फोटो आहे म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे थकीत असलेल्या पाणीपट्टी वसुलीसाठी सोमवारी अधिकारी रस्त्यावर उतरले. मोहिमेचा धडाका लावताना दिवसभरात एक लाख ९६ हजार २४० रुपये वसूल करण्यात आले. तर १८ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. बुधवार पेठ, शनिवार पेठ, उत्तरेश्वर पेठ परिसरात कारवाई करण्यात आली. आर्थिक वर्ष संपण्यास चार महिन्यांचा अवधी असला, तरी शहरातील अनेक मिळकतदारांकडे मोठी पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपुरवठा विभागाची वसुली समाधानकारक नसल्याने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यांपासून वसुली मोहिमेने गती घेतली आहे. लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्याकडून वसुली केली जात होती. सोमवारी मात्र वरिष्ठ अधिकारीच रस्त्यावर उतरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांकडून एक लाख ९६ हजारांची वसुली करण्यात आली. पथकाने सोन्या मारुती चौक, गवळी गल्ली, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस परिसर, बागवान गल्ली, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील शंकर काटकर उर्फ उबाळे, अशोक शेणई, देवगिरी गोसावी, बळवंत भोसले, खंडेराव भोसले, सदाशिव निल्ले, दत्तात्रय वाली, चिराउद्दीन पाथरवट, महंमद अवटी, जमाल मुजावर, धोंडिराम मुरोडे, कासीम मणेर, औदुबंर माळी, महावीर कराळे, नेमिनाथ घोडके, रफीक मुल्ला, विजयमाला अथणे, ताराबाई सपाटे या थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी गवळी गल्लीतील अमृत योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनची तपासणी केली. तसेच जोडलेल्या नळ कनेक्शनमधील त्रुटींबाबत संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. वसुली पथकांमध्ये पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत, पथक प्रमुख पी. एस. माने, उदय पाटील, मिटर रीडर प्रथमेश माजगांवकर, रवी वडगांवकर, महावीर आवळे, उदय भोसले, आदिनाथ शेलार, बाजीराव कांबळे, सागर मिठारी यांचा समावेश होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट