देशात कुठेही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला झाला की, ऐरणीवर येणाऱ्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेतील महत्वाचा टप्पा असलेल्या मंदिर परिसर फेरीवालामुक्तीचा प्रश्नही चर्चेला येतो. आजपर्यंत अनेकदा मंदिराभोवतीच्या परिसरातील फेरीवाल्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची घोषणा झाली. दहशतवादाच्या गांभीर्याची धूळ खाली बसली की, त्यासोबत मंदिर सुरक्षेचाही मुद्दा आपोआप मागे पडतो. आता पुन्हा मंदिर 'नाे फेरीवाला झोन' करण्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पण खरोखरच अंबाबाई मंदिर परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटेल का? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. त्यासाठी निर्णयाला कठोर अंमलबजावणीची जोड गरजेची आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे सुरक्षेतील महत्वाचा असलेल्या 'नाे फेरीवाला झोन' या निकषपूर्तीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मंदिराच्या पूर्वेला सतत वर्दळीचा भाऊसिंगजी रोड जोडला आहे. तर पश्चिमेला महाद्वार रोड आणि ताराबाई रोड ही शहराची मुख्य बाजारपेठ लागून आहे. मंदिराची दक्षिण बाजू सध्या पार्किंगसाठी वापरण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी बंद असली तरी सरकारी कार्यालय, शाळा, दुकानगाळे आणि हॉटेल्समुळे या परिसरात गर्दीचा ओघ असतो. उत्तरेला फूलबाजार आणि जोतिबा रोड मार्केटचा विळखा आहे. दक्षिण आणि पूर्व दरवाजाबाहेर आल्यानंतर भवानी मंडपात भरणाऱ्या 'बाजारा'तून वाट काढण्याची कसरत पर्यटक भाविकांना करावी लागते.
चारही बाजूने अतिक्रमण आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेला अंबाबाई मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून भाविकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सध्या मंदिर परिसरातील शंभर आणि पन्नास मीटर परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाद्वारात बसणाऱ्या चिंच, आवळे विक्रेत्यांनाही प्रशासन आजपर्यंत कायमस्वरूपी हटवू शकलेले नाही, तिथे वर्षानुवर्षे मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालावी तसे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अंमलात कसा येईल हा प्रश्न आहे.
भवानी मंडपचे काय?
अंबाबाई मंदिराच्या शंभर मीटर आवारात असलेल्या भवानी मंडपचा परिसर सध्या फेरीवाल्या आणि रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांच्या गर्तेत अडकला आहे. भवानी मंडपाची जागा ही छत्रपती ट्रस्टची असल्यामुळे तेथील विक्रेत्यांचा प्रश्न हा ट्रस्टच्या सहकार्याने हाताळावा लागणार आहे. सध्या याठिकाणी ज्या जागेत केएमटी थांबा होता तो हटवून दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर क्रीडास्तंभाच्याभोवती बिडाच्या तवेविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. मंडपाच्या कमानीतही फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. तर मेन राजाराम हायस्कूलच्या भिंतीपासून ते रोजगार हमी कार्यालयाच्या भिंतीपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. त्यामुळे मंदिर परिसर 'ना फेरीवाला क्षेत्र' करण्याच्या मोहिमेत भवानी मंडपाचे काय होणार हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
माल बाहेर...गाळा आत
महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड परिसरात हातगाडीवर वस्तू विकणाऱ्या ८० टक्के फेरीवाल्यांचे याच परिसरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहेत. मात्र तरीही गाळ्यांचा वापर गोडावूनसाठी केला जातो आणि माल मात्र हातगाडीवर ठेवून रस्त्यावर विकला जातो. त्यामुळे अशा गाळेधारक फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट