फोटो म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम आहे. पुराचे पाणी कासगवतीने कमी होत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी सुरू होवू शकली नाही. प्रशासनाने दिवसभरात चार वेळा पाण्याची पाहणी करुन वाहतूक सुरू करण्यासंदर्भात चाचणी केली, मात्र पाण्याच्या वेगामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, अत्यावश्यक सेवेंतर्गत आपत्कालीन यंत्रणेसाठी आवश्यक असणारे पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे मिळून १५ टँकर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात आणले. पुणे बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीनजीक अजूनही साडेतीन ते चार फूट पाणी आहे. यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे, सोमवारी पुन्हा एकदा महामार्गावरील पाण्याची पाहणी करुन वाहतूक सुरू करायची की नाही, यासंबंधीचा निर्णय होणार आहे. पाण्याचा जोर ओसरल्यास सोमवारी दुपारनंतर अंशत: वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिरोळ येथे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर कार्य करत आहेत. जिल्ह्यातील विविध भागातील पूरबाधित ५०,५९४ कुटुंबातील २,४५,२२९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शिरोळचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेतला. मुंबई येथील २५ डॉक्टरांचे एक पथक उपचारासाठी शिरोळमध्ये दाखल झाले आहे. औषधे घेऊन ट्रक देखील शिरोली येथे पोहचला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग गेले आठवडाभर बंद असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू करण्यासाठी रविवारी दिवसभर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत टँकर आणण्याची चाचणी झाली. अधिकाऱ्यांनी सकाळी सात वाजता पहिल्यांदा पाहणी केली. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पाण्याचा टँकर पोकलँनसोबत पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढता येतील का यासंबंधी पुन्हा चाचणी घेतली. मात्र पुराच्या पाण्याला वेग असल्यामुळे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय झाला नाही. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विमानतळावर हेलिकॉप्टर्ससाठी आवश्यक २४,००० लिटर इंधन सुरक्षितपणे आणण्यात आले. बोटीतून १५२ सिलिंडर टाक्या आणल्या. सायंकाळी चार ते सहा या दरम्यान पुन्हा एकदा पाण्याची पाहणी आणि वाहतुकीची चाचणी झाली. आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी देसाई, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत पाहणी करुन महामार्गावरुन पेट्रोल, डिझेलच्या टँकरची वाहतूक सुरू केली. ... सकाळी पाण्याची पाहणी व चाचणी झाल्यानंतर विमान व हेलिकॉप्टर्ससाठी आवश्यक इंधनाचा टँकर आणण्यात आला. त्यानंतर स्वत अप्पर पोलिस अधीक्षक काकडे हे बांबूच्या साहाय्याने पाण्यातून चालत रस्यावरील पाण्याची उंची मोजत शिरोली येथे गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्गावर साचलेले दगड बाजूला केले. त्यानंतर सैन्यदलाचे तीन ट्रक सोडण्यात आले. ... कोट 'अत्यावश्यक इंधन प्रथम पूरग्रस्त नागरिकांसाठी काम करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनसाठी वापरले जाईल. वापरुन शिल्लक राहिलेले इंधन शहरातील पेट्रोल पंपांना दिले जाईल. पावसाचा जोर कमी झाल्यास मंगळवारपाहून पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल. दौलत देसाई, जिल्हाधिकारी ... प्रथम कोल्हापूर, कागलपर्यंतच्या वाहतुकीला मुभा सोमवारी सकाळी पुन्हा एकदा महामार्गावरील पाणी पातळीची पाहणी केली जाईल. सोमवारी अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांना प्राधान्य राहील. पाणी ओसरुन वाहतूक सुरू झाल्यास महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पहिल्यांदा कोल्हापूर आणि कागलपर्यंत प्रवास करणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट