'राज्यकर्त्यांच्या भ्याड मनोवृत्तीमुळेच कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली,' असा आरोप प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांनी केला. ऑल इंडिया स्टुंडटस् फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्यावतीने शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सिनेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या कॉ. गोविंदराव पानसरे अभिवादन सभेत ते बोलत होते.
प्रा. पाटील म्हणाले, 'भारतीय राज्यघटनेवर ज्यांचा विश्वास नाही व ज्यांना धर्मनिरपेक्षता मान्य नाही त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या केली. पानसरे यांच्या खुनाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जात असताना तपास का लागत नाही असा सवाल त्यांनी केला. 'शिवाजी कोण ' हे पुस्तक लिहून रयतेच्या राजावरचा अन्याय पानसरे यांनी पुसून टाकला. पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तपास एक महिना झाला तरी लागलेला नाही. हजारो लोकांची उलट तपासणी करून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा पोलिसांनी तपास करत नाही असे जाहीर करावे.'
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणले, 'पानसरे यांची हत्या म्हणजे कोल्हापूर पुरोगामी चेहऱ्याची हत्या आहे. पानसरे हे ब्राह्मणांचा व्देष करत नव्हते तर ब्राह्मण्याचा व्देष करीत होते.' ज्येष्ठ राजकीय विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी, पानसरे यांनी वैचारिक प्रगतशील चळवळीला नवी दिशा देण्याचे काम केल्याचे सांगितले. कॉ. पानसरे अध्यासन सुरू करावे, अशी मागणी डॉ. जे.एफ पाटील यांनी यावेळी केली. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कॉ. गिरीश फोंडे, डॉ. आर.बी. गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट