जिल्ह्यात २९ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. गुरुवार (दि. १ ऑगस्ट) पावसाने रौद्ररुप धारण केले. बघता-बघता राधानगरी धरण ओव्हर-फ्लो होऊन पंचगंगा नदीचे पात्र झपाट्याने विस्तारले. नदीने इशारा आणि धोका पातळी ओलांडून नागरी वस्तीत शिरकाव केला. त्याचवेळी कळंबा तलावातून सुरू झालेल्या विसर्गामुळे जयंती नालाही पात्राबाहेर पडला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले. पूररेषेत बांधकामे झालेल्या जयंती नाल्याच्या परिसराबरोबरच जाधववाडी, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, शुक्रवार पेठ या भागांसह रमणमळा, न्यू पॅलेस, कसबा बावडा, केव्हीज पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागाळा पार्कच्या काही भागात पाणी घुसले. सुरुवातीला बंगल्यांच्या पायरीपर्यंत आलेल्या पाण्याने काही तासांत दहा ते १२ फुटांची पातळी गाठली आणि सर्वांचीच भीतीने गाळण उडाली.
पूरबाधितांना बाहेर काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह सर्व पदाधिकारी सोबत असल्याने कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला. दिवसरात्र नागरिकांना बाहेर काढत असताना अनेक कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या. अनेकजण तापाने फणफणू लागले. पण कर्तव्य बजावत अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढले.
पुरातून बाहेर काढल्यानंतर अनेकांनी नातेवाईकांकडे जाणे पसंद केले. तर बहुतांशी नागरिकांची मदत केंद्रांमध्ये सोय केली आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आल्याने त्यांच्या जेवण आणि पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली आहे. दोन दिवसांपासून पाणीपातळी कमी होऊ लागल्याने सर्वांना आता घरी परतण्याची आस लागली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट