म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
स्वच्छ व सुंदर परिसर आणि निरोगी आरोग्य हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे अशा विचाराने प्रेरित होऊन कोल्हापुरातील देवकर पाणंद येथील काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी 'वुई केअर' नावाचा एक ग्रुप स्थापन केला आहे. या गटात शहरातील विविध वयोगटातील, व्यवसायातील पुरुष व महिला सहभागी झाले आहेत. जलाशय, रस्ते, हवा आणि सर्वच परिसर स्वच्छ असावा यासाठी केवळ सरकार, नगरपालिका, महापालिकांवर अवलंबून न राहता एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल यावर विचारांची देवाणघेवाण करून व व्यवहार्य योजना यशस्वीपणे अंमलात आणणे या प्रमुख हेतूने 'वुई केअर' या गटाची स्थापना केल्याची माहिती संजय पाटील व अरुण राजाज्ञा यांनी येथे दिली.
'गुढी पाडव्यादिवशी स्थापन झालेल्या या ग्रुपने देवकर पाणंदमधील विविध नागरिकांशी शहर कचरामुक्त कसे होऊ शकते याविषयी चर्चा केली. त्यामधून छोटीशी सुरुवात म्हणून प्लास्टिक व सुका कचरा कोंडाळ्यात न टाकता तो स्वतंत्रपणे गोळा करून त्याची निर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असे संजय पाटील यांनी सांगितले.
वाढता कचरा ही मोठ्या मोठ्या शहरांचीसुद्धा डोकेदुखी झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही ही समस्या सुटलेली नाही. कचरा साठवण्यासाठी जागा, त्याचा उठाव व वाहतूक करणे यावर नगरपालिका, महापालिका प्रचंड प्रमाणात खर्च करत असतात. एवढे करूनही शहरातील कचऱ्याची समस्या संपत नाही. उलट कचऱ्यामुळे धोकादायक वायू आणि प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते.स्वच्छता अभियान व कचरामुक्त परिसरसाठी जगभर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपल्या देशात सोयीचा आणि कमीतकमी खर्चाचा इलाज शोधून नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग करण्यासाठी काही संस्था धडपडत आहेत. या संस्थांपैकी 'अवनि', 'एकटी' आणि 'माझे कोल्हापूर' या तीन संस्था कोल्हापूर शहर हे पूर्णतः कचरामुक्त करण्यासाठी एकत्र आल्या आहेत, अशी माहिती राजाज्ञा यांनी दिली.
उपक्रमाची सुरुवात म्हणून गेल्या रविवारी प्लास्टिक व इतर सुका कचरा (सर्व प्रकारचे कागद, औषधाच्या गोळ्यांचे कव्हर्स, चॉकलेटचे कागद इ.) गोळा करण्याची मोहीम सुरु करण्यात आली. रचनाकार सोसायटीच्या मागील रस्त्यावरील अस्ताव्यस्तपणे पसरलेला कचरा 'एकटी' च्या कचरावेचक महिला आणि आनंदी रेसिडेन्सीचे रहिवाशांनी वर्गीकरण करून स्वच्छ केला. क्रमाक्रमाने सरदार पार्क,रचनाकार सोसायटी, वसंत विश्वास पार्क, आनंदी अपार्टमेंट व निकम पार्क आदी भागात ही मोहीम राबविण्यात येईल, शहरातील सर्व विभागातील नागरिकांनी यात सहभागी व्हावे. या प्रयत्नात साथ द्यावी असे आवाहन 'वुई केअर' ग्रुपचे संस्थापक पाटील व राजाज्ञा यांनी केले आहे. यासाठी ज्या सोसायटी, संस्था भाग घेतील, त्यांच्या
परिसरातूनही कचरा नेण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्व पर्यावरणप्रेमींनी यात सूचना, कल्पना व प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा प्रकल्प यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी संजय पाटील ९४२३९८०१८१,अरुण राजाज्ञा ९४२३०४०७८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
कचरामुक्तीसाठी नागरिकांना फार काही वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. फक्त त्यांना सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवावा लागेल. 'एकटी' संस्थेच्या कचरावेचक महिला हा कचरा नियमितपणे आपल्या दारातून घेऊन जातील व त्याची शास्त्रशुद्ध निर्गत करतील. महानगरपालिकेचा सफाई खर्च वाचेल. त्याचप्रमाणे कचरा वेचणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावेल.'
- अरुण राजाज्ञा
गुढी पाडव्यादिवशी कचरामुक्तीच्या उपक्रमासाठी देवकर पाणंद परिसरातील नागरिकांशी चर्चा केली आहे. विविध प्रयत्नांनी शहर कचरामुक्त कसे होऊ शकते. सरदार पार्क,रचनाकार सोसायटी, वसंत विश्वास पार्क, आनंदी अपार्टमेंट व निकम पार्क आदी भागात टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
- संजय पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट