appasaheb.mali
@timesgroup.com
Tweet : @appamali_MT
कोल्हापूर : संवेदनशील गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या पाचगावमध्ये अतिशय चुरशीने मतदान झाले. तर जरगनगर, रामानंदनगरमधील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जवाहरनगर येथील वीर कक्कया विद्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना काही वेळ वाट पाहावी लागली. एक मशिन जवळपास सव्वा तास बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने मतदान यंत्र बदलण्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. महाडिक आणि पाटील गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पाचगाव केंद्र शाळा, शांतीनगर येथील षटकोनी शाळा, वस्ती शाळा आणि आरकेनगर येथील शाळेत मतदानाची सोय होती. पाचगाव केंद्र शाळेत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती.
भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांच्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, दत्ता गवळी, संभाजी शिंदे, अमर कारंडे, प्रकाश गाडगीळ, विशाल पाटील आदींची यंत्रणा राबत होती. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रविण कुंभार, सदस्य प्रकाश गाडगीळ, संग्राम पोवाळकर, कृती समितीचे संजय पाटील, नारायण गाडगीळ आदी सक्रिय होते.
जरगनगर-रामानंदनगर भागात मिळून जवळपास आठ हजार मतदार आहे. या भागात जरगनगर विद्यामंदिर येथील मतदान केंद्र आहे. येथील आठही मतदान केंद्रावर सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने नजरेस पडत होते. काही ठिकाणी मतदारांची ने, आण करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. नेहरुनगर विद्यामंदिर परिसरात पाटील आणि महाडिक गटातील कार्यकर्त्यांतील ईर्षा दिसली. भाजपकडून सयाजी आळवेकर, शिवाजी आळवेकर, जयसिंग शिंदे, सुधीर देसाई, प्रितम यादव मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत होते. काँग्रेसकडून जगमोहन भुर्के, प्रसन्न वैद्य, अरुण बारामते आदींची यंत्रणा सक्रिय राहिली. बारामते हे भाजपच्या नगरसेविका अश्विनी बारामते यांचे पती आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट