म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
एप्रिल २०१८ नंतर तब्बल १६ महिने खंडित राहिलेली मुंबई कोल्हापूर विमानसेवा गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी सुरू झाली. पहिल्या फेरीत मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले तर ४२ प्रवासी मुंबईला रवाना झाले.
उडान योजनेअंतर्गत ट्रू जेट कंपनीने कोल्हापूर मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. कंपनीने ऑनलाइन बुकिंग सेवाही सुरू केली होती. गेले तीन दिवस विमान प्राधिकरणाकडून मुंबई-कोल्हापूर विमानसेवेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर हिरवा कंदील मिळाल्यानंतर विलंबाने का होईना विमानसेवेस सुरुवात झाली.
मुंबईतून टेकऑफची वेळ दुपारी १२.५५ मिनिटांची होती. प्रत्यक्षात एक वाजून २० मिनिटांनी ट्रू जेट कंपनीचे विमान हवेत झेपावले. दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी विमान कोल्हापुरात १५ मिनिटे विलंबाने लँड झाले. कंपनीकडून सुरू होणाऱ्या पहिल्याच विमानाचे प्रथेप्रमाणे वॉटर सॅल्यूटने स्वागत झाले. अग्निशमन दलाच्या दोन फायटरनी पाण्याच्या फवाऱ्यांनी कमान केली. कमानीतून विमान स्थिरावल्यानंतर उतरलेल्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील, खंडेराव घाटगे यांच्यासह देश परदेशात स्थायिक झालेले कोल्हापूरच्या नागरिकांचा समावेश होता. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनंतर कोल्हापुरातील ४२ प्रवाशांना घेऊन विमान मुंबईला रवाना झाले.
या संदर्भात कोल्हापूर एअरपोर्टचे डायरेक्टर कमल कटारिया म्हणाले, 'एप्रिल २०१८ नंतर मुंबई कोल्हापूर विमानसेवा सुरू झाली आहे. सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्यातील पाच दिवस ही सेवा कायम सुरू राहणार आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर स्वागत समारंभ न ठेवता साधेपणाने या सेवेला प्रारंभ केला. कोल्हापूरकरांना ही सेवा गणेशोत्सवाची भेट आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले.'
७७ वर्षीय आजींच्या हस्ते विमानसेवेचा प्रारंभ
महापुरामुळे विमानसेवेचे उद्घाटन साधेपणाने केले. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या ७७ वर्षीय आजींच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून आणि केक कापून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विमानतळावरील अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा सुरू झाल्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. प्रवास सुखकर आणि वेळेत झाला. कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने ही एक चांगली सुरुवात झाली. ही सेवा अशीच कायम सुरू राहिली पाहिजे.
डॉ. डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल बिहार
विमानसेवेला थोडा विलंब झाला असला तरी कोल्हापूर-मुंबई सुरू झालेली विमानसेवेचा सर्वांना फायदा होणार आहे. विमानसेवेत खंड पडता कामा नये. विमान कंपनीने वेळापत्रकाच्या नियोजनाप्रमाणे सेवा दिली पाहिजे.
के. के. खराडे, प्रवासी, मुंबई