कोल्हापूर टाइम्स टीम
पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर तब्बल १४१ वर्षांनी शिवाजी पुलावरील वाहनांचा आवाज थांबला. गेली अनेक दशके या पुलावरून सातत्याने वाहतूक सुरू होती. वाहनांची सोय नसताना, संस्थानकाळात पायी सुरू असलेली ये-जा नंतरच्या काळात बैलगाडी, घोडागाडी या साधनांनी वाढली. आधुनिक युगात तर अनेक मोटारी, बस, ट्रकची वाहतूक याच पुलावरून झाली. आता पर्यायी पूल सुरू झाल्याने शिवाजी पूल अडगळीत न पडता हा हेरिटेज स्पॉट व्हावा अशी प्रशासनासह नातेची इच्छा आहे. नागरीकांची ईच्छा आहे. अर्थात यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
पुलाला चौथ्या शिवाजींचे नाव
महाराणी ताराराणी यांनी कोल्हापुरात मराठ्यांची गादी स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज पहिले (१७०० ते १७१४), छत्रपती संभाजी महाराज (१७१४ ते १७६०), शिवाजी महाराज दुसरे (१७६० ते ११८१३), संभाजी महाराज उर्फ आबासाहेब (१८१३ ते १८२१), शहाजी महाराज बुवासाहेब (१८२१ ते १८३८), शिवाजी महाराज तिसरे उर्फ बाबासाहेब (१८३८ ते १८६६), राजाराम महाराज (पाटणकर) (१८६६ ते १८७०) यांनी कोल्हापूर राज्याचा कारभार केला. नंतर शिवाजी महाराज चौथे हे राज्यावर आले. ब्रिटीशांनी त्याचा छळ केल्याने त्यांचा अहमदनगरच्या किल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. १८५७च्या बंडानंतर कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहण्यासाठी ब्रिटिशांनी पोलिटिकल एजंट नेमला होता. या काळात तयार झालेल्या पुलाला अल्पवयीन शिवाजी चौथे यांचे नाव देण्यात आले.
पुलासाठी चार वर्षांचा कालावधी
कोल्हापूर आणि पन्हाळा या दोन ठिकाणांना जोडण्यााठी ब्रिटीशांनी १८७४ ते १८७८ या कालावधीत हा पूल बांधला. मेजर वॉल्टर मॉर्डन डफेट रॉयल इंजिनीअर्स या कंपनीच्या देखरेखीखाली राजश्री रामचंद्र महादेव आणि कंपनीने चार वर्षांत पूल बांधला. पूल बांधणीच्या काळात दोन पोलिटिकल एजंटची कारकीर्द पूर्ण झाली. जी. एस. अँडरसन यांच्या कारकीर्दीत पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर एफ. श्वेंडरच्या कारकीर्दीत पूल पूर्ण झाला. यावेळी संस्थांनाचे कारभारी रावबहाद्दूर महादेव वासुदेव बर्वे होते. नंतर चौथ्या शिवाजींचे नाव पुलाला देण्यात आले.
हेरिटेज कॉरिडॉर शक्य
पंचगंगा नदी परिसर हे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शिवाजी पूल हेरिटेज स्पॉट झाला पाहिजे. पुलाची डागडुजी, ब्रिटीशकालीन विद्युत खांबाची पुन्हा नव्याने मांडणी केली पाहिजे. पुलावर पर्यटक व नागरिकांना बसण्यासाठी जुन्या पद्धतीची बाके बसवण्याची गरज आहे. पुलावरुन नदीघाटाचे सौंदर्य न्याहाळताना पाण्याचा प्रवाहही अभ्यासता येऊ शकतो. या परिसरात पिकनिक पॉईंटही आहे. सध्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कल्पनेतून नदीघाट व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. गायकवाड वाडा ते शिवाजी पूल असा हेरिटेज वॉकसाठी सुंदर रस्ताही विकसित करता येऊ शकतो. नदी, घाट, पिकनिक पॉईंट आणि शिवाजी पूल असा हेरिटेज कॅरिडॉर विकसित होऊ शकतो.
अश्लर पाषाणातील
अनघड शिवाडी पूल
'संस्थान काळातील अनघड असा हा शिवाजी पूल आहे. त्यासाठी अश्लर पाषाण शिळांचा वापर केला गेला. त्याचा चिरेबंदीपणा अनुभवणे हा अनोखा अनुभव आहे' असे प्रख्यात आर्किटेक्ट मोहन वायचळ यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पूल अवलोकताना शेजारच्या नव्या बॉक्स स्ट्रक्चरच्या कॉक्रीट पुलाची तुलना करता येते. शिवाजी पुलाच्या उभारणीत वडार, पाथरवट, गवंडी व स्थापतींनी कमानींचा प्रत्येक की-स्टोनवजा पाषाण घडवताना, त्याची अॕक्युरेसी राखलेली पाहता येते. या कमानीखालून जाताना थक्क व्हायला होते. नॅनो-स्केलपेक्षा कमी फरकाने, त्याचा आस घडवताना त्यांच्या कौशल्याची व मेहनतीची दाद द्यावी वाटते. प्रचंड अर्धगोलाकृती व्हेनेशियन कमानी नसूनही, त्या बसक्या दीर्घ वर्तुळाकृती आहेत. इतक्या वर्षांच्या कालावधीत त्यांची प्लेसमेंट तसूभरही बदलली नाही की सांधमोड हलली नाही. याशिवाय चार कोपऱ्यात रोमन अल्कोव्ह उभारुन, त्याला टस्कन स्तंभाने मढवून हे एका अर्थाने तोरणच सुशोभित केले गेले आहे. म्हणजे फिरग्यांनी स्थापतींच्या सहाय्याने हा पूल स्थानिकांच्या सेवेसाठी बहाल करताना जणू नववधू सासरी जाते हीच भावना ठेवून करवीरवासियांना हस्तांतरण केलेले दिसून येते.'