कमी जागा, नवीन जागा मिळण्यात अनेक अडचणीमुळे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानामध्ये रिसायकल पद्धतीने दफनविधी करण्याची पद्धत अवलंबली जात आहे. मूळ जागेत पाच ते सहा वर्षानंतर पुन्हा त्याच जागेत दफन केले जाते. दफनभूमीत सर्वांसाठी समानतेचे तत्त्व अवलंबिण्यात आले आहे.
बागल चौक, कसबा बावडा व रमणमळा येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. मात्र, बागल चौकातील पाच एकर जागेतील कब्रस्तानातच गेली शंभरहून अधिक वर्षे दफन केले जाते. पूर्वी विविध व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांच्या नावाने स्मशानभूमीत जागा आरक्षित होती. आई, वडील, मुले, मुली, आजी, आजोबा अशांच्या कबरी होत्या. मात्र लोकसंख्या वाढल्याने दफनभूमीसाठी जागा कमी पडू लागली. बागल चौकातील कब्रस्तानातून चार नाले गेले आहेत. त्यापैकी दोन नाल्यांचे सपाटीकरण करून जागा दफनासाठी उपयोगात आणली गेली. तरीही जागा कमी पडू लागली.
बागल चौक कब्रस्तानाचे व्यवस्थापन मुस्लिम बोर्डिंगकडे आहे. शंभर वर्ष जुन्या असलेल्या सर्वसामान्यांबरोबर श्रीमंत, साहित्यिक, नामवंत व्यक्तींच्या कबरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सुरवातीला विरोध झाला. मात्र जागेचे महत्व लक्षात घेऊन विरोध मावळला. अनेकांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुस्लिम बोर्डिंग ठाम राहिली. बोर्डिंगच्या मालकीची जागा असल्याने सर्व कबरी हटवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. पाच एकरात ३६०० प्लॉट पाडण्यात आले. प्रत्येक प्लॉटकडे जाण्यासाठी पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता करण्यात आला आहे. ज्या प्लॉटमध्ये दफन केले जाते त्याच प्लॉटमध्ये पाच ते सहा वर्षांनी पुन्हा नव्या मृतदेहाचे दफन केले जाते. पूर्वी दफन केल्यावर मीठाचा वापर करून फरशी टाकली जात होती. सध्या मीठाचा वापर बंद केला गेला आहे. फरशीऐवजी लाकडाच्या फळ्या टाकल्या जातात. महिन्याला सुमारे ३० ते ३५ मृतदेहांचे दफन केले जाते.
मुस्लिम बोर्डिंगने ४५० नारळाची झाडे लावून कब्रस्तानाचे सुशोभिकरण केले आहे. दफनविधीवेळी नमाजासाठी हॉल बांधण्यात आला आहे. तसेच स्वच्छतागृह, पाण्याची सोय केली आहे. महानगरपालिकेच्यावतीने विद्युत व्यवस्था केली आहे. कब्रस्तान विकास समितीचे अजिज जमादार, साजिद खान, जावेद बागवान, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी स्मशानभूमीचे काम पाहतात.
गरीबांचा खर्च महापालिकेने उचलावा
मृत व्यक्तीच्या दफनविधीचा खर्च त्यांच्या वारसांनी करावा अशी धार्मिक शिकवण आहे. सध्या दफनविधीचा खर्च सुमारे १८०० रुपये येतो. बेवारस व गरीब लोकांचा खर्च मुस्लिम समाजाच्यावतीने केला जातो. महानगरपालिकेने यातील काही खर्च उचलावा, अशी मागणी मुस्लिम धर्मियांची आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट