म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक व रोजभाराभिमुख शिक्षणाची गरज असल्याची स्थिती सार्वत्रिक आहे. मात्र शिक्षण रोजगाराभिमुख असले पाहिजे, पण त्याला नैतिकतेचे अधिष्ठान असले पाहिजे असे मत आजच्या तरुणाईचे आहे. 'शिक्षण रोजगाराभिमुख असावे की नसावे' याविषयी 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित 'मटा डिबेट'मध्ये शिक्षणामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. पण कल्पनाशक्तीचे रुपांतर व्यवहारात करणारे शिक्षण हवे असे मत तरुणाईने व्यक्त केले.
सानिया शानेदिवाण : हल्लीची पिढी पदवीनंतर रोजगारासाठी झगडते हे चित्र पहायला मिळते. आपण सर्वजण प्रॅक्टिकल व्हायला लागलो आहे. मात्र ज्ञानामुळे आपण इगोइस्ट होता कामा नाही. शिक्षण घेतल्याबरोबर आपण स्वतःच्या विचार करताना स्वार्थी न बनता समाजाचही विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती शिकत असताना समाजाचा विचार करते. पण पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेल का? याची हमी मिळाली पाहिजे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी स्वतः सॉफ्ट स्कीलमध्ये पारंगत झाले पाहिजे. सॉफ्ट स्कील विकसित करण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी कॉलेजांत नवीन कोर्सेस शिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. महाविद्यालयात बी व्होकेशनल कोर्सेस आहेत. पण त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात नाही. या कोर्सेसबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणिव निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते, यासाठी कॉलेजांनी पुढाकार घेऊन त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे. सध्याच्या शिक्षणामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र, त्याचे रुपांतर व्यवहारात करणारे शिक्षण हवे. मराठी, हिंदी व इंग्रजीतून पदवी मिळालेल्या विद्यार्थ्याला कथा, लेख, संवाद कसे लिहायचे हे शिकवले पाहिजे. संगणकाचे बेसिक ज्ञानाऐवजी अॅडव्हान्स शिक्षण दिले पाहिजे.
कोमल भंडारी : इंजिनीअरिंग, मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी भरमसाठ फी असते. पण त्यातून रोजगार मिळतो. मात्र आटर्स व कॉमर्समधून शिक्षण घेतल्यानंतर सहा ते सात हजार रुपयांची नोकरीच मिळणार. शिक्षणातून चांगला रोजगार मिळेल याची हमी नाही. त्यामुळे पुस्तकी ज्ञान मिळावे पण त्याचबरोबर चांगला रोजगार मिळावे, असे शिक्षण मिळाले पाहिजे.
गीता कुलकर्णी : पारंपरिक शिक्षण हे व्यवसायभिमुख झाले पाहिजे. पण शिक्षणातून नैतिक मूल्ये मिळणे हे सर्वात महत्वाचे आहे. पदवीच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता आली पाहिजे. कोणत्या मार्गाने जायला पाहिजे आणि तो मार्ग कसा आहे याचे भान शिक्षणातून मिळाले पाहिजे. शिक्षणातून नैराश्य येता कामा नये. शिक्षणातून व्यावहारिक शहाणपण आले पाहिजे, ज्याचा उपयोग स्वतःसाठी व समाजासाठी झाला पाहिजे.
शिवप्रसाद खतकर : शिक्षण घेतल्यानंतर त्याचा वापर करून पैसा मिळाला पाहिजे, अशी प्रत्येकाची भावना असते. मात्र पैशाच्या
मागेच धावायचे यासाठी शिक्षण हवे का? याचा विचार होण्याची गरज आहे. शिक्षणाला नैतिकतेची जोड मिळाली पाहिजे तर समाजाचे स्वास्थ टिकेल.
सागर माने : बारावीनंतर शिक्षणातून रोजगार कसा मिळेले याचे शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी कौशल्ये विकसित करणाऱ्या शिक्षणाचा समावेश केला पाहिजे. बँकिंग, शेती, तंत्रज्ञान, औद्योगिक प्रशिक्षण दिले पाहिजे. पारंपरिक शिक्षण आवश्यक आहे, पण त्यात अधिक वेळ जाता कामा नये. पदवीनंतर विद्यार्थी नोकरी, व्यवसायासाठी सज्ज झाला पाहिजे, असे शिक्षण देण्यासाठी सरकारी पातळीवर आणि कॉलेजांच्या पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.
सूरज चौगुले : नोकरी मिळावी म्हणून विद्यार्थी शिक्षणाच्या मागे धावतात. त्यातून शिक्षणाचा बाजार झाला आहे. शिक्षणातून ज्ञान मिळवायचे आहे. या ज्ञानातूत स्वतःबरोबर समाज घडवायचा आहे हे समाज विसरत चालला आहे हे चित्र बदलायला हवे.
सुचित निकम : शिक्षणाशिवाय रोजगार मिळणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शिक्षण हे घेतलेच पाहिजे. शिक्षण कोणते घ्यावे, कोणती विद्याशाखा निवडावी याचे भान शिक्षणातून मिळाले पाहिजे.
स्वप्नील वाकडे : रोजगारभिमुख शिक्षणाची व्याख्या ठरवली पाहिजे. पदवीपर्यंच्या शिक्षणानंतर सरकारने नोकरी मिळेल असा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. जो गुणवत्ता सिद्ध करेल, त्याला काम मिळेल अशी शिक्षणप्रणाली हवी. शिक्षणातून रोजगार मिळणार की नाही अशा संकुचित विचाराने याकडे पाहू नये. तर शिक्षणाने विद्यार्थी ज्ञानी होईल, या ज्ञानाचा वापर विद्यार्थ्याला आणि समाजाला होईल याचा विचार शिक्षण प्रक्रिया राबवताना झाला पाहिजे.
भाग्यश्री रेडेकर : रोजगार मिळावा हे शिक्षणाचे ध्येय नसावे. आजही पारंपरिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण घेणारे विद्यार्थी वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसते. ते आत्महत्येसारखा टोकाचा विचार करतात. शिक्षणातून जगण्याचे प्रयोजन सांगितले पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थ्याचे बौध्दिक सामर्थ्य वाढले पाहिजे. बौध्दिक सामर्थ्यामुळे विद्यार्थी रोजगाराची वाट स्वतः चोखाळण्यास सिद्ध होईल अशा शिक्षणाची गरज आहे.
धीरज कटारे : शिक्षण घेताना वैचारिक पातळी वाढली पाहिजे. आपण शिक्षण घेतल्यानंतर ज्या ठिकाणी काम करत आहे, तिथे आपले आर्थिक शोषण होते का? याचा विचार करण्याची पात्रता शिक्षणाने मिळाली पाहिजे. विचारांच्या जोरावर बदल होतात. सध्या स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया अशा योजनांची घोषणा सरकारने जाहीर केली आहे. या योजना यशस्वी व्हायच्या असतील, तर त्याप्रमाणे अभ्यासक्रम असला पाहिजे.
कोमल यादव : सध्या देशाला १० लाख कुशल व्यक्तींची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन शिक्षणप्रणाली राबवली पाहिजे. कौशल्य असलेल्या मनुष्यबळाने भारत महासत्ता बनणार असल्याने रोजगार आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे.
अरुणा आरडे : गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे शिक्षण ही रोजगार शोधण्याची जननी आहे. आपल्या कुटुंबाला स्थैर्य मिळवण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे. स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाचा विकास होऊ शकतो. त्यासाठी कॉलेजांत स्कील डेव्हलपमेंट होणारे शिक्षण हवे. जर कॉलेजांत स्कील डेव्हलपमेंटसाठी संधी नसेल तर ती स्वतः शोधण्याण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रवाहाबरोबर जायचे की प्रवाहाविरुद्ध जायचे इतका आत्मविश्वास शिक्षणातून मिळाला पाहिजे.
अभिजित चव्हाण : स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी कॉलेजांमध्ये सोय केली गेली पाहिजे तरच याचा फायदा होईल.
स्वस्तिक जिद्रे : भारत शेतीप्रधान देश आहे. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. महात्मा गांधीनीही खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. पण आज सगळे शहराकडे धावत आहेत. शेतीला पूरक उद्योग लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण दिले पाहिजे. शेतीतून पर्यटन, उद्योग अशा अभ्यासक्रमांचा समावेश केला जायला हवा.
बौध्दिक सामर्थ्यामुळे विद्यार्थी रोजगाराची
वाट स्वतः चोखाळण्यास सिद्ध होईल
कम्प्युटरच्या बेसिक्सऐवजी अभ्यासक्रम
आजच्या काळानुसार अॅडव्हान्स करा
शेतीला पूरक उद्योगांसाठीचे अभ्यासक्रम करावेत
बँकिंग, शेती, तंत्रज्ञानासह औद्योगिक प्रशिक्षण द्या
प्रचलित शिक्षणातील नैतिक मूल्येही तपासा
सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंटसाठी शिक्षण मिळावे
सध्याचे शिक्षण व्यवहारात जगायला शिकवत नाही. शिक्षणाने रोजीरोटीचा प्रश्न पहिल्यांदा सोडवला पाहिजे. शिक्षणाने जगता आले पाहिजे. पूर्वी ज्ञानासाठी शिक्षण घेतले जात असले तरी शिकल्यामुळे नोकरी मिळते याची शाश्वती होती. सध्या काळ बदलला आहे. व्यवस्था बदलली आहे. पारंपरिक शिक्षणाने रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध होतात. त्यामुळे चार भिंतीतील शिक्षणाबरोबरच चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण महत्वाचे आहे.
- डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य
शिक्षण म्हणजे साक्षर होणे नसून शहाणे होणे असे आहे. शिक्षणातून जगायचे कसे हे शिकवले पाहिजे. शिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ते जगण्यासाठी उपयुक्त असले पाहिजे. त्यासाठी धोरणे आखली पाहिजे. एकवीसाव्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सुसंस्काराची जोड असली पाहिजे.
- डॉ. डी. ए. देसाई
श्रमाला प्रतिष्ठा देणारे शिक्षण हवे. पारंपरिक शिक्षणाला व्यवसाय, रोजगाराची जोड दिली पाहिजे. तसे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. भूगोलच्या विद्यार्थ्याला टूरिझम, मराठीच्या विद्यार्थ्याला भाषांतराचे कौशल्य शिकवले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी शिकत-शिकत कौशल्ये विकसित करतील. ज्ञानाची पातळी उंचावून श्रमाला प्रतिष्ठा मिळेल.
प्रा. एच. पी. पाटील
सध्याच्या शिक्षणाने खऱ्या अर्थाने रोजगार प्राप्त होतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. पदवी शिक्षणानंतर बेकारांचे तांडे बाहेर पडत आहेत. युवकांच्या उर्जेला वाट देण्यासाठी बदलत्या व्यवसायिक शिक्षणाची जोड दिली पाहिजे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल, देश बड्या राष्ट्रांच्या पंगतीत बसू शकेल.
प्रा. संदीप पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट