मारुती पाटील, कोल्हापूर
कोल्हापुरी चप्पल आणि गुळाने जगाची बाजारपेठ काबीज करत आपल्या ब्रँडचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले. उद्योजकीय कामगिरी आणि कारागिरीत कोल्हापूरने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असताना येथील उद्योजकांना आपल्या नावाचा स्वतंत्र ब्रँड तयार करता आला नाही. म्हादबा मेस्त्री, करजगार यांसारख्या व्यक्तींनी ऑईल इंजिनमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली. मात्र त्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये झालेले बदल आत्मसात करण्यात येथील उद्योजक कमी पडल्याने स्वतःचे ब्रँडिंग करण्यापेक्षा मल्टीनॅशनल कंपन्यांना पुरवठा करण्यावर अधिक भर दिला.
आरबीआयचे विभागीय संचालक एस. रामास्वामी यांनी ब्रँड निर्मितीवर उद्योजकांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गुरुवारी व्यक्त केली. मात्र यानंतर बँकांनी पतपुरवठ्यामध्ये बदल करुन व्याजाचे दर कमी केल्यास आणि सरकारचे पाठबळ मिळाल्यास येथील उद्योजक स्वतःचा ब्रँड तयार करतील, असा आशावाद व्यक्त केला. यासाठी मोठ्या कंपन्यांनी लघू उद्योजकांना मदत करावी, अशा अपेक्षाही व्यक्त झाल्या.
पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा
पंतप्रधानांनी सुरू केलेल्या शिशू, किशोर आणि तरुण या योजनांचा फायदा उद्योजकांनी होणार आहे. महिला उद्योजकांसाठीही आर्थिक मदत मिळणार आहे. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज शिशू प्रकारात तर किशोर गटासाठी ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. तरुण गटात ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. सर्व लघु, मध्यम उद्योगांना केंद्र सरकार पाठबळ देणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. उद्योजकांनी पुढे आल्यास या योजनेचा अधिकाधिक लाभ होणार आहे. कोल्हापुरातील उद्योजकांची निष्ठा आणि मनुष्यबळाचा विचार करता या योजनेचा मोठ्या प्रमाणात उद्योग जगताला फायदा होणार आहे. त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याची तसेच स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
काय म्हणाले एस. रामास्वामी...
त्यांच्या मदतीला कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात असल्यामुळे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होईल.
इचलकरंजीमध्ये तयार होणारे विविध कंपन्यांचे ब्रॅण्ड मोठमोठ्या शहरात दुप्पट किंमतीत मिळतात.
नवीन उद्योगांच्या माध्यमातून दर्जा निर्माण करणे आणि रोजगारनिर्मिती असे उद्देश ठेवले तर उद्योगांचा झपाट्याने विकास होईल.
कोल्हापुरात अत्यंत कौशल्याने विविध उद्योग साकारले.
आजारी उद्योगांनाही सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार केला पाहिजे.
उद्योजकांनी पायाभूत सुविधांवरही भर दिला पाहिजे.
उद्योजकांची उद्योग उभारण्याची क्षमता असेल तर त्यांना बँक आणि इतर गोष्टीही उपलब्ध होतील.
उद्योगांच्या विस्तारासाठीही आता
बँका आर्थिक मदत करत आहेत.
फाउंड्री, इंजिनीअरिंग, वस्त्रोद्योगाची मोठी परंपरा शहराला लाभली आहे. या तीनही क्षेत्रात निर्माण झालेल्या वस्तू जगातील बाजारपेठेत जात असल्या तरी त्यांचे ब्रँडिंग करण्यात अपयश आले आहे. या सर्व उद्योगांना पायाभूत सुविधा मिळाल्या असत्या तर ब्रँडिंग करणे शक्य होते. येथे निर्माण झालेल्या वस्तूंना ब्रँडिंग मिळवून देण्यासाठी औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांचे सेमिनार, मेळावे आणि उद्योगांना पूरक प्रदर्शने आयोजित करण्याची गरज आहे. अॅक्शन प्लॅन तयार करुन राजकीय, सरकारी व उद्योजकांनी पुढे येऊन रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता आहे.
- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक
स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या मालाला मार्केटिंगची आवश्यकता असते. येथील उद्योग हा फाउंड्रीवर अधारित असल्याने मल्टीनॅशनल कंपन्यांना माल पुरवला जातो. जॉबवर आधारित असलेल्या उद्योगात ब्रँडिंग करण्याची संधी मिळत नाही. सध्या उद्योजकांना अजूनही मंदीच्या झळा सोसाव्या लागत असल्याने सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल केल्यास येथे उत्पादित होणाऱ्या मालाचे ब्रँडिंग करणे शक्य आहे.
- अजित आजरी, अध्यक्ष, गोशिमा
९० टक्के उद्योजक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना माल पुरवठा करतात. यामुळे मुंबई, अहमदाबादमध्ये विविध प्रॉडक्टची निर्मिती दिसून येते. येथे संपूर्ण प्रॉडक्ट तयार होत नसल्याने ब्रँडिंग करता येत नाही. पूरक मालाचा पुरवठा केला जात असल्याने येथे तयार होणाऱ्या मालाची जाहिरात करता येत नाही. उद्योजकांना पाठबळ देण्याबरोबरच उद्योजकांनी जॉबवर्क करणे बंद करायला पाहिजे. फाउंड्री, कास्टिंग यापेक्षा मॅन्युफॅक्चरिंगला प्राधान्य द्यायला हवे.
- मोहन मुल्हेरकर, उद्योजक
येथील लघू उद्योजक मोठ्या कंपन्यांवर अवलंबून आहेत. ब्रँडिंग तयार करण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. अनेकदा पतधोरण जाहीर केले जाते. मात्र त्याचा लाभ उद्योजकांना मिळत नाही. विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी व्याजदरामध्ये सूट मिळण्याची आवश्यकता आहे. भारतातील उद्योजकांसाठी दहा ते बारा टक्के व्याजदर आकारला जात आहे. यामुळे स्वतःचे उत्पादननिर्मितीत अडचणी येत आहेत.
- डी. डी. पाटील, माजी अध्यक्ष स्मॅक
म्हादबा मेस्त्री, करजगार, रॉकेट इंजिनीअरिंग यांसारख्या उद्योगांनी स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. मात्र येथील फाउंड्री उद्योग मोठ्या उद्योगाला पूरक आहे. पूरक उद्योगापेक्षा टेक्नॉलॉजीमध्ये बदल करत प्रॉडक्ट निर्मितीवर भर दिला पाहिजे. त्यासाठीची मानसिकता तयार करायला हवी. कोल्हापुरात अनेक उद्योजकांनी स्वतःचा ब्रँड तयार केला, मात्र त्यानंतर टेक्नॉलॉजीत आवश्यक बदल केल्याने यामध्ये त्यांची पिछेहाट झाली. स्वतःचा ब्रँड तयार करताना बदलते तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज आहे.
- देवेंद्र दिवाण, उद्योजक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट