म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यासह जिल्ह्यात ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाचे प्रमाण कमी झालेले नसल्याने साथीच्या आजारांचा जोर वाढत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर याकाळात राज्यात स्वाइन फ्लूमुळे २३९ मृत्यू झाले आहेत. तर कोल्हापूरमध्ये २३ रुग्णांचा बळी गेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद पुण्यात झाली आहे, दहा महिन्यांत पुण्यात ५२ रुग्णांचा बळी गेला आहे. तर कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे स्वाइन फ्लू वेगाने पसरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा जानेवारीपासून राज्यात २२५९ स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूरमध्ये २४४ संशयित रुग्ण होते. त्यापैकी ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मुंबईत ६४२ रुग्ण, नागपूरमध्ये ३७५, नाशिकमध्ये ३२८, ठाणे १२९ आणि पुणे पालिका क्षेत्रात १७३ रुग्णांची नोंद झाली आहे. याखेरीज नागपूरमध्ये ४४, नाशिकमध्ये ३३ आणि मुंबईत २२ जणांचा मृत्यू ओढावला आहे.
याविषयी, राज्याचे साथरोग अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, या आजारास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये दिसल्यास त्यास तत्काळ औषधोपचार केले जात आहेत. नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. स्वाइन फ्लूचे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा उशिराने उपचार सुरु करण्याचे निरीक्षण आढळून येते. त्यामुळे रुग्णांनी प्राथमिक लक्षणे आढळल्यावर त्यावर त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी
सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. स्वाइन फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. कोणताही आजार वाढू नये आणि त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहेत. तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ३८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांचा (गरोदर माता, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती) स्वॅब घेऊन त्याची तपासणी आवश्यक आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा. फ्लूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात. फ्लू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. विशेषत: गरोदर माता, मधुमेह, अथवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्ती यांनी ही लस घेणे आवश्यक आहे.
हवामानातील बदलामुळे सातत्याने साथीच्या आजारांना पोषक वातावरण मिळत आहे. स्वाइन फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारच्यावतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसतात तातडीने उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. वेळेत उपचार मिळाल्यास आजाराची तीव्रता कमी करता येते.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे साथरोग अधिकारी
कोल्हापूर जिल्हा स्वाइन फ्लू (जानेवारी २०१९पासून)
स्क्रिनिंग ८६७
प्रगतीपर १ लाख ५७ हजार ६६
एकूण संशयित २४४
एकूण पॉझिटिव्ह ८१
एकूण मृत्यू २३