जिल्ह्यातील ३७० ग्रामपंचायतींसाठी प्रचंड चुरशीने व ईर्ष्येने शनिवारी सरासरी ८५.१८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात शांततेने मतदान झाले असले तरी अनेक गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. सोमवारी (ता. २७) तालुक्याच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.
ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. मतदानासाठी येण्यासाठी अनेक उमेदवारांनी नोकरी व व्यवसायानिमित्त ठिकठिकाणी गेलेल्या मतदारांपर्यंत पोहोचून आवाहन केले होते. अनेक ठिकाणी दोन, तीन असे पॅनेल असल्याने मोठी रंगत होती. त्यामुळे जिल्ह्यातील ४७ गावांना संवेदनशील म्हणून जाहीर केले होते. शनिवारी सकाळपासून मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी अनेक ठिकाणी वाहनांची व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्रावर मतदारांबरोबर कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. त्यामुळे दिवसभरात अनेक ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. काही ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवावे लागले. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीत ८५.१८ टक्के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी गगनबावडा तालुक्याची असून, तिथे ९१.२० टक्के मतदान झाले. त्यानंतर संवेदनशील असलेल्या कागलमध्ये ९०.०१ टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी मतदान गडहिंग्लज तालुक्यात ८०.६४ टक्के झाले आहे.
शाहूवाडी चुरशीने ८५ टक्के मतदान
शाहूवाडी तालुक्यातील २८ ग्रामपंचायती आणि एका ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी चुरशीने ८५ टक्के मतदान झाले. साळशीतील पोटनिवडणुकीसाठी ९३८ मतदारांपैकी ७९८ जणांनी चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये ३६१ जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सोंडोली, वाडीचरण, उकोली व शिरगाव येथील किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. जांबूर-मालगाव येथील मशिनमध्ये किरकोळ दोष आढळल्याने दुपारी तीन वाजता हे यंत्र बदलून मतदान प्रक्रिया तक्रारीविना पार पडली. साळशीत एका जागेसाठी पोटनिवडणुकीत चुरशीने मतदान झाले.
सर्वाधिक ९१.२० टक्के मतदान कुरणीत
कागलः तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. चौथ्या टप्प्याअखेर ८२.७० टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याअखेर तालुक्यात सर्वाधिक मतदान कुरणी येथे ९१.२० टक्के झाले. ४६ ग्रामपंचायतींच्या ४६७ जागांसाठी ११४६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांनी यांनी लिंगनूर दुमाला केंद्रावर सकाळी पावणे सहाच्या सुमारास मतदान केले. सकाळी दहानंतरच मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली.
निवडणुकीत सकाळी पहिल्या टप्प्यात २१.६२ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ४६.६० टक्के, तिसऱ्या टप्प्यात ६८.३८ टक्के, चौथ्या टप्प्यात ८२.७० टक्के मतदान झाले. एकूण २११ केंद्रावर मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात कुरणीत ९१.२० टक्के, केनवडे ९०.८२ टक्के, पिंपळगाव बुद्रुक ९०.२२ टक्के, शिंदेवाडी ८९.६८ टक्के, बेलवळे खुर्द ८९.६४ टक्के मतदान झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट