कोल्हापूर टाइम्स टीम 'सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध करून ग्रामीण भागाचा विकास साधताना जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्वमार्ग विकसित करू. जि.प. मालकीच्या जागा विकसित करून ग्रामीण भागात रोजगाराला चालना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वउत्पन्नातील वाढीसाठी प्रयत्नशील आहे. भाऊसिंगजी रोडवरील जि.प.च्या मालकीच्या इमारतीत पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीला प्राधान्यक्रम राहील. इमारत उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. महत्वाचे म्हणजे, कॉम्प्लेक्स उभारणीबाबत येथील दुकानदारांसोबत कोर्टात समझोता झाला आहे,' अशी माहिती अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. 'ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे तीन मंत्री जिल्ह्याला मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मिळवू. ग्रामीण भागातील रस्ते, शेतकऱ्यांना सुविधा, आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सोयी, शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करून गुणवत्ता उंचावणे या कामांना चालना देऊ,'असेही त्यांनी सांगितले ते म्हणाले, 'पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे व गावपातळीवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणीचे महत्त्व सरकार दरबारी मांडून निधी मिळवू. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळायला हव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ज्या गावांत नियुक्ती आहे, त्या ठिकाणी ते कायमस्वरुपी राहिले पाहिजेत. जे वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी मुक्काम करणार नाहीत त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावरुन कारवाई केली जाईल' याप्रसंगी पांडूरंग पाटील, बयाजी शेळके, अरुण चव्हाण, अशोक वरेकर उपस्थित होते. 'डीबीटी'पद्धत रद्दसाठी प्रयत्न उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, 'सरकारच्या विविध योजनेतंर्गत सध्या थेट खात्यावर अनुदान डीबीटी जमा केले जाते. मात्र अनेक लाभार्थ्यांची पहिल्यांदा वस्तू खरेदी करण्याची ऐपत नाही. वस्तू खरेदी करून पावती जमा केल्याशिवाय त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही. यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून लांब राहत आहेत. यामुळे डीबीटी पद्धत बंद करुन पूर्वीप्रमाणे थेट वस्तू देण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी मंत्रीमहोदयांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करु.' शिक्षक बदली प्रक्रिया मे महिन्यातच शिक्षक बदलीची प्रक्रिया वर्षभर गाजत असते. या प्रश्नावर बोलताना पक्षप्रतोद उमेश आपटे म्हणाले, 'शिक्षक बदलीची संपूर्ण प्रक्रिया ही मे महिन्यात पूर्ण झाली पाहिजे यासाठी धोरण ठरवू. बदली प्रक्रियेत घोळ झाला म्हणून वर्षभर जिल्हा परिषदेत कुणालाही हेलपाटे मारायला लागू नयेत. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे शिक्षक अध्यापनाचे काम पूर्ण क्षमतेने करू शकतील. नव्या धोरणाची निश्चित अंमलबजावणी केली जाईल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट