२६ सप्टेंबर १७१५ रोजी पुनर्प्रतिष्ठापित अंबाबाई मूर्ती नित्यपूजेत आली असली तरी दुग्धाभिषेक, कुंकूमार्जन यामुळे कालौघात मूर्तीची झीज होण्यास सुरूवात झाली. सन १९२१ च्या दरम्यान मूर्तीचा डावा हात दुखावला तेव्हापासून १९५५ सालापर्यंत अंबाबाईची मूर्ती हात आणि कंबर यांच्यामध्ये धातूच्या पट्टीने आधार दिलेल्या अवस्थेत होती. तत्कालीन द्वारकापीठ शंकराचार्य यांच्या पुढाकाराने मूर्तीला वज्रलेप करून तिचे संरक्षण करण्याचा विचार पुढे आला. अंबाबाईच्या मूर्तीवर झालेला तो पहिला वज्रलेप असला तरी त्यामुळे मूर्तीला बेढबपणा आलाच.
पण काही दिवसांनी वज्रलेपाचा थर मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या पाषाणाचा अंश घेऊन निघण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम असा झाला की मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी वज्रलेप करायचा की नाही या मुद्यावरून देवस्थान समिती आणि श्रीपूजकांमध्ये मतभेदाची दरी पडली.
अंबाबाईच्या दर्शनासोबत येणाऱ्या भाविकांकडून देवीला अभिषेक केला जायचा तो थेट मूळ मूर्तीवरच. शिवाय देवस्थानतर्फे श्रीपूजकांकडून होणाऱ्या नित्यपूजेतही मळवट, कुंकूमार्जन याचा समावेश होता. त्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीवर कोरलेले अलंकार, नागाचा फणा झीजेमुळे दिसेनासे होण्यास सुरूवात झाली. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे चेहऱ्यावर सात्विक भाव, नाजूकपणे उठावदार कोरलेले नाक, डोळे, ओठ. पण मूर्तीची झीज इतकी वाढली की मूर्तीवरील हे बारकावेच निघून जाण्याचे संकेत दिसू लागले. त्यामुळे मूळ मूर्तीवर अभिषेक करणे १९९७ सालापासून बंद करण्यात आलेे. गेल्या चौदा वर्षापासून मूर्तीच्या वज्रलेपाचा जो वाद सुरू होता त्याची पहिली सुरुवात मूळ मूर्तीवर अभिषेक बंद करण्याच्या निर्णयापासूनच झाली. सन २००२ च्या दरम्यान राज्य सरकारने एक अध्यादेश काढला की, मूर्तीवर वज्रलेप करायचा की नाही याबाबची मते जाणून घेण्यासाठी एक समिती नेमली जावी. वज्रलेपाला काही श्रीपूजकांनी विरोध केला. हा दोन तपांचा वाद केमिकल कॉन्झर्वेशनच्या पर्यायाने संपुष्टात आला. राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार वज्रलेपाबाबत मते जाणून घेण्यासाठी जी सात सदस्यीय समिती नेमली तिच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश एस. व्ही. नेवगी यांची नियुक्ती केली. समितीने गैरसमजातून घेतलेल्या वज्रलेपाच्या निर्णयातून वाद चिघळला. तो न्यायालयात गेला. पुरातत्व विभागानेही मूर्तीला वज्रलेप पेलणार नसल्याचा अहवाल १२ जून २०१४ रोजी दिला आणि त्याच अहवालाच्या आधारे वज्रलेप प्रकरणावर खऱ्या अर्थाने पडदा पडला.
अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने मूर्ती वज्रलेप सहन करू शकणार नव्हती. वज्रलेपाने मूर्तीचे अस्तित्व धोक्यात येणार होते. मात्र, हा मुद्दा देवस्थान समिती विचारात घेत नव्हती, म्हणून श्रीपूजकांनी न्यायालयाचे दार ठोठावले. पण दोन तपांनंतर का असेना देवस्थान आणि श्रीपूजक यांनी समन्वयातून रासायनिक संवर्धनाचा पर्याय निर्णायक ठरला.
- गजानन मुनीश्वर, श्रीपूजक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट