कोल्हापूर टाइम्स टीम 'लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. मात्र, त्यानंतर समितीची एकही बैठक झालेली नाही. धनगरांचे एसटी आरक्षण सरकारने बासनात टाकल्याचे स्पष्ट होते आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा करावा, धनगर समाजाने देवेंद्र फडणवीस यांना जनादेश का द्यावा?' अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. संयोजक ढोणे म्हणाले, 'धनगर समाजाने देवेंद्र फडणवीस यांना जनादेश का द्यावा? तसेच त्यांनी तो का मागावा? अशी परिस्थिती सध्या आहे. समाजाची मते डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षांपूर्वी बारामतीत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतर शेकडो बैठका होऊनही आरक्षण मिळालेले नाही. आवश्यकता नसतानाही मुख्यमंत्र्यांनी टाटा समाज विज्ञान संस्थेकडे सर्वेक्षणाचे काम सोपवले. त्यात दोन वर्षे घालवली. संस्थेने वर्षांपूर्वी अहवाल सादर करूनही तो जाहीर केला जात नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, यामध्ये मूळच्या एसटी आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली नाही. यावरून सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा विषय गुंडाळल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडावी.' यावेळी संदीप लवटे, श्रीकृष्ण बोरुंगले, सुरेश कोकरे, किशोर पिराई, नितीन वाघमोडे उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट