कसबा बावडा परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरातील दुर्गंधी, रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रकार आणि अस्वच्छतेमुळे संतप्त झालेले नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांना तीन तास रोखून धरले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना करण्याची ग्वाही दिल्यानंतर नागरिकांनी आंदालन मागे घेतले.
शहरात रोज १७० टनांपेक्षा जास्त कचरा जमा होतो. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जागा मिळेल तेथे कचरा टाकला जातो. रविवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. सुनील जाधव, नमजान शेख, इंदूमती कांबळे, अभिजित कांबळे, नितीन कसबेकर, भाग्येश कोंडूसकर आदींचा आंदोलनात समावेश होता.
त्यांनी प्रकल्पस्थळी जाऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवक चंद्रकांत घाटगे, उपमहापौर मोहन गोंजारे हेही आले. मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील घटनास्थळी आले. नागरिकांनी अधिकारी आणि नगरसेवकांसमेर तक्रारींचा पाढा वाचला. कचऱ्याचे डोंगर निर्माण झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आरोग्य विभागाकडून औषध फवारणी होत नाही अशा तक्रारी केल्या. आयुक्त घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांना रोखून धरले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट