'सर्वच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन काळाची गरज आहे हे माहीती असूनही आपल्या देशात साडेतीन टक्के ऊसाचे क्षेत्र असताना उपलब्ध पाण्याच्या पन्नास टक्के पाणी केवळ उसासाठी वापरले जाते. जर सर्वच पिकांसाठी ठिबक सिंचनचा वापर झाल्यास शेतकरी उसासह सर्वच पिकांत क्रांती करेल,' असे प्रतिपादन राज्याचे कृषि संचालक (फलोत्पादन)डॉ. सुदामराव आडसूळ यांनी केले. ते कसबा सांगाव (ता.कागल) येथे दूधगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी कृषि विभागाचे संचालक नारायण सिसोदे होते.
डॉ. आडसूळ म्हणाले, 'उसासाठी पाणी देण्याची 'डुबुक' पध्दती फायदे तोटे आता माहीती असूनही सर्रास वापरली जाते. ज्याचा परिणाम उत्पादन कमी होण्यावर होतो. तुलनेने असे असूनही कोल्हापूरची उत्पादकता अजूनही बऱ्यापैकी आहे. परंतु भविष्यात ठिबक सिंचनशिवाय पर्यायच उरणार नाही. रासायनिक खतांचा पिकांना योग्य डोस मिळायचा असेल आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर ठिबक सिंचनाचा प्रसार वेगाने होणे गरजेचे आहे. तरच अतिपाण्यामुळे खराब होणाऱ्या जमिनी आपण वाचवू शकू.'
संस्थेचे चेअरमन बाबासो लबाजे म्हणाले, '१९९१ साली नोंदणी झालेल्या या संस्थेत १२५ सभासद आणि ४०० एकर क्षेत्र आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे संस्था ९७ साली उशीरा कार्यान्वित झाली. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्यामुळे संस्था निर्माण झाली. आता १२० एकरावर ठिबकची सुरवात केली आहे.'
'नेटाफिम'चे अरुण देशमुख म्हणाले,'निचरा होणाऱ्या ठिकाणी सेंद्रीय खतांचा वापर करुन ठिबक वापरल्यास हमखास उत्पादन वाढते. यासाठी सरकार, शेतकरी, कारखानदार आणि कंपनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे.' यावेळी शैलेश लंबे,फेडरल बँकेचे व्यवस्थापक थॉमस पी मॅथ्यू, राजकुमार माळी, अश्विनी पोळ यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी उपविभागीय कृषि अधिकारी विजेंद्र धुमाळ,तालुका कृषी अधिकारी संजय वाघमोरे, विकास सोनवणे, आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट