म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर केएमटीकडील रोजंदारी चालक-वाहकांना वेतन ग्रेड मिळाल्याच्या आनंदाचे सेलिब्रेशन ४० कर्मचाऱ्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दुर्गमानवड येथे केले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या तब्बल २२ बसेस रविवारी दुपारनंतर मार्गस्थ होऊ शकल्या नाहीत. परिणामी एका दिवसांत ९० हजाराच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. वेळेवर बस मार्गस्थ होत नसल्याने रविवारी गर्दीच्या दिवशी प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून केएमटी आर्थिक अरिष्टातून धावत आहे. तोटा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, पण ते सर्व अयशस्वी झाले. या प्रयत्नांना खीळ घालण्यात केएमटीतील कर्मचारीही कारणीभूत ठरत आहेत. पूर्वपरवानगीशिवाय ड्युटीवर न येणे, ड्युटीवर आल्यानंतर मधूनच गायब होणे, अशा कारणांमुळे ऐनवेळी सकाळी मार्गस्थ झालेल्या पाच ते दहा बसेस दररोज दुपारी वर्कशॉपमध्ये पोहोचत आहेत. त्यामुळे तोटा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्याची प्रचिती रविवारी पुन्हा आली. केएमटीकडे ए, बी व 'सी' अशा बॅचमध्ये रोजंदारी चालक-वाहकांची वर्गवारी केली जाते. त्यामधील 'सी' बॅचमधील काही रोजंदारी चालक-वाहकांचा 'ए' बॅचमध्ये समावेश करण्यात आला. या ग्रेडमुळे त्यांच्या वेतनात दिवसाला शंभर रुपयांची वाढ झाली. प्रशासनाकडून मिळालेल्या भेटीचे सेलिब्रेशन करण्याचा बेत आखण्यात आला. त्यासाठी त्यांनी रविवारी थेट दुर्गमानवडची निवड करत तिथे जाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे चार ते पाच सहाय्यक वाहतूक निरीक्षकांसमवेत ४० चालक-वाहक दुपारी दुर्गमानवडकेड रवाना झाले. त्यामुळे सकाळी मार्गस्थ झालेल्या १०२ बसेस पैकी २२ बसेस वर्कशॉपमध्ये चालक-वाहक नसल्याने दाखल झाल्या. सकाळी ११ बसेस कमी असताना पुन्हा सुटलेल्या २२ बसेस कमी झाल्याने केएमटीला ९० हजाराचा दैनंदिन उत्पन्नाचा फटका बसला. चालक- वाहक नसल्याने उत्पन्नावर परिणाम झालेला असतानाच प्रवाशांनाही मन:स्तापाला सामोरे जावे लागले. रविवारच्या सुटीमुळे अनेकजण कुटुंबासह खरेदीसाठी आले होते. पण दुपारनंतर बस वेळेवर मार्गस्थ होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी चौक, खासबाग येथील वाहतूक नियंत्रण कक्षासाठी विविध मार्गावरील बसेस कधी मार्गस्थ होणार, याची सातत्याने विचारणा केली जात होती. त्यामुळे त्यांना तासनतास बसथांब्यावर उभे राहावे लागत होते. तर अनेकांनी वाट पाहून अन्य वाहतूक व्यवस्थेचा अवलंब केला. याबाबत अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक दिवाकर कारंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ........ चौकट 'गटारी' पार्टीचे प्रकरण दाबले गेल्यावर्षी गटारी आमवस्येचे औचित्य साधून केएमटीकडील चालक-वाहकांनी अशीच जंगी ओली पार्टी केली होती. त्यामुळे दुपारनंतर अनेक बसेस मार्गस्थ होऊ शकल्या नाहीत. या ओल्या पार्टीची चौकशी करण्यासाठी सहभागी लोकांना नोटिसा देऊन समितीही नेमण्यात आली. मात्र नंतर या नोटिसा आणि समितीही बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा केएमटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. अधिकारीच अशा अवैध प्रकारांना आळा घालण्याऐवजी त्यावर पांघरुण घालत असतील, तर केएमटी आर्थिक अरिष्टातून कशी बाहेर येणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट