म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
उन्हाच्या तडाख्यात ठिय्या आंदोलनास बसून महिनाभर लोटला तरी चांदोली धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड उपेक्षा सुरू आहे. बहुतांशी ५० वयापेक्षा जास्त वयाच्या आंदोलकांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर उन्हात त्यांची झालेली परवड सहज लक्षात येते.
पण मागण्या अंशी सोडवण्याचा सहानुभूतीपूर्वक विचारच झालेला नसल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची संवेदनशीलताच संपल्याची संतापजनक भावना व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी पातळीवरुन काही हालचाली होत नसल्याने पुनर्वसन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत एक पाऊलही पुढे टाकले नसल्याने गुरुवारी मोर्चा काढला. यावेळी आठ दिवसात पुनर्वसन कार्यालयातील प्रलंबित मागण्यांची सोडवणूक झाली नाही तर त्यानंतर जिल्ह्यातील धरणांची कामे बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रशासन, पुनर्वसन कार्यालय, वन विभाग अशा तीन टप्प्यांवर असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी २५ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जात आहे. या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतलेली नाही. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर चर्चा होऊन मंत्रालयात बैठक घेण्याबाबतचे तोंडी आश्वासन दिले जात आहे. मंत्रालय पातळीवर निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या पातळीवरील मागण्यांची पूर्तता करता आली असती. पण त्याबाबत केवळ तारखांचा ताकतुंबा सुरू असून एकाही मागणीबाबत विचार झालेला नाही, असा संताप आंदोलकांमधून व्यक्त केला जात आहे. जेवणाची व्यवस्था मारवाडी समाजाच्या दानशूरांनी केली असली तरी उन्हाच्या झळा अंगावर झेलत फुटपाथवर दिवस काढावा लागत असल्याने सुरुकतलेल्या चेहऱ्यावरील शिल्लक आशाही मावळत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र प्रशासनाची हीच पद्धत आंदोलकांमधील संताप वाढवत आहे.
पुनर्वसन अधिकाऱ्यांनी याआधी मागण्यांबाबत दोन तारखा दिल्या. पण मागणीतील एकाचीही सोडवणूक झालेली नाही. यामुळे दुपारी रणरणत्या उन्हात या आंदोलकांनी वन विभागाच्या कार्यालयाकडून कसबा बावडा रोडवरील पुनर्वसन कार्यालयासमोर मोर्चा काढला. संपत देसाई, मारुती पाटील, डी. के. बोडके आदींच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयात चर्चेसाठी कार्यकर्ते गेले तरी तिथे पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी नव्हते. ते आल्यानंतर आंदोलकांशी चर्चा झाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट