Appasaheb.mali@timesgroup.com Tweet:Appasaheb_MT कोल्हापूर : पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षेतील यशाच्या कोल्हापुरी पॅटर्नचा राज्यभर गवगवा असताना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये (नॅशनल टॅलेंट सर्च) मात्र कोल्हापूर, सांगली, सातारासह कोकणातील दोन्ही जिल्हे पिछाडीवर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळा-शिक्षकांचा उदासीन दृष्टिकोन, मुलाचे दहावीचे वर्षे म्हणून पालकांचा एनटीएसकडे काणाडोळा ही कारणे पुढे केली जात आहेत. प्रत्येकाने एकमेकांवर जबाबदारी ढकलत या परीक्षेकडे पाठ फिरवल्यामुळे 'राष्ट्रीय प्रज्ञा'मध्ये कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकाराची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी कोल्हापूर दौरा करुन अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात पाचही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना यशाची टक्केवारी उंचावण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. यासाठी अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षकांवर जबाबदारी निश्चित होणार आहे. कोल्हापूरपेक्षा औरंगाबाद (४०), नागपूर (२६) आणि पुणे जिल्ह्यातील (१६) मुले जादा संख्येने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, राज्याला राष्ट्रीय स्तराकडून शिष्यवृत्तीसाठी ३८७ विद्यार्थ्यांचा कोटा निश्चित असताना हा कोरमही पूर्ण होत न विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत नसल्याची आकडेवारी आहे. वास्तविक, दहावीत शिकत असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा, बुद्धीमान विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणासाठी त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे. आर्थिक सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी म्हणून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. एनटीएसमधून विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीधारक ठरल्यास अकरावीपासून पीचडीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी ) २०१२-१३ पासून परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. एनसीईआरटीमार्फत राष्ट्रीय स्तरावर तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यस्तरावर परीक्षा घेतली जाते. राज्यस्तर परीक्षेत गुणानुक्रमे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी बसता येते. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याला अकरावीपासून पीएचडीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते.राज्यातील कोणत्याही सरकारमान्य शाळेतील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थ्यास राज्यस्तर परीक्षेस बसता येते. अत्यल्प विद्यार्थी दरम्यान, प्रज्ञाशोधमध्ये २०१७-१८ मध्ये ९८ तर १८-१९ मध्ये २९६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या दोन्ही वर्षात कोल्हापूर विभागाची कामगिरी बेताची राहिली. गेल्यावर्षीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार, साताऱ्यातील आठ, रत्नागिरीतील एक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर झळकला. अन्य जिल्ह्याच्या मानाने कोल्हापूर विभागातील शाळा मागे पडल्या आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके विद्यार्थी एनटीएसमध्ये झळकत असल्यामुळे शिक्षण विभागासाठी हा चिंतनाचा विषय ठरला आहे. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने वेगळी परंपरा निर्माण केली आहे. या दोन्ही परीक्षेद्वारे विद्यार्थ्यातील गुणवत्ता सिद्ध झाली आहे. मात्र राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत कोल्हापूर विभागाला अत्यल्प यश का याचा शोध घेतला जात आहे. यशाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कृती कार्यक्रमावर भर देण्याविषयी ठरले. तालुकापातळीवर मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा, शिक्षकांसाठी सेमिनार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. - दत्तात्रय जगताप, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राष्ट्रीय स्तरावर मिळणारी शिष्यवृत्ती (रक्कम रुपयांत, दरमहा) १२५० अकरावी, बारावीसाठी २००० पदवीपर्यंत २००० पदव्युत्तर पदवीसाठी ४ वर्षे पीएचडीसाठी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट