Sachin.patil1@timesgroup.com
Twwet@sachinpMT
कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत विविध कारणांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ होत आहे. मध्यंतरी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणानंतर याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात दोन वर्षांत डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या ३२ घटना घडल्याची नोंद आहे. किरकोळ घटनांची नोंद होत नसल्याने एकंदर संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. सीपीआरमध्ये दोन वर्षांत डॉक्टरांना मारहाण करण्याचे सातवेळा प्रकार घडले. त्यापैकी दोन घटनांची नोंद असून अन्य पाच घटना माफी मागून मिटविण्यात आल्या.
गैरसमज तसेच अन्य कारणातून डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार होत असतात. यामध्ये नर्सेस तसेच तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवरही हल्ले होत आहेत. या हल्ल्यामध्ये रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान होते. मारहाणीच्या सर्वाधिक घटना कॅज्युअलटी विभागांमध्ये होतात. या विभागांमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर घोषित करतात परिणामी असा प्रसंग संवेदनशील असल्याने नातेवाईकांचा संयम सुटून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर मारहाणीचे संकट कोसळते. बाह्यरुग्ण विभागात झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये समूहाने मारहाण करण्याचा प्रकार अधिक होतात.
कायद्याची अंमलबजावणी नसल्याने धाडस
मार्च २०१७ मध्ये मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांनी संप केला होता. त्यामध्ये ५३ केसेस प्रलंबित असून त्यावर पुढे कार्यवाही झाली नसल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. नोंद झालेल्या घटनेमध्ये कुणालाही दोषी ठरवून सजा झाली नव्हती. २०१० मध्ये डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्टनुसार कामावर कार्यरत असताना डॉक्टरांना मारहाण झाल्यास तीन वर्षे शिक्षा ५० हजार रुपये दंड व रुग्णालयाच्या झालेल्या नुकसानीची दुप्पट भरपाई अशी तरतूद करण्यात आली होती. मात्र, अशा घटनांमध्ये दोषींवर कारवाई होत नसल्याने मारहाणीच्या घटनेत सातत्याने वाढ दर्शवली आहे.
काय आहेत हिंसाचाराची कारणे
रुग्णाकडे वेळेवर लक्ष न दिल्याच्या समजुतीने नातेवाईक डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर राग काढतात. अपुरी सुरक्षा व्यवस्था हे एक प्रमुख कारण आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या संख्येने नातेवाईक जमा होतात त्यातून हल्ले होतात. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत सरकारी रुग्णालयात मारहाणीच्या घटना अधिक आहेत. यामध्ये डॉक्टर-रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात संवादाचा अभाव असल्याचे दिसून येते. डॉक्टरांची अपुरी संख्या, वाढते रुग्ण यामुळे प्रत्येक रुग्णाकडे डॉक्टरांना वैयक्तिक लक्ष देता येत नाही. आजाराची गंभीर स्थिती उद्भवल्यानंतर काही वेळा रुग्णाला उपचारासाठी आणले जाते. तेव्हा डॉक्टरांकडून धोका असल्याची कल्पना दिली जाते पण नातेवाईक वस्तुस्थिती स्वीकारण्याच्या मानसिक तयारीत नसतात अशा वेळी रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईक आक्रमक भूमिका घेतात.
हव्यात उपाययोजना
हिंसाचार करणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई व्हावी. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा निकाल लावून दोषींना शिक्षा मिळावी. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर यांच्यात संघर्ष झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची संख्या वाढवावी. रुग्णालयात रुग्णाबरोबर केवळ एका व्यक्तीला प्रवेश द्यावा. डॉक्टर व पेशंट यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
१६ प्रकरणांत नर्सेसवर हल्ला
३८ टक्के घटना कॅज्युअलटीमध्ये
३१ टक्के प्रसंग ओपीडीत
२२ टक्के घटना वार्डात
९१ टक्के घटनांत आरोपींना शिक्षा होत नाही
महाराष्ट्रात डॉक्टरांवर झालेले हल्ले
एप्रिल २०१७: धुळे जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरला मारहाण
मार्च २०१८: पिंपरीच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय विद्यापीठात डॉक्टरवर हल्ला
मार्च २०१८ : मुंबईच्या जी. टी. रुग्णालयातील डॉ. विश्वजीत वाडकेंसोबत धक्काबुक्की
२५ एप्रिल : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर हर्षल चव्हाण यांना मारहाण
८ मे २०१८ :नागपूरच्या इंदिरा गांधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि नर्सवर हल्ला
१९ मे २०१८: मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना मारहाण
कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी होत नसल्याने डॉक्टरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुरेशी तरतूद करावी. डॉक्टर, रुग्ण व नातेवाईक यांच्यात सुसंवाद वाढवण्यासाठी तिन्ही घटकांनी पुढाकार घ्यावा.
डॉ. सुहास साळोखे, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन