भाजपच्या दोन दिवसांच्या कार्यकारिणी बैठक आणि अधिवेशनाचा समारोप झाला; पण या दरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस लपून राहिली नाही. सुरूवातीपासून मनात मुख्यमंत्रिपदाची आस बाळगून असलेले एकनाथ खडसे यांनी नेत्यांवर तोफ डागत दुसऱ्या दिवशी अधिवेशनालाच दांडी मारली. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती आणि नाराजी चर्चेचा विषय होती.
भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक आणि अधिवेशन जोशात पार पडले. एकमेकांना चिमटे घेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती आरोप करत भाजपच्या नेत्यांनी स्वकीयांनाही सुनावले. प्रत्येक नेत्याने आपल्या खात्याचा लेखाजोखा मांडताना गेल्या सहा महिन्यांत कसा चांगला कारभार केला याचा सातबाराच मांडला; पण एवढे करूनही नाराजी असल्याबाबत खंत व्यक्त केली.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 'शेतकरी मोबाइलचे बिल भरतात मग लाइटचे बिल का भरत नाहीत?' असा सवाल केल्यानंतर उठलेल्या वादंगाचा समाचार घेतला. शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या, कर्जे माफ केली तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. आता यावर कुणीतरी उपाय सुचवावा, असे वक्तव्य केले. खडसे तसे रोखठोक बोलणारे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे इशारा करत कितीही चांगले काम केले तरी, केवळ काही लोकांनाच माध्यमांचे प्रेम मिळते. आमच्या नशिबी जास्त प्रेम असल्यामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळते, असा टोला लगावला.
'मुंबई महापालिका एकत्रच लढणार'
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र येऊनच लढणार आहे. शिवाय राज्यातील अन्य महापालिकांमध्ये स्थानिक जिल्हा कमिट्यांना अधिकार देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने ताकद समजली, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी शनिवारीच केले होते. त्यावर ते म्हणाले, 'युती तुटावी असे कुणालाच वाटत नव्हते, अगदी शेवटच्या टप्प्यात युतीबाबत निर्णय झाला आणि सर्व जागा लढवाव्या लागल्या. खूप कमी कालावधीत तयारी करून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागला.'
काँग्रेस सत्तेची दलाल, भाजप सेवक
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकार हे सत्तेचे सेवक नव्हते तर ते सत्तेचे दलाल होते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपले सरकार सत्तेचे सेवक असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र व राज्य सरकारवर उपाहात्मक टीका होत असताना भाजप कार्यकर्त्यांनी बचावत्मक भूमिकेत न राहता सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती घराघरात जाऊन लोकांना पटवून द्या. त्यांचे जीवनमान उंचावण्यास प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. फडणवीस म्हणाले, 'पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करून जनतेला ओरबाडण्याचे काम केले. त्यामुळे राज्यातील जनतेने भाजपला मोठा पक्ष म्हणून संधी दिली. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी व गतीमान कारभार हेच सरकारचे ध्येय आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट