म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कडाक्याचा उष्मा, मधूनच होणारे ढगाळ वातावरण, बंद झालेल्या वाऱ्यामुळे वाढणारी तगमग, कधी गारांसह कोसळणारा जोरदार पाऊस या सर्व वातावरणात कमी म्हणून रविवारी सकाळी थंडीतील दिवसाप्रमाणे धुक्याची दुलईही शहरवासियांनी अनुभवली. सकाळी गारवा, दुपारी उष्मा व सायंकाळी ढगाळ वातावरणाने होणारी तगमग असे सरमिसळ वातावरण एका दिवसांत अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्म्याचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच वळीवाने सलामीही दिली. या आठवड्यात तापमानाने कहर केला. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ३७ अंशांवर पोहचले. त्याबरोबरच वाराही मंदावला असल्याने उष्मा प्रचंड वाढला होता. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात वळीवाने जोरदार हजेरी लावली. काही भागात हा पाऊस झाला नसला तरी हवेत गारवा होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा वातावरण मूळ पदावर येत उष्म्याचा कहर वाढला. त्यादिवशीही सायंकाळी पावसाची हजेरी अपेक्षित होती. पण त्यावेळी हुलकावणी मिळाली. शनिवारी मात्र ही भरपाई करत गारांसह पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात सर्वत्रच गारवा निर्माण झाला होता.
वळीव पावसाच्या हजेरीनंतर रविवारी उष्म्यात वाढ होईल अशी अपेक्षा होती. रविवारची सकाळ मात्र शहरवासियांना आश्चर्याचा धक्का देणारीच ठरली. एरव्ही आठ वाजताच सूर्याची किरणे तापवत असताना रविवारी सकाळी मात्र शहर व परिसरात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र होते. यंदाच्या हिवाळ्यात धुके फारसे पहायला मिळाले नाही. पण कडाक्याचा उन्हाळा, वळीव पाऊस अशा वातावरणात धुके हे न पटणारे असेच होते.
चिलटांमुळे भयंकर उपद्रव
वळवाच्या पावसाची चाहूल घेऊन येणारी चिलटे यंदा मार्चमध्येच दाखल झाल्याने कोल्हापूरकर वैतागले आहेत. रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणांबरोबरच अगदी वातानुकूलित ऑफिसमध्येही मुक्काम ठोकलेल्या या चिलटांच्या उपद्रवामुळे डोळ्यांना त्रास होतो आहे. उष्णतेमुळे आणि अस्वच्छतेमुळे चिलटे, डास आणि कीटकांचे प्रमाण शहरात वाढले आहे. सूर्योदयापासून सक्रीय होणारे हे कीडे संध्याकाळपर्यंत कोल्हापूरकरांना त्रास देत आहेत. उद्याने, हॉटेल, फूटपाथ, बसस्टॉप अशा सार्वजनिक ठिकाणांबरोबरच वातानूकुलीत कार्पोरेट ऑफिसेसमध्येही या चिलटांनी आक्रमण केले आहे. चिलटांसह इतर किटकांच्या वाढीसाठी दमट हवा पोषक असते. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणअभ्यासक धनंजय जोशी यांनी दिली. ते म्हणाले, 'तापमान वाढले की किटकांच्या कोषांमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया वाढते. चिलटांच्या काही जातीसाठी जनावरांच्या आणि मानवी डोळ्यांतील अश्रू हे खाद्य असते.'
वेगवेगळ्या वातावरणामुळे संसर्गाचा प्रादूर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी थोडासा त्रास जाणवू लागल्यास विश्रांती घेणे, भरपूर पाणी व त्याचबरोबर सकस आहारही घेणे आवश्यक आहे. त्यानंतरही त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. अमोल माने
चिलटांच्या काही जातीसाठी जनावरांच्या आणि मानवी डोळ्यांतील अश्रू हे खाद्य असते. त्यामुळे डोळ्यांभोवतील चिलटे फिरताना दिसतात. डोळे येण्याच्या आजाराची साथ चिलटांमुळे बळावू शकते. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे योग्य ठरते.
- डॉ. बशीर मुल्ला
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट