म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश देणे गरजेचे असताना काही संस्था नियमाची पायमल्ली होत आहे. त्यामुळे यानुसार मोफत प्रवेश देण्यावर शिक्षण विभागाने विशेष लक्ष देऊन अशा विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. प्रवेश व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न व वादाच्या मुद्यांबाबत सोमवारी (१५ जून) संस्थाचालक, अधिकारी व शिष्टमंडळाची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवाजी चौकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. उपसंचालक एम. के. गोंधळी कार्यालयात नसल्याचे समजले. मोर्चाबाबतची पूर्वकल्पना दिलेली असतानाही गोंधळी उपस्थित नसल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर संपत गायकवाड व पोतदार या अधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली.
प्रवेश प्रक्रिया सुरू असताना काही संस्थांकडून लूट सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या संस्था लाखोंची देणगी गोळा करत आहेत. त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, प्रमुख मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सर्व शाळांत केंद्रीय प्रवेश परीक्षा पारदर्शीपणे राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे, अर्जाची किंमत नाममात्र असावी, पुस्तिकेची किंमत विद्यार्थ्यांवर लादू नये, विनाअनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांवर फी लादणाऱ्या संस्थाचालकांची चौकशी करुन कारवाई करावी, अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशावेळी देणगीतून होणारी लूट थांबवावी, विनाअनुदानित तुकड्या बंद कराव्यात, शुल्काची पावती द्यावी, प्रवेशाला ८५ टक्के कोटा ड्रॉसाठी असावा तर १५ टक्के कोटा मॅनेजमेंटसाठी असावा, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात दहावी, बारावी निकाल एप्रिल किंवा मेमध्ये जाहीर करतात. त्यानंतर लगेच पुरवणी परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल जाहीर करतात. त्यांना त्या वर्षी पुढील वर्गासाठी प्रवेश घेण्यात येतो. ही पद्धत महाराष्ट्रात राबवावी, अशा महत्त्वाच्या मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या.
आंदोलनात दक्षिण शहर प्रमुख शिवाजी जाधव, उत्तर शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, किशोर घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
'शाळेचे आरक्षण उठवू नये'
रमणमळा येथील शाळेचे आरक्षण असलेल्या जागेभोवती एका बांधकाम व्यावसायिकाने बेकायेदशीर कुंपण घातले आहे, तसेच हे आरक्षण उठवण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, नगरविकास विभागचे सचिव आणि कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट