजप आणि ताराराणी आघाडी यांच्यात समझोता झाल्यानंतर आता जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक चर्चेनुसार ही आघाडी ५० जागा लढणार आहे. उर्वरित ३१ जागा भाजप लढवणार असून सत्ता आल्यास महापौरपद भाजपला देण्यात येणार आहे. सध्या तरी अनेक आजी व माजी नगरसेवक ताराराणी आघाडीच्या संपर्कात आहेत. महाडिक यांच्याशी एकनिष्ठ असेलेले व त्यांच्या गटात असणारे अनेक उमेदवार यामध्ये आहेत.
महापौरपदाची केली खांडोळी
ताराराणी आघाडीच्या काळात महापौर पदाची खांडोळी करण्याची पद्धत पाडली गेली. एक वर्षाचे महापौरपद असताना वर्षात चार-चार जणांना महापौर करण्याची किमया महाडिक यांनी केली. त्यामुळे ताराराणी आघाडी बरीच बदनाम झाली. मात्र, या आघाडीच्या काळात अनेकांना बिनपैशात पदे मिळाली. पदाधिकारी निवडताना होणाऱ्या सहली बंद झाल्या. भिकशेठ पाटील, आर. के. पोवार, राजू शिंगाडे, प्रल्हाद चव्हाण यांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महापौर होण्याची संधी मिळाली ती ताराराणी आघाडीमुळेच.
बाबू फरासांचा बिन आवाजाचा बॉम्ब
ताराराणी आघाडीला आजवर दणका दिला तो राजर्षी शाहू आघाडीने. महापालिकेच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून १९९६-९७ या काळात ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक फुटून या नव्या आघाडीत गेले. त्यांनी बिनआवाजाचा बाँब फोडला. त्यातून कांचन कवाळे यांनी मायादेवी भंडारे यांचा पराभव केला. त्यानंतर बाबू फरास यांनी ताराराणी आघाडीचे उमेदवार नंदकुमार वळंजू यांचा पराभव केला. हे दोन धक्के सोडले तर ताराराणी आघाडीने १५ वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवली. विशेष म्हणजे ताराराणी आघाडी सत्तेवर असताना या आघाडीकडे सर्व पदे होती. विरोधी पक्षनेतेपदही याच आघाडीकडे असायचे. त्यासाठी महापालिकेत कागदोपत्री विरोधी आघाडी स्थापन केली जायची.
खराडेंचाही दणका
महापालिकेच्या एका निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या सई खराडे महापौर झाल्या. नंतर ही आघाडी काँग्रेसचीच असल्याचे जाहीर करत खराडे या काँग्रेसच्या असल्याचे जाहीर करण्यात आले. अडीच वर्षात तीन महिलांना महापौर करण्याचे ठरले होते. त्यावेळच्या निर्णयानुसार नगरसेविका माणिक पाटील व सरिता मोरे यांना ही संधी मिळणार होती. मात्र खराडे यांनी ऐनवेळी जनसुराज्यचा नारळ हाती घेतला. त्यामुळे ताराराणी आघाडी सत्तेतून बाहेर पडली. त्यानंतर ही आघाडी आजवर सत्तेत आलेली नाही.
ताराराणी आघाडीचे आजवरचे महापौर
भिकशेठ पाटील, आर. के. पोवार, पी. टी. पाटील, दिनकर पाटील, रामभाऊ फाळके, राजू शिंगाडे, प्रल्हाद चव्हाण, रघुनाथ बावडेकर, भिमसिंग रजपूत, बंडोपंत नाइकडे, शामराव शिंदे, जयश्री जाधव, शिवाजीराव कदम, सुनील कदम, शिरीष कणेरकर, भिमराव पोवार, दिपक जाधव, दिलीप मगदूम, बाजीराव चव्हाण, मारुतराव कातवरे, नंदकुमार वळंजू, सई खराडे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट