म. टा. वृतसेवा, हातकणंगले हुपरी (ता. हातकणंगले) शहरातील भारत निर्माण योजनेंतर्गत मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रखडलेली कामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश ठेकेदारांना जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व्ही. एल. कुलकर्णी यांनी बुधवारी दिले. काळम्मावाडी वसाहतील जलकुंभ तसेच मातंग वसाहत, यशवंत नगर भागातील जलकुंभ नळ जोडणीसह अन्य कामांबाबत नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्यासह पदाधिकाऱ्याशी झालेल्या सांगली येथे झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या. शहरातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत नऊ डिसेंबर रोजी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अपुरी कामे तत्काळ पूर्ण करावीत, तसेच या योजनेला दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने काळम्मावाडी वसाहतीमधील जलकुंभाचे बांधकाम सुरू करावे, अन्यथा ३० डिसेंबरपासून घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. याबाबत पाणीपुरवठा योजनेसंदर्भात कार्यकारी अभियंता कोल्हापूर विभाग डी. के. महाजन यांनी तातडीने सांगली येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत बोलताना नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी ठेकेदारांना चांगलेच फैलावर घेत 'तुम्हाला मुदत देऊन सुद्धा कामे करता येत नाही. कामे न झाल्यास यांना काळ्या यादीत टाकू.' असा दम दिला. मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनीही आक्रमक भूमिका घेत 'मुदत देऊनसुद्धा तुम्ही चालढकल केल्याने पाणी योजनेचे काम रेंगाळले आहे. शहरातील तुमच्या विषयी काय भावना आहेत. हे जाणून घेण्यासाठी हुपरीत या, म्हणजे समजेल.' असे सुनावले. यावेळी पाणी पुरवठा सभापती सूरज बेडगे, शिवसेना विभागप्रमुख विनायक विभुते, शहर प्रमुख अमोल देशपांडे, प्रसाद पाटील, ठेकेदार संजय पाटील, अर्जुन पाटील, अधिकारी पी. के. पांडे, एस. एस. कमलापती, एस. जी. घाडगे, बी. के. कोरेगावे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट