दिग्विजय कुंभार, शाहूवाडी
पारंपरिक व्यवसाय, भटकंती, कौटुंबिक समस्या, दारिद्र्य आणि स्थलांतर अशा कारणांमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. या ज्वलंत प्रश्नाचे गांभीर्य ओळखून सांगली डायटमधील अधिव्याख्याता प्रा. तुकाराम कुंभार यांनी शाळाबाह्य मुलांमध्ये जागृती करण्यासाठी लघुपट तयार केला आहे.
सहा ते चौदा वयोगटातील कोणीही मूल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह भोजन, विविध शासकीय शिष्यवृत्त्या, दत्तक पालक योजना यांसारख्या योजना अंमलात आणूनही शंभर टक्के मुले शिक्षणाच्या प्रवाहात आलेली नाहीत. समाजातील नंदीवाले, डोंबारी, गोसावी, कैकाडी, गारुडी, गोपाळ, गोंधळी, वीटभट्टी व्यावसायिक, बाहेरच्या जिल्ह्यातील ऊसतोड कामगार या सर्वांची गावोगावी भटकंती होत असते. पर्यायाने या समाजातील मुलांची प्राथमिक शिक्षणाची हेळसांड होते. शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजमन जाणारे उपक्रमशील प्रा. तुकाराम कुंभार यांनी अशा मुलांसाठी लघुपट तयार केला आहे. शिक्षण विभागाने उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.
समाजप्रबोधनाचे ब्रीद असलेल्या या लघुपटात स्वतः प्रा. कुंभार यांनी डोंबाऱ्याची शिवाय प्राचार्य पी. व्ही. जाधव यांचीही भूमिका आहे. डोंबाऱ्याच्या बायकोची भूमिका इस्लामपुरातील प्राथमिक शिक्षिका स्नेहलता पाटील यांनी तर पोतराजाची भूमिका मिरजेतील मोहन शिंदे यांनी केली आहे. कडकलक्ष्मीच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शिक्षिका माया सोनटक्के आहेत. पोतराज समाजातील काही युवक व युवतींनीही यात सहभाग दर्शविला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळणारे सर्जेराव गायकवाड लघुपटात शिक्षणाधिकारी आहेत. या लघुपटातून वंचित मुले व पालकांसाठी शिक्षणाचे महत्व आणि सरकारच्या विविध योजना याबाबतचे प्रबोधन केले आहे.
सहकलाकार म्हणून रेश्मा कुंभार, वैभव बंडगर, अमित कुंभार, सुर्यकांत शिंदे, मधुकर हंकारे, वैभव कुंभार, नामदेव शेळके, नंदकिशोर मासाळ, वैभव आंबी यांनी भूमिका केल्या आहेत.
या लघुपटाच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रबोधन होणार आहे. यातून वंचित समाजातील मुले शैक्षणिक प्रवाहात येण्यास निश्चित मदत होईल. हा लघुपट एक दिशादर्शक पाऊल ठरेल.
- पी. व्ही. जाधव, प्राचार्य, डायट
शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या लघुपटासारखी आधुनिक कौशल्य यंत्रणा निश्चितच प्रबोधन करेल. शासनाचा हेतू सफल करण्यासाठी ही धडपड आहे.
- प्रा. तुकाराम कुंभार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट