फोटो... म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर गेल्या दहा वर्षांपासून फुलेवाडी ते कळंबा साई मंदिर रिंगरोडचे काम रखडले आहे. रिंगरोडचे काम तातडीन सुरू करण्यासाठी फुलेवाडी व आपटेनगर येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे आले असता पदाधिकारी व आंदोलक आमने-सामने आल्याने शाब्दिक चकमक उडाली. यावेळी फुलेवाडी नाक्याजवळ सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. फुलेवाडी रिंग रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दहा वर्षांत केवळ खड्डेच भरले जात असल्याने पुन्हा खड्डे पडत असून, त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ सकाळी दहा वाजता आपटेनगर व फुलेवाडी नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यापूर्वीही परिसरातील नागरिकांनी आंदोलने, मोर्चा, प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, पण त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे फुलेवाडी नाक्याजवळ वाहतूक ठप्प झाली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव घटनास्थळी दाखल झाले, पण महापालिका प्रशासन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. त्यामुळे तणाव वाढत गेला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना येण्यास विलंब झाल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलन सुरू असतानाच महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात विजय देसाई, राजू जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश भाट, दत्ता पाटील, विनायक मोरे, बाबाजी शेळके, अविनाश मोरे, दौलत सावंत, अनिता पोवार, अनुसया धुमाळ, आदी सहभागी झाले होते. ०००० स्टंटबाजी करू नका... आपटेनगर येथे राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. आंदोलनादरम्यान स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख दाखल झाले. रिंगरोडच्या कामासाठी वर्कऑर्डर दिली असून, कामाला सुरुवात झाल्याचे सांगून त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी जाधव यांनी, लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरू असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी देशमुख यांचा पारा चढला. स्टंटबाजी करू नका, आम्ही नगरसेवक असून, आम्हाला नागरिकांची काळजी असल्याचे ठणकावून सांगितले. परिणामी येथे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. ०००००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट