साखरेचे दर सध्या कमालीचे घटल्याने राज्यातील साखर कारखानदारी भयंकर आर्थिक संकटातून जात आहे. हीच अवस्था कायम राहिली तर पुढील हंगामाच्यावेळी ५० टक्क्यांहून अधिक साखर कारखाने बंद ठेवावे लागतील, अशी चिंता साखर कारखानदार व्यक्त करीत आहेत.
सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन २१०० रुपयांच्या आसपास दर दिला आहे. तर बाजारात साखरेचे भाव १९०० रुपयापर्यंत खाली आहे आहेत. हा फरक कसा भरून काढायचा? असा या साखर कारखान्यांचा प्रश्न आहे. या परिस्थितीमुळे राज्य सहकारी व जिल्हा जिल्हा बँक साखरेवर कर्ज द्यायला तयार नाही. सहाजिकच कारखानदारांची स्थिती आणखी कठीण होऊन बसली आहे. या साखर कारखान्यांतील साखरेचे प्रचंड साठे बाहेरही काढता येत नाहीत. कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचे मासिक पगार करणे अवघड होऊन बसले आहे. साखर कारखान्यांची इतकी वाईट स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. राज्य व केंद्र सरकार या कारखान्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. जणू या सरकारला महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायची आहे, असेच त्यांचे धोरण दिसते. सद्य:स्थितीत एपआरपी प्रमाणे ऊस दर देणे अशक्य कोटीतील गोष्ट होऊन बसली आहे. ज्या साखर कारखान्यांचे वीज प्रकल्प आहेत, डिस्टिलरी आहे ते कसे तरी तग धरून आहेत. पण, जे केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहेत ते कसे टिकणार? हा गंभीर प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी प्रति टन ऊसाला २५०० रुपयांच्या आसपास दर दिला आहे, त्यांची स्थिती तर आणखी वाईट झाली आहे. त्यांचे पुढील गळीत हंगाम कसे सुरू होणार, हे आव्हान त्यांच्यासमोर आहे. बहुतेक सर्वच साखर कारखान्यांची प्रचंड प्रमाणात देणी थकली आहेत. बिले लवकर मिळत नाहीत म्हणून माल पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे. काही व्यापाऱ्यांनी तर 'आधी पैसे टाका, मग माल घेऊन जावा' असे धोरण त्यांनी ठेवले आहे.
बाजारपेठेत साखरेला उठाव नाही
जागतिक बाजारातही साखरेचे दर मंदीत आहेत. साखरेचे उत्पादन भरमसाठ झाले असून, शिल्लक साठेही पडून आहेत. देशात साखरेला म्हणावा तेवढा उठाव नाही. त्यातच कमी दरात साखर विकणे म्हणजे आर्थिक झळ सोसणे अशी त्यांची अवस्था होऊन बसली आहे. एकूणच साखर उद्योगावरील मंदीचे हे काळे ढग केव्हा व कसे नाहिसे होणार इकडे या कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट