लोगो : टॉकटाइम कोल्हापूरला कुस्तीची मोठी परंपरा आहे. कुस्तीचे माहेरघर ही ओळख जगभरात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या खेळाला अवकळा आल्याचे चित्र आहे. मल्लांना पायाभूत सोयीसुविधांचा अभाव, खेळातील करिअरची कमी झालेली शाश्वती, आर्थिक अडचणी कुस्ती क्षेत्रासमोर आव्हान म्हणून उभ्या राहिल्या आहेत. नुकत्याच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली. उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्याकडे तालीम संघाच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचे पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले. सचिन पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रश्न : कुस्तीच्या विकासासाठी नेमके कोणते प्रयत्न करणार आहात? सर्वात आधी मल्लांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. लोकवर्गणीतून ५० लाख रुपयांचा निधी उभारून २०० मल्लांसाठी वसतिगृह उभारणार आहे. चांगले प्रसाधनगृह, व्यायामासाठी प्रशस्त जागा आदी सुविधा देणार आहोत. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कुस्तीच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. नव्याने येणाऱ्या सरकारकडे पाठपुरावा करून अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. किमान मोठ्या तालमींना प्रशासकीय खर्चासाठी भरीव अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे. त्याचबरोबर यंदा हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. प्रश्न : मल्लांना आर्थिक पाठबळासाठी आपली भूमिका काय असेल? मल्लांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे ही आमची मुख्य भूमिका आहे. राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूला नोकरी मिळणे गरजेचे आहे. अनेक खेळाडू सरावाचा खर्च पेलत नसल्याने कुस्तीपासून लांब जातात. इतर खेळांतील खेळाडूंना ज्या प्रमाणात शासकीय नोकरीत सामावून घेतले जाते, त्याच पद्धतीने कुस्तीपटूंना नोकरीत अधिक स्थान मिळावे यासाठी राज्यातील सर्व तालीम संघाच्या माध्यमातून सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी शासनावर धोरणात्मक दबाव आणणार आहे. प्रश्न : कोल्हापूरमधूनही नवा महाराष्ट्र केसरी घडलेला नाही? गेली काही वर्षे कुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कोल्हापुरातून महाराष्ट्र केसरीसाठी मल्ल घडविण्यात अडचणी आल्या आहेत. यातील समस्यांवर काम करून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नवे खेळाडू तयार होतील यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने नव्या खेळाडूंना तयार केले जाईल. मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेरून मल्ल कोल्हापूरला येत आहेत. त्याचबरोबर स्थानिक खेळाडूंचा सहभाग वाढेल याकडे लक्ष दिले जाईल. स्थानिक गुणवत्तेला अधिक वाव दिला जावा यासाठी सर्व तालीमींना एकत्र घेऊन आराखडा तयार करणार आहे. प्रश्न : कुस्तीमधील मुलींचे प्रमाण कमी आहे. यासाठी काय उपाययोजना असतील? मुलींचा कुस्ती क्षेत्राकडे चांगला ओढा आहे. रेश्मा माने हिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे अधिकाधिक मुली कुस्तीमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहेत. मुरगुडमधील मुली कुस्तीमध्ये चमकत आहेत. मुलींना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी तालीम संघाच्या माध्यमातून निश्चितपणे काम होईल. त्याचबरोबर पालकांमध्ये कुस्तीबाबत जाणीव जागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल. ग्रामीण भागातून अधिकाधिक मुली कुस्तीकडे वळाव्यात यासाठी स्थानिक तालमींना घेऊन विशेष मोहीम राबवणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट