उद्योग आणि शेती या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असणे ही दुर्मिळ बाब. कोल्हापूरमध्ये हे वैशिष्ट्य अद्याप टिकून आहे. शेती, पूरक साखर उद्योग आणि औद्योगिक क्षेत्राच्या बळावर कोल्हापूरचा आर्थिक विकास निश्चितच आणखी वेगाने होऊ शकते. क्षमता आहे पण, त्याचा पुरेपूर वापर करण्याची गरज आहे असे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्याचा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (२०१४-१५) नुकताच प्रकाशित झाला. त्यात कोल्हापूरने चांगलीच भरारी मारल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सुमारे गेल्यावर्षाच्या तुलनेत १८ हजार ११६ रुपयांनी वाढून १ लाख १९ हजार ७३८ रुपयांवर पोहोचले आहे. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नापेक्षाही अधिक ही वाढ आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या बड्या शहरांपाठोपाठ आपला लौकिक कोल्हापूरने टिकवून ठेवला आहे.
'दरडोई उत्पनात कोल्हापूरने गती टिकवली. मात्र त्यात आणखी वाढ सहज शक्य आहे' असे सांगून अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. केदार मारुलकर म्हणाले, 'उद्योग आणि शेती या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असणे ही तशी अवघड बाब असते. मात्र, कोल्हापुरात आजही तशी स्थिती आहे. शहरात राहून ग्रामीण भागात शेती उद्योग करणारे आणि ग्रामीण भागात इंडस्ट्रीज चालविणारे मात्र शहरात रहाणारे उद्योजक अशी संमिश्र स्थिती कोल्हापूरमध्ये पहायला मिळते. कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न एकेकाळी देशातील पाच मोठ्या शहरांपैकी एक होते. गेल्या काही वर्षात अन्य शहरे आपल्यापेक्षा पुढे गेली. एकूण उद्योग आणि शेती क्षेत्र पाहिले तर वाढ निश्चितच चांगल्या पद्धतीने होऊ शकते. उद्योग क्षेत्राकडे पाहिले तर करप्रणाली, सुविधांच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरात आंदोलने झाली. उद्योग क्षेत्रात काहीशी अस्वस्थता दिसते. काही उद्योगांनी कर्नाटकात स्थलांतराच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापूरचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या कोल्हापूरच्या आर्थिक विकासात मोठी वाढ दिसत नाही.' नियोजनपूर्वक प्रयत्न केले गेले तर कोल्हापूर विकासाच्या वाटेवर आणखी चांगल्या पद्धतीने धावू शकेल असे डॉ. मारुलकर यांनी स्पष्ट केले.
'दरडोई उत्पन्नाच्या वाढीची कोल्हापूरची क्षमता अफाट आहे' असे सांगून औद्योगिक सल्लागार एन. बी. माटे म्हणाले, 'खरेतर कोल्हापूरची यापेक्षा अधिक क्षमता आहे. मात्र, त्याचा पुरेपूर वापर केला जावा यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत उद्योग क्षेत्र काहीशा मंदीच्या कालखंडातून जातो आहे. शेती, साखर कारखानदारी या क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. खरेतर पर्यटनाच्या दृष्टीनेही कोल्हापूर अग्रेसर आहे. पर्यटन, उद्योग-व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. मात्र, नकारात्मक मानसिकतेतून कोल्हापूरला बाहेर काढण्याची गरज आहे. पर्यटनाच्या निमित्ताने येणाऱ्यांना आपण अधिक सुविधा दिल्या पाहिजेत. सद्यस्थितीत टोल आकारणी, पार्किंगसाठी द्यावे लागणारे पैसे, वाहतूक कोंडीचा प्रश्न अशा बाबी त्यांच्यासमोर उभ्या रहातात. अशा गोष्टी टाळायला हव्यात. उद्योग आणि शेती क्षेत्रात कोल्हापूर आणखी विकास करू शकेल. मात्र, त्यासाठी पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट