फोटो अर्जुन टाकळकर
................
Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:Appasaheb_MT
कोल्हापूर : रोज शाळेत जीवनाची सुट्टी झाली की अनेक विद्यार्थ्यांची पावले ग्रंथालयाकडे वळतात. थोरामोठ्यांचे जीवनचरित्र, साहस व संस्कारकथेचे सामूहिक वाचन होते. मधल्या सुट्टीतच वाचलेल्या प्रकरणावर चर्चाही घडते. प्रत्येक विद्यार्थी पुस्तकातून काय शिकवण मिळाली याविषयी आपआपली मते मांडतो आणि उद्या नवीन पुस्तक वाचण्याच्या ओढीने पुन्हा वर्गाकडे धाव घेतो. वाचनाविषयी गोडी वाढविणारा या साहित्यविषयक उपक्रम गेली दहा वर्षे महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू आहे. सहा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झालेल्या वाचन छंद मंडळाची सभासद संख्या आता १०० वर पोहचली आहे.
महाराष्ट्र हायस्कूलमधील 'ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन छंद मंडळ'मुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या वेगळा विश्वाची सफर घडत आहे महत्त्वाचे म्हणजे, मुलांमध्ये संभाषण कौशल्य, वक्तृत्वाची आवड निर्माण झाली आहे. वाचनाच्या प्रभावामुळे विविध विषयावर उत्स्फूर्तपणे भाषण करण्याचे धाडस मुलांमध्ये प्राप्त झाले आहे.'असे निरीक्षण वाचन छंद मंडळाचे समन्वयक व सहायक शिक्षक विश्वजित शिंदे यांनी नोंदविले. हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून २००८-०९ मध्ये या अनोख्या उपक्रमाची सुरुवात झाली.
शाळेच्या जेवणच्या सुट्टीत मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सुरुवातीला केवळ सहा विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हळूहळू त्यामध्ये विद्यार्थी सहभाग वाढत गेला. कालांतराने इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि दहावीतील मुले आकर्षित झाली. हायस्कूलमधील ग्रंथालयात मुलासाठी बाकडी ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. हायस्कूलच्या ग्रंथालयात २०,००० हून अधिक पुस्तके आहेत. त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, विज्ञान, खेळ, साहस कथा, शौर्य कथा, संस्कारकथांचा समावेश आहे.
दुपारी मधली सुट्टी झाली की मुले ग्रंथालयात जमतात. त्यांच्यापैकी कोणी एखाद्या पुस्तकातील ठराविक प्रकरणाचे वाचन करतो. आवडललेल्या प्रसंगावर चर्चा करतात. पुस्तकाचे वेगळेपणे, पुस्तकातील संदेश, विषय आणि पुस्तक का आवडले याविषयी मुलांमध्ये चर्चा रंगते. काही मुले पुस्तके वाचायला घरी नेतात. अभ्यासाच्या जोडीला वाचन करतात. काही मुलांनी एका शैक्षणिक वर्षात वीसहून अधिक पुस्तके वाचल्याच्या नोंदी ग्रंथालयाकडे आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाबा आमटे, स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे, क्रांतिकारकांच्या जीवनावरील पुस्तकाविषयी मुलांमध्ये वेगळे कुतूहूल आहे. याशिवाय 'ययाती', 'स्वामी', 'एक होता कार्व्हर', 'मन की बात' यासह विविध पुस्तकांचे वाचन केल्याचे मुलांनी सांगितले.
वाचन छंद मंडळ उपक्रमाला संस्थेनेही पाठबळ दिले आहे. संस्थेचे व्हाईस चेअरमन आर. डी. पाटील-वडगावकर, संचालक विनय पाटील, सविता पाटील, मुख्याध्यापक ए. एस. रामाणे, उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, पर्यवेक्षक उदय पाटील, के. ए. ढगे आदींनी या उपक्रमाला नेहमीच प्रोत्साहित केले. शालेय जीवनातच संस्कारक्षम मूल्यांची रुजवात व्हावी. मुलांना वाचनाची गोडी लागावी. थोरामोठ्यांच्या चरित्रकार्यातून जीवनात सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्याची प्रेरणा लाभावी, हा उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचन छंद मंडळाची सभा
वाचन छंद मंडळाची वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा होते. वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला जातो. दरवर्षी वाचन छंद मंडळावर मुला, मुलींच्या गटातून प्रमुख निवडले जातात. या शैक्षणिक वर्षात मुलींच्या गटाच्या प्रमुख दीक्षा पाटील तर उपप्रमुख ज्ञानेश्वरी घारे आहेत. मुलांच्या गटाचे प्रमुख अविष्कार पोवार व उपप्रमुखपदी सिद्धेश चव्हाण आहेत.
पुस्तकामुळे अनेक फायदे
वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. सामान्यज्ञानात भर पडते. भाषणासाठी आवश्यक धीटपणा प्राप्त होतो. थोरामोठ्यांच्या जीवनचरित्रातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, अशा भावना विद्यार्थी केदार पाटील, ज्ञानेश्वरी घारे, दीक्षा पाटील, वेदिका गुरव, मुग्धा चव्हाण, दीप्ती शिंदे यांनी व्यक्त केली.