गेल्या दोन वर्षापासून मलकापूर शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. नागरिकांना फिल्टर केलेले पाणी मिळालेलेच नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा खेळ केव्हा संपणार व फिल्टर केलेले शुद्ध आणि दररोज पाणी केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गेल्या दोन वर्षापासून या बाबीकडे तातडीची गरज म्हणून फारसे गांभिर्याने पाहिल्याचे चित्र नागरिकांना पहावयास मिळालेले नाही. लोकप्रतिनिधीपैकी घरांमध्ये पाण्याच्या बोअर्स असल्यामुळे नागरिकांचा हा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न ठोस उपाययोजनाअभावी तरंगत असल्याचे नागरिक बोलून दाखवीत आहेत.
पाणीयोजनेचे फिल्टर हाउस बंद असल्याने नागरिकांना फिल्टर केलेले पाणी मिळालेले नाही. या फिल्टरमध्ये बेड असलेल्या ठिकाणची वाळू संपलेली आहे शिवाय त्यामध्ये गाळही साचलेला आहे. सोळा मे च्या पालिकेच्या बैठकीत संबधित ठेकेदाराला या कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतर सध्या या फिल्टरमधला गाळ व वाळू बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दररोज फिल्टर केलेले पाणी पुरविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु तीन आठवडे उलटून गेले तरीही नागरिकांना दररोज पाणी मिळालेले नाही.कडवी नदीच्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये म्हणून नगरपालिकेने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नागरिकांना केवळ पिण्यासाठी पाणी म्हणून दहा दिवसांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट